नंदनकानन अर्थात व्हॅली ऑफ फ्लावर्स (इंद्राची बाग/फुलों की घाटी), बियॉन्ड वाइल्ड सोबत , ७ ते १५ ऑगस्ट २०१६

“व्हॅली ऑफ फ्लावर्स” अर्थात “फुलों की घाटी” विथ बियाँड वाईल्ड:
७ ते १५ ऑगस्ट २०१६

“देवभूमी उत्तराखण्ड में आपका स्वागत हैं” देहरादून एअरपोर्ट ला उतरल्यावर गोविंदघाटच्या वाटेवरच्या स्वागत बोर्ड मधला शब्द मनात ठासून राहतो तो शब्द म्हणजे “देवभूमी”! प्राचीनकाळी ॠषीमुनींनी दिलेले हे नाव! ॠषीकेश इथे जिकडे तिकडे लिहिले पहायला मिळते “मूनी की रेति”! 


छोटा चार धाम, (अर्थात यमनोत्री,गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ) विष्णू (बद्री) आणि शंकर (केदार) देवतांचे तीर्थस्थान, योग, ध्यानधारणा, तपस्या इ. चे तपोस्थान! पंचप्रयाग (विष्णूप्रयाग, नंदप्रयाग, कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग आणि देवप्रयाग) अर्थात पाच नदयांचे संगमस्थान! उत्तराखण्ड राज्यातील गढवाल आणि कुमाऊ ह्या हिमालय रांगेतील पर्वतरांगा, वन, ग्लेशीअर्स, लेक्स, फ्लोरा आणि फौना इ. चे निसर्ग सौदर्य स्थान! पर्वतारोहण, ट्रेकिंग, स्कीईग, रिव्हर राफ्टिंग, रॉक क्लायबिंग, रॅपलिंग, वॉटर क्नोईग, कयाकिंग, पॅराग्लाईडिंग, बायकिंग, कॅम्पिंग, वाइल्ड सफारी इ. चे साहसी स्थान! राष्ट्रीय वृक्ष, बुरांस अर्थात ऱ्होडोडेंडरॉन आणि राष्ट्रीय फुल, ब्रम्हकमळ अर्थात सॉसुरिया ऑब्वहॅलाटा इ. सारख्या पुष्पसागराचे प्राकृतिक स्थान!

अशा या उत्तराखण्ड मधील, चमोली जिल्यातील “बियॉन्ड चार धाम” पैकी एक अशा व्हॅली ऑफ फ्लावर्स राष्ट्रीय पार्क” ट्रेक साठी “बियॉन्ड वाइल्ड” संस्थेतर्फे आम्ही २४ जणांचा ग्रुप निघालो!
शेवटची रांग (डावीकडून): सविता, स्मिता, संगीता, आनंद, पराग सर आणि आरजी के सर
मधली रांग (डावीकडून): कला तारानाथ काकू, दातार काका, शलाका, संजीव काका, भळगट सर, ज्योती मॅडम
पहिली रांग (डावीकडून): मीनल, अनिता, अंजली, आरोही, पळसुले  काका, मयुरी, ज्योती, सविता दामले, तारानाथ काका
फोटो मधे नसलेले: रोहित, अद्वैत आणि हर्षल

खरं तर मी “लदाख” चं बकिंग करायला ““बियॉन्ड वाइल्ड” च्या ऑफिस मधे गेले होते. शांभवी आणि तृप्ती सोबत बोलून जवळ जवळ सगळं फायनल होत आलं.तेवढ्यात पराग सर तिथे आले. “वर्षातून एकदाचं व्हॅली” असते” असं त्यांनी सांगितलं. सगळा प्रोग्रॅॅम स्पष्ट केला. ते ऐकून मी व्हॅली” ला जायला तयार झाले. विचार करत होते की मी का चाललेय? खरं तर मी ह्या टप्प्यावर होते की फुलांच्या विविध भागांची नावं सांगा असं कोणी विचारलं तर मला काहीही सांगता आलं नसतं! ही अवस्था असताना मी “व्हॅली ऑफ फ्लावर्स ला जायचा निर्णय घेतला होता आणि ते ही प्रख्यात वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. पराग महाजन सरांसोबत! किती हे धाडस....हे समजतं होत तरी चालले होते! का?.........खूप विचार करता काही कारणाशी येऊन थांबले... रजा साठलेल्या होत्या, पैसे जमवलेले होते हे तर आहेच पण पहिलं कारण होतं की हा ट्रेक होता दुसरं आणि अत्यंत महत्वाचं कारण होतं ते म्हणजे पराग सर सोबत होते! सरांना नुसतं ऐकण आणि ऑबझर्व्ह करणं ही अत्यंत भावस्पर्शी आणि संस्मरणीय अनुभूती असते. तो अनुभव मी भूतान ट्रीपच्या वेळी घेतला होता!

असो. पराग सरांसोबत जातोय ही आठवण ठेऊन थोडफार वाचन केलं. इंटरनेट आणि वनस्पती अभ्यासक आणि पर्यटनप्रेमी, प्र. के. घाणेकर यांचे व्हॅली ऑफ फ्लावर्स हे पुस्तक वाचलं!

व्हॅली ऑफ फ्लावर्स अर्थात “फुलों की घाटी” अर्थात पुष्पदरी! हिंदू पौराणीक कथानुसार नाव आहे "नंदनकानन" अर्थात "इंद्राची बाग"! एक दैवी अनुभूती!


फुलों की घाटी

“विश्व कि धरोहर” असणारे आणि वर्षातून एकदाच फुलांनी बहरणारे एक प्राकृतिक स्थान!! ऋषिकेश ते बद्रीनारायण ह्या मार्गावरील आणि हिमालयाच्या शिवालिक पर्वतरांगा मधील, ८७.५ वर्ग किमी क्षेत्रात पसरलेले एक राष्ट्रीय उद्यान!



फ्रँक स्माईद सहित सहा ब्रिटीश गिर्यारोहक १९३१ साली गढवाल हिमालयीन रांगेतील २५४४७ फुट  उंचीचे कामेट शिखर सर करण्यासाठी आले होते. परतताना पाऊस आणि फॉग मध्ये ते मार्ग चुकले. चुकून एका दरीत पोहोचले आणि उघडीप होऊन फॉग विरळ झालं तेव्हा ते “फुलों की घाटी” पाहून अवाक झाले. 



१९३७ साली फ्रँक स्माईदने परत ह्या घाटीला भेट दिली. तीन महिने राहून वनस्पती आणि फुलांचा अभ्यास केला. त्याने “दि व्हॅली ऑफ फ्लावर्स” पुस्तक लिहिले. ह्या पुस्तकाने “व्हॅली ऑफ फ्लावर्स ला जगप्रसिद्धी मिळून दिली!

वनस्पतीशास्त्रज्ञ जोन मार्गारेट लेग्गी ही फ्रँक स्माईद ने लिहिलेलं “दि व्हॅली ऑफ फ्लावर्स” वाचून वनस्पतींचे काही नमुने गोळा करण्यासाठी इथे आली होती. एका चढावरून दुर्दैवाने तिचा पाय घसरला आणि तिचा मृत्यू झाला. तिच्या स्मरणार्थ उभारलेला स्मारकचौथरा इथे आहे!

विचार करता छान वाटलं की ह्या “फुलों की घाटी” ला जगप्रसिदधि मिळवून देणारा एक “गिर्यारोहक” होता! 

ह्याचा अर्थ असा नाही की “फुलों की घाटी” स्थानिक लोकांना माहित नव्हती. इथल्या काही फुलांचा सुगंध मंत्रमुग्ध करणारा होता. काही वनस्पतीची पाने खाल्ली तर नशा येत होती. “तिथे भूत,पिशाच्चं आहे” असा फितवा पसरून लोकांनी ही घाटी आणि तिचे सौदर्य जतन गेले होते. कोणी बाहेरचं येऊन फुलांची नासाडी करू नये आणि तिथले पुष्पसौदर्य खराब होऊ नये एवढाच त्यामागे उद्देश असावा! असो.

पुणे-दिल्ली, दिल्ली-डेहराडून हा विमान प्रवास आणि जोशीमठ-औली- गोविंदघाट-पुलना हा खाजगी वाहनाचा प्रवास! पुलना-भ्युयंदर-घांगरिया हा १४ किमी चा पायी किंवा घोड्याने प्रवास केला. घांगरिया गावातून “फुलों की घाटी” आहे ३ किमी आणि “हेमकुंड साहिब” आहे ५ किमी अंतरावर!

पोटेन्टीला

“फुले”! निसर्ग आणि माणसाच्या ह्दयाशी संबंधित एक नाजूक सुगंध! शिक्षकदिनाच्या दिवशी शिक्षकांबद्दलचा आदर व्यक्त करण्यापासून, सदीच्छा, प्रेम, अर्चना, दवा अशा कितीतरी भाव-भावनांशी जोडले गेलेले एक प्रतिक! स्त्री, लहान मुले आणि कवी-कवितांचे हे मोरपीस तर वनस्पतीशास्त्रज्ञ-अभ्यासक आणि फोटोग्राफरचे हे मर्मबंध!

“फुलांसारखे सर्व फुलारे.....ह्या फुलांच्या गंधकोषी.....पान जागे फुलं जागे.....बगळ्यांची माळ फुले....जब जब बहार आये और फुलं मुस्कुराये..ये कौन चित्रकार है......” कितीतरी गाणी देखील आठवतात!



घांगरीया चेकपोस्ट ते “फुलों की घाटी”...हा मार्ग तसा अरुंद, पायऱ्यानी बनलेला, ठीकठीकाणी पुष्पावती नदीच्या पाण्याचे झरे वाहताहेत, ठिकठिकाणी पुलं बांधलेले आहेत आजूबाजूला अवाढव्य पहाड आहेत.....

हे मार्गक्रमण करताना असं वाटतं होतं की निसर्गाची किती ही मुक्तहस्त उधळण! इथला निसर्ग पाहताना भावफुलोरे उचंबळून येत होते! इथला निसर्ग म्हणजे जणू........एक दैवी अनुभव! पावसाची एक सर! चित्रकाराची एक अप्रतिम कलाकृती! कवीची एक सुंदर रचना! आईच्या कुशीतलं तान्ह बाळ! कृष्णाची बासरी! संगीताचे सूर! गाईच्या गळ्यातला घंटानाद! नृत्यातली लय! गंगा की लहरे! गाभा-यातील शांतता! ध्यानातला ओंकार!




चारही बाजूंनी अतिभव्य पहाड, कधी ते “धुंद’ (अर्थात धुके/फॉग) ने झाकळून जाऊन आकाशातील ढगांच्या पांढ-या रंगात इतके मिसळून जातात की जणू ढगचं धरतीवर अवतरलेत! समोर एकचं रंग दिसतो “पांढरा”! 


थोड्याच वेळात हे “धुंद” विरळ होत जातं आणि मग निसर्गाचे इंद्रधनुषी रंग खुले होतात! 


मनमोहक औली

हिरवा, नीळा, पांढरा, सोनेरी, नारंगी, जांभळा.....नजर न हटणारे...डोळासुख देणारे....मधूनच होणारा पक्षांचा किलबिलाट...वाऱ्यावर डोलणारी जांभळी, सोनेरी रंगफुले आणि हलकेच, आल्हाददायक, अलगदतेने दवबिंदुंना झुलवणारी गवती पाती, चावरी/बोचरी थंड हवा आणि नदीतून वाफाळणारे गरम/थंड बाष्प....माणसाला समाधीस्त करणारी, प्रबोधित करणारी, भावरंगासोबत डोलायला लावणारी ही जादूमय निसर्गदुनिया!


सुखावलेला जलबिंदूला









झाडाच्या कुशीत विसावलेली एक ढोली......जणू माझ्याचं साठी बनलेली.......
डर के आगे फोटो है


“फुलों की घाटी” मध्ये असंख्य जाती/प्रजातीची फुले बघायला मिळाली, नीलम/ब्ल्यू पॉपी, एरीजेरॉन, कॅनाबीस, लाल पोटेन्टीला, सेलीनम, हेरॅक्लीयम, फर्गेट मी नॉट, बिस्टोरटा, ऱ्हीयम, इन्युला, लीग्युलॅरीया, अॅस्टर अल्बेसन्स, लेह्बेरी आणि विविध रंगाचे तेरडे !

जीरॅनियम
नीलम अर्थात ब्ल्यू  पॉपी

सेलीनम
काही फुले सुंदर दिसतात ती त्यांच्या रंगामुळेचं नाहीत तर त्यांच्या फळामुळे, पानाच्या आकारामुळे, ती कुठे वाढली आहे, ती कोणत्या फुलाच्या संगतीत वाढली आहेत आणि त्यांच्यातील सहजीवनामुळे!

कित्येक फुलांना औषधी गुणधर्म आहेत. उदा. पोटेन्टीला ह्या वनस्पतीचा उपयोग शक्तिवर्धक म्हणून केला जातो, जीरॅनियनची पाने-मुळे डोकेदुखीवर वापरली जातात. 

कॅनाबीस अर्थात भांगेचे झाड













कॅनाबीसची पाने हाताच्या पंजासारखी दिसतात. हशीश, गांजा, चरस सारख्या काही नशिल्या पदार्थांची निर्मिती ह्या वनस्पतीपासून करतात. हे झाड गिर्यारोहक लावतात म्हणे. आलेला थकवा नाहीसा करण्यासाठी ह्याची पाने खाल्ली जातात. 

ह्या फुलांविषयी पराग सरांना बोलताना ऐकताना ऐकतचं रहावसं वाटतं. प्रत्येक फुलाची इतकी सविस्तर माहिती त्यांनी दिली कि आता वाटतयं शहाण्या मुलीसारखी ती लिहून घेतली असती तर लक्षात तरी राहिली असती. असो. 

रोहित

घाटी तुम्ही जितकी पिंजून काढाल तेवढ्या जास्त जाती/प्रजातीची फुले मिळत जातात. फुले पाहताना हरपून, हरखून जायला होतं! ह्या फुलांच्या ताटव्यात उभं राहून फोटो काढण्याचा मोह मग आवरतचं नाही! बालसम अर्थात तेरडयाचे ताटवेचं ताटवे बघायला मिळतात. प्रत्येक फुलं वेगवेळ्या कोनातून बघितलं की त्याचं सौदर्य वेगळ दिसतं! 




नवीन फुलं शोधायला एक शोधक नजर लागते! अगदी शांतपणे, वेळ घेऊन, आत आत मार्गक्रमण करून, मान चहुदिशेला फिरवून, ह्या फुलांचा शोध घ्यावा लागतो....फुलं पायदळी तुडवली जात नाहीत ना ह्याचं भान ठेवावं लागतं! गंमत ही पण आहे की फुलांमध्ये गुरफटून जाऊन आजुबाजूचं भान विसरायला देखील होत! निसर्गाचा हा चमत्कार! हा परिसर पिंजून काढायला काही तास पुरेसे नाहीत..काही दिवस हवेत! दर दिवशी फिरून येण्याचा स्टॅमीना हवा! आलेल्या दिवशी तासनतास फिरून फुले शोधणारी नजर हवी! एकाचं फुलाचे विविधढंगी फोटो काढण्यासाठी वेळ देण्याची तयारी हवी! काही फुले शोधायची राहून जाणार ही खंत स्वीकारची तयारी हवी!.... 


ब्रम्हकमळ
“ब्रम्हकमळ” हिमालयातील फुलांचा राजा! हे फुलं बघायला मिळालं ते “हेमकुंड साहिब” या ठिकाणी! “ज्यासाठी केला सारा अट्टाहास”! असं झालं अगदी! 


इथे बघायला मिळणारी ब्रम्हकमळे ही असली! "फुलोंकी घाटी" मध्ये ब्रम्हकमळ बघायला मिळत नाही. ब्रम्हकमळाच्या ताटव्या शेजारी जे गुलाबी तुरे दिसतात ते आहे बिस्टोरटा! इथे जाऊन ब्रम्हकमळ पाह्यला न मिळण म्हणजे "देणाऱ्याचे हात हजार..पण तुझी झोळी मात्र रिकामी" असं आहे!



“हेमकुंड साहिब”! धर्मगुरु गुरु गोबिंद सिंगजी यांना अर्पित केलेले आणि ग्लेशिअर लेक आणि पर्वतांनी आच्छादलेले, समुद्र सपाटीपासून जवळ जवळ १५००० फुटावर असलेले शीख बांधवांचे हे तीर्थस्थान!

गुरुद्वारा-हेमकुंड साहिब









हेमकुंड/लक्ष्मण कुंड



















“हेमकुंड साहिब” गुरुद्वाराचं दर्शन आणि लक्ष्मण मंदिर बघून घेऊन पायी परत येताना भरपूर फुले बघायला मिळाली! 

ह्या जागेला पूर्वी "लोकपाल" म्हणत आणि श्रीरामाचा भाऊ लक्ष्मण इथे ध्यानधारणा करत असे, असे सांगितले जाते. ब्रम्हकमळ लक्ष्मणाला अर्पण करून आणि कुंडात आंघोळ करून आरोग्यसंपन्न आयुष्यची कामना केली जात असे. 




ब्ल्यू पॉपी जिकडे तिकडे बहरली होती. पावसाने काही फुले खराब झाली होती. मी आणि आरोहीला वेद होते ब्रम्हकमळाचे! 
रमेश सोबत...ब्रम्हकमळामध्ये

रमेश, आमचा घोडाचालक म्हणाला, “मी घेऊन जातो”..त्याने घोडे ऐके ठिकाणी सोडले आणि आम्ही तिघं निघालो! ब्रम्हकमळासाठी एका छोट्या टेकडीवर मिनी ट्रेकचं केला आम्ही! पाहतो तो काय जिकडे तिकडे ब्रम्हकमळे! ब्रम्हकमळाची बागचं फुलली होती! शेकडोंच्या संख्येने ब्रम्हकमळे होती! कोणकोणत्या ब्रम्हकमळाचा फोटो काढायचा असं झालं. ब्रम्हकमळाला वंदन करून आणि रमेशचे आभार मानून खाली उतरलो. घोड्याने खाली घांगरीया गावात यायला जवळजवळ दोन तास लागले!

घांगरीया गावात आम्ही हॉटेल देवलोक मध्ये राहिलो होतो. “फुलों की घाटी” चं प्रवेशद्वार अर्थात चेकपोस्ट तिथून अगदीच जवळ होतं. हवामानाचा अंदाज घेऊन व्हॅली सर्वांसाठी खुली करतात. सकाळी सात वाजता चेक पोस्ट उघडते आणि संध्याकाळी ५ च्या आत परत यावे लागते. चेक पोस्ट च्या इथुनचं एक रस्ता व्हॅलीला तर एक हेमकुंड साहिब ला जातो. चेक पोस्टला तुमचे बायोमेट्रिक पास तपासला आणि प्रवेश फी भरली की तुम्हाला एन्ट्री मिळते. चालायला सुरुवात केली की चं आजूबाजूची वेगवेगळी फुले तुमचं स्वागत करतात. पाय थबकतात, कॅमेरे बाहेर येतात...साधारण ११ हजार फुटावर असणारे हे ठिकाण आहे. जाण्याचा रस्ता वळणावळणाचा, फरशांचा आणि अत्यंत चढाईचा आहे. 

कंडी

पायी चढायचं नसेल तर “कंडी” मिळते.. तुम्ही विराजमान झालेली ही “कंडी” एक माणूस पाठीवर बांधून घेऊन जातो. कंडीने जाण्याचा खर्च आहे एक हजारापासून ३-४ हजारापर्यंत!

औली ते गोविंदघाट हे अंतर साधारण १५ किमी आहे. औली ला गढवाल निगमच्या हॉटेल मधे तर गोविंदघाटला आम्ही हॉटेल भगत येथे राहिलो होतो.   गोविंदघाट ते पुलना हे अंतर ३ किमी आहे. हा ३ किमी रस्ता आता डांबरी झाला आहे. पण काही वर्षापूर्वी हा कच्चा रस्ता होता आणि पायी जावे लागत होते. 

पुलना ते घांगरिया आणि भ्युंडर हे अंतर ११ किमी आहे. हे अंतर पक्क्या दगडी पाय-यांनी जोडलेले आहे. काठ लोखंडी गजांनी सावरून सुरक्षित केले आहे. साधारण १००० च्या वर पायऱ्या असतील. हे पायऱ्या पायी चढता येतात किंवा पोनी (घोडा) करता येतो. 


ठिकठिकाणी बसायला लोखंडी, सिमेंटची बाकडी आहेत, रेन शेल्टर आहेत, भरपूर संख्येत हॉटेल्स आहेत, पिण्याच्या पाण्याचे नळ आहेत, कुडादानी आहे, शौचालये आहेत, घोड्यासाठी सिमेंटच्या टाकीत पाणी साठवलेले आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी माणसे कचरा आणि घोड्याची लीद साफ करताना दिसतात आणि त्यांच्यामुळे हा परिसर एकदम निर्मल राहतो!

घोडा माझा फार हुशार
घोड्यांचे दोन वापर होतात, ज्यांना पायऱ्या चढायच्या नसतील ते घोड्यावर बसून जाऊ शकतात आणि सामान वाहतूक. सामान वाहतूकीमध्ये समावेश होतो तो लोखंडी गजापासून, किराणा, फळभाज्या ते यात्रेकरू-ट्रेकर्सच्या बॅगापर्यंत! एक माणूस दोन घोडे चालवतो. ठिकठिकाणी घोड्यांच्या खाद्याच्या गोनी दिसतात. घोड्याला दुखापत झाली, तो आजारी पडला तर त्याला चालवणारे लोकचं त्यावर झाडपाल्याचा इलाज करतात कारण घोड्यांचा इलाज करणारा डॉक्टर जवळपास नाही.

यात्रेकरू-ट्रेकर्स साठी कामधंदा सुरु राहतो तो साधारण जूनपासून-सप्टेंबरपर्यंतचं! एरवी बर्फवृष्टीने कामधंदा मंदावतो. बर्फामधील प्राणी पाहण्यासाठी आणि घांगरीया पर्यंतचे निसर्ग सौदर्य पाहण्यासाठी खासकरून ट्रेकर्स एरवी इथे येतात!

ह्या १००० च्या आसपासच्या पायऱ्या चढण्याचा अनुभव अजबचं! वळणावळणाच्या अति चढाईच्या (स्टिफ) पायऱ्या. पायी चढून जायला साधारणत: ४ तासापासून ते ८ तासापर्यंत वेळ लागतो. व्यक्तीच्या क्षमतेवर आणि किती थांबत जाता त्यावर हे अवलंबून! घोड्याला देखील अंदाजे चार तास लागतात.

पायऱ्या पायी चढल्या तर त्या अंगावर येतात, छातीवर प्रेशर आणतात, कंबर ताठरते की दोन्ही हात कंबरेवर ठेऊन पायऱ्या चढायची वेळ येते, गुडघे मोडून जातात, धाप लागते, थकायला होतं, श्वास फुलतो, कधी एकदा बसतो असं होतं, कधी एकदा पायऱ्या संपतात आणि ठिकाणी पोहोचतो असं होतं हे वेगळचं! त्यात हवामान कसं आहे त्यावर अवलंबून त्रास होतात ते ही वेगळेचं! ह्या प्रवासात एकच आधार महत्वाचा असतो, कधी काठीचा, कधी सहकाऱ्याचा तर कधी स्वत:चाचं!

घोड्यावर बसून जाण्याचा अनुभव यावेळी घेतला. राहून राहून बालपणातली कवियत्री शांता शेळके यांची कविता आठवत होती, “ टप टप टप टप टाकीत टापा काळे माझा घोडा...घोडा माझा फार हुशार पाठीवर मी होता स्वार, नुसता त्याला पुरे इशारा, कशास चाबूक ओठा!”. घोडा जेव्हा पायऱ्या चढतो तेव्हा त्यावर बसलेल्या माणसाने पुढे झुकायचे आणि घोडा जेव्हा पायऱ्या उतरतो तेव्हा त्यावर बसलेल्या माणसाने पाय पुढे करून स्वत:ला मागे रेटायचे ही पद्धत! पाय-यांवरून जाताना घोडा झिक-झॅक चालतो. एका काठापासून होऊन दुसऱ्या काठापर्यंत! दरीकाठाला घोडा इतका कडेला येतो की वाटतं की बस्स आता आपण खाली आपटणार....नकळतच तोंडातून हुंकार बाहेर पडतात... “ अरे भैया इसको संभालो..ये घोडा किधर जा रहा है”....पहाडाच्या कडेला जाताना घोडा इतका खेटून जातो की आपला पाय पहाडाला घासला जातो..वाटतं आता पाय मुरगळणार, खरचटणार, कातडी सोलवटून निघणार....फुलझाडे जर वाटेत आली तर आपल्याला झुकावचं लागतं. घोड्याच्या दांडीला धरून हात लाल-लाल होतात..सोलवटून निघतात...अंग खिळखिळ होत...कंबर, पाठ हादरून जाते...बैठकीचा भाग घासून निघतो.... आपटतोय की काय, पाय दगडाला घासून कातड सोलवटतयं की काय, पावसाच्या ओलेपणाने घोड्याच्या लीदमुळे झालेल्या निसरड्यावरून घोड्याचा पाय निसटतो की काय ही भीती वाटते ती वेगळीच! कधी एकदा घोड्यावरून खाली उतरतो असं होतं, आता घोडा नको त्यापेक्षा पायी चाललेलं परवडलं असही वाटतं....घोड्यावर चढवलेलं सामान आणि माणसे वाहून नेणारे घोडे बघीतले की मन कळवळतं ते ही वेगळचं! त्याचं वेळी घोड्याबद्दल सहानुभूतीपूर्ण जी आपुलकी वाटते ती अजुनचं वेगळी! प्राण्याची पराकोटीची परीक्षाचं! प्राण्याचा अधिकार, आपली हतबलता की कामधंद्याचा एक मार्ग ह्या दुखऱ्या मन द्वंद्वात आपण अडकतो. घोडा चालवतो त्या माणसासाठी किती कष्टाचं काम हे! ही माणसे १५-१६ वर्षा पासून ते वयाच्या सत्तरीपर्यंतची! एकावेळी दोन घोड्यांना मॅनेज करणे, ठरलेला थांबा येईपर्यंत कितीतरी तास पायऱ्या पायी चढणे, पावसाची चाहूल असेल तर झपाझप चढ चढणे....घोड्यावर आपण बसलो की फक्त आपल्या सुरक्षीततेचाच विचार असतो...आपल्या घोडयासोबत चालणारा माणूस थकला असेल का? त्याला दम लागला असेल का? हा विचारही मनात येत नाही...जीवन जगण्यासाठीचे हे कष्ट बघितले की मन हळहळतं...१००० + पाय-यांसाठी ७०० रु कमी वाटतात....

ही वाट दूर जाते
हा पाय-यांचा टप्पा आहे मात्र अतिशय सुंदर अनुभूती आहे! पहिलं तर ह्या पायऱ्याचं खुप आकर्षक वाटतात...काठाला असणारे तिरंगी रंगातले लोखंडी गज त्याची शोभा वाढवतात....वळणावळणाचा रस्ता मोहक वाटतो....कडेची पाने-फुले, शिळा, पहाड, धबधबे, झरे, नद्या, दगडधोंडे मन आकर्षित करून घेतात....वाहते पाणी, पाण्याचे नळ, घोड्यांसाठीच्या पाण्याच्या टाक्या ई. मुळे निर्माण होणारा थंडावा मन शांत करतो.....उत्साही ट्रेकर्स आणि हेमकुंड साहिब च्या दर्शनाला जाणारे खासकरून शीख समुदायाचे भाविक बघितले की मनातला उत्साह द्वीगुणीत होतो....“वाहे गुरु, ससरीयाकाल, नमस्ते” या शब्दांनी, “पोनी चाहिये, घोडा लेंगे, सफाईको दान करो” या आर्जवेने किंवा कैकवेळा केवळ स्मित हास्याने मन हेलावून जाते! या १०००+ पायऱ्या चढून गेल्यावर आपलं ठिकाण आलं पाय स्थिरावले, कंबर विसावली, गरम पाण्याने स्नान झाले, गरमागरम चहा पोटात गेला, भूकावलेलं पोट शांत झालं कि मन सुखावतं!


गंगा आरती-एक अलौकिक  दैवी अनुभव
ऋषिकेश यथील गंगा आरतीने सांगता झाल्यावर तर वाटलं जीवन सार्थकी आलं!

एफआरaay
देहरादूनचं “फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट” (एफआरआय) बघताना आणि समजून घेताना वाटलं “क्लिनिकल रिसर्च सोडून फॉरेस्ट रिसर्च जॉईन कराव” रिसर्च हा शब्द कॉमन आहे ना बास झालं मग!

“फुलों की घाटी” ह्या निसर्गरम्य जादूमय दुनियेच्या समाधी अवस्थेतून मी अजूनही बाहेर आलेली नाही. आजही विविधरंगी डूलणा-या फुलांसोबत मन “झोका” घेतयं, धुंद पाहून “डोळे पांढरे” होतायेत, अवाढव्य पहाड “मान उंचावताहेत”, हेमकुंड “विनम्र” करतोय आणि ब्रम्हकमळ “तृप्त” करतोय!

बुरांसचे सरबत
आजही, धुंदने भरलेल्या हलक्या पावसातील गरम गरम मॅगी आठवतेय, आमचे घोडे कबरा-सबरा आठवताहेत, ब्रम्हकमळासाठी केलेला अटटाहास आठवतोय, प्रत्येक फुलाबद्दल पराग सरांनी केलेलं मार्गदर्शन आठवतयं, गृरुद्वारामधील शांतता आणि प्रसन्नता आठवतेय, देवप्रयाग येथील भागीरथी आणि अलकनंदा नद्यांचा संगम होऊन पुढे ह्या संगमाला “गंगा” नाव पडले हे आठवतयं,  हेमकुंड साहिब येथील साजूक तुपातील खिचडीचे लंगर आठवतयं, ओवा घातलेला चहा आठवतोय, आरोहीच्या फोटोग्राफी टिप्स आठवतयेत, माझी उंच उडी आठवतेय, सविता मॅडमच्या कविता आठवतायेत, ऱ्होडोडेंडरॉन च्या सरबताची चव आठवतेय, पंडूकेश्वराचं मंदिर आठवतयं, वशिष्ठ गुहा आठवतेय, दातारकाकांनी आणलेल्या आल्याच्या वड्या आठवतायेत, तारानाथकाकांना पाहून

गंगा-अलकनंदा आणि भागीरथी नद्यांचा देवप्रयाग येथील संगम
काकुंच्या डोळ्यातून पाझरलेले आनंदाश्रू आठवतायेत, रोहितचा त्याच्या बाबांशी केलेला संवाद आठवतोय, पिकनिक गेम आठवतोय, अद्वैत आणि हर्षलचं आपल्याचं विश्वात रममाण होणं आठवतयं, स्मिता मॅडमचं खळाळतं हास्य आठवतयं, मयुरी मॅडमचं सौदर्य आठवतयं, ज्योतीची उंच उडी आठवतेय, अंजली मॅडम आणि माझ्यातला संवाद आठवतोय, एफआरआय मधील झाडांच्या कठीणपणावरची चर्चा आठवतेय, ज्योती मॅडमचा पेपरमधील लेख आठवतोय, शलाका मॅडमचा चालण्या-बोलण्यातील उत्साह आठवतोय, आरजी सरांची अथकता आठवतेय, भळगट सरांची संवेदनशीलता आठवतेय, मीनल आणि अनिता मॅडमची सेल्फी आठवतेय, पळसुले काकांचा गंगाकिनारी आरोहीने काढलेला फोटो आठवतोय, आनंदमधला ट्रेकर आठवतोय, संजीव काकांची क्लासिक फोटोग्राफी आठवतेय, संगीता मॅडमने दिलेल्या ट्रेकिंग टीप्स आठवतायेत आणि “फुलों की घाटी” मधलं पराग सरांचं वाक्य आठवतयं, “सविता, आहे ना हा स्वर्ग!”  

ह्याक्षणी माझे वडील मला राहून राहून आठवतायेत. एक कविता ते नेहमी आम्हाला म्हणून दाखवायचे. स्वर्गमय अशा इंद्राच्या बागेला अर्थात “फुलों की घाटी” ला माझी ही कवितारुपी स्मृतीफुले अर्पण!

बालपणी मजं फुलझाडांचा नाद असे फार
केली होती मागील दारी बाग मजेदार||
गुलाब, जाई, जुई, शेवंती, नाजूक निशीगंध
मदनबाण मोतिया चमेली लावियला कंद||
ठायी ठायी हरित तृणांचा जाहलिया कुंज
मधे केला एक मनोहर मालतीचा पुंज||
नित्य सकाळी प्रेम भरे मी जल सिंचन करोनी
वाढविली ही झाडे गेली कुसुमाही भरोनी||
फुललेली ती पुष्पवाटिका पाहुनी नयनाही
हर्ष जाहला जो ह्दयला उपमा त्या नाही||
शाळा सुटता सायंकाळी तेथे म्या जावे
सुखे बसावे तसे हसावे गाणे ही गावे||
कोकीळ, मैना, रावे, यावे पतंग वा भृंग
ऐकून त्याची मंजुळ गाणी व्हावे म्या दंग||
अशा रीतीने काल क्रमिता सहसा इक दिनी
प्रिय बागेला सोडून गेलो मी मातुल सदनी||
नीट काळजी ह्या बागेची माझ्या घे ताई
ऐसी विनंती नीज भगिनीला करुनी मी जाई||
वर्ष लोटले आलो फिरुनी आपुल्या सदनाला
मागे जावूनी बाग पाहता खेद मना झाला||
गेली होती सकलही झाडे हरहर ती सुकूनी
मग त्यावरी फुल कोठुनी दिसणार ते चुकुनी||
अश्रुबिंदू मग बाग पाहुनी रडलो मी इतुका
सजीव नाही फिरुनी झाली दुर्धर ती लतिका||
प्रिय विषयाला नको विसंबू प्राण जरी गेला
बालपणीच्या बागेने हा बोध मना केला||



फोटोसाठी खास आभार : व्हॅली ऑफ फ्लावर्स” २०१६ टीम

ह्या स्वर्गमय आणि जादूमय निसर्ग दुनियेची सफर करून आणल्याबद्दल मन:पूर्वक आभार: डॉ. पराग आणि डॉ. संगीता महाजन आणि बियाँड वाईल्ड ग्रुप 

हा स्वर्गमय अनुभव अधिक भावस्पर्शी करण्यासाठी खूप खूप आभार:  व्हॅली ऑफ फ्लावर्स” ऑगस्ट २०१६ टीम

ह्या सफर मधे साथ देणारी माझी रूपा : आरोही राणे  हिचे ही अत्यंत आभार !
आरोही-माझी रूम पार्टनर  (रूपा)



मढेघाट ते शिवथरघळ ट्रेक, २१ ऑगस्ट २०१६


एस. जी. ट्रेकर्स: मढेघाट ते शिवथरघळ ट्रेक: २१ ऑगस्ट २०१६


मढेघाट आणि शिवथरघळ! इतिहासातील दोन अजरामर ठिकाणे! एक अजरामर झाले शूरवीर तानाजी मालुसरे यांच्यामुळे तर दुसरे अजरामर झाले समर्थ रामदास स्वामींमुळे!


नरवीर तानाजी मालुसरे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यदलातील एक आघाडीचा योद्धा! “आधी लगीन कोंढाण्याचे (सिंहगड), मगच रायबाचे” हे घोषवाक्य शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकातून वाचत आलेले. “तलवारिशी लगीन लागलं” हे ब्रीद सार्थ ठरावं असा निष्ठावान शूरवीर! कोंढांणा लढाईत तानाजी मालुसरे कामी आले.शिवाजी महाराज अतीव दु:खाने उद्गारले, “गड आला पण सिंह गेला”! अंतिम विधीसाठी तानाजींचे “मढे” त्यांच्या मूळ गावी म्हणजेच पोलादपूर जवळील उमरठ गावी ज्या घाटमार्गाने नेण्यात आले त्या मार्गाला खुद्द शिवाजी महाराजांनी “मढेघाट” नाव दिले! पहिल्यांदा जेव्हा ही कथा मी ऐकली तेव्हा “मढे” हा शब्द ऐकून खूप विचित्र वाटले. फेरविचार करताना लक्षात आले आजचा प्रचलित शब्द आहे “शव, प्रेत, पार्थिव, मृत शरीर, मृत देह इ.” कदाचित त्यावेळचा बोलीभाषेतील प्रचलित शब्द “मढे” हा असावा! किती ही अभिमानाची गोष्ट की शिवाजी महाराजांचे निष्ठावान लढवय्ये तानाजींची “अंतिमयात्रा’ ह्या घाटमार्गाने नेण्यात आली!

समर्थ रामदास स्वामी, यांनी “दासबोध” हा ग्रंथ कल्याणस्वामींकरवी शिवथरघळ अर्थात सुंदरमठ इथे लिहिला. छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची पहिली भेट इथेच झाली असे म्हणतात!

भोर-महाड मार्गावरील अशी ही अत्यंत पवित्र दोन ठिकाणे! त्यांची पवित्रता अधिकच उजळून निघते ती पावसाळ्यातील अतिसुंदर लँडस्केप्स, भातखेचरे, रान पाने-फुले आणि जवळच्या कुंडलिका आणि सावित्री नदीच्या धबधब्यामुळे!

शिवभूमी मढेघाट परिसरात दोन प्रचंड मोठे धबधबे आहेत, लक्ष्मी आणि केळेश्वर! एस. जी ट्रेकर्स तर्फे आम्ही १४ जण वेल्हे मार्गे जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा प्रचंड प्रमाणात धुके होते. धबधबा वरून तर अजिबातचं दिसत नव्हता. खाली बघितलं तर फक्त धुक्याचा पांढरा रंग! त्या रंगातून आरपार काहीही दिसत नव्हतं. आम्ही धबधबा खाली जाऊन पाह्यचा ठरवलं. ओळख परेड झाल्यानंतर आम्ही चालायला सुरुवात केली. खाली जाण्याचा हा मार्ग छोट्या-मोठ्या दगड-गोट्यांचा आणि त्यातून वाहणाऱ्या पाण्याचा होता. दगडांवर शेवाळं साचलेलं होतं. अतिशय खबरदारी घेऊन जावं लागत होतं. माझ्या मदतीला राहुल, स्मिता आणि प्रशांत होते. धबधबा आला आणि मी निश्वास टाकला!





“धबधब्याखाली भिजायचं” मी तसं ठरवूनचं आले होते. माझा निर्णय इतका पक्का होता की स्मिता नसती तर विशाल, राहुल आणि प्रशांत यांच्या मदतीने का होईना मी धाडस केलचं असतं. 



स्मिता असल्याने माझ्या धाडस सुकर झालं! हे धाडस अशासाठी की “धबधब्याखाली भिजण्यासाठीचं हे पहिलं पाऊल होतं”! सगळी इन्हीबिश्न्स सोडून भिजण्याचा आनंद अनुभवण हा प्रयोग मला करायचाचं होता आणि मी तो केला. पाण्याखाली उभे राहिल्याने सुरुवातीला थोडी थंडी वाजली, शहारा जाणवत होता. स्मिताचा आधार मिळाल्याने थोडावेळ तग धरू शकले. मजा आली. सुदैवाने तेव्हा पाऊस नव्हता नाहीतर काय वाटलं असतं कुणास ठावूक! धबधबा आणि पाऊस ह्यातला फरक कसा अनुभवला असता नाही सांगता येतं. एक छान वाटलं. श्रावण महिना होता. ऊन आणि सावलीचा खेळ! कधी पाऊस तर कधी ऊन! बालकवींची कविता आठवतचं होती “श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे! क्षणात येते सर सर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे!” अशा ह्या श्रावणात पाण्याखाली भिजण्याची मजा काही औरचं! “क्षणात ओलेचिंब तर क्षणात कोरडे!”. ओलेचिंब झाल्यानंतर आणि थोडा शहारा अंगात असताना जेव्हा उन्हाची तिरिप अंगावर पडते..अनुभवलयं कधी? वाव....उन्हाचा तडाखाही उबदार वाटतो. हवाहवासा वाटतो. कपडे जास्तवेळ ओलेचिंब राहतचं नाहीत! क्षणात ते कोरडे होतात. नाहीतर साधारणत: ओले कपडे कधी एकदा बदलतो असं होऊन जातं. श्रावण महिन्याची ही कमाल मला तेव्हा जाणवली! यामुळे हे भिजण तसं बाधतही नाही. श्रावण महिना आहेचं तसा खास! चहुकडे हिरवळ घेऊन येतो, सणामुळे एक पावित्र्य घेऊन येतो! हा ट्रेक म्हणूनच खास होता. तीन पवित्र गोष्टींचा संगम ..मढेघाट, शिवथरघळ आणि श्रावण महिना!

धबधब्याचा मनसोक्त आनंद घेऊन शिवथरघळ कडे निघालो. हा उतरणीचा एक पॅचं महाकठीण होता. दगड कसेही विखुरलेले...त्यावरून मार्गक्रमण करणं एक कठीण परीक्षाचं! थोडा तोल जात होता. त्या पॅचचं इतकं दडपण आलं की विशालला शेवटी विचारलचं “बाबारे, शिवथरघळ पर्यंतचा मार्ग असाचं आहे की काय?”....खबरदारी घेत तो पॅच कापत असताना आजूबाजूला फारसं लक्ष जात नव्हतं, हा मार्ग घन्या जंगलातून जातो. 

दुतर्फा हिरवीगार झाडी..फुललेली रानफुले...
अगदी छोटयातलं छोटं फुलं निसर्गसौदर्य खुलवतं होतं. काळ्याशार पाषाणावर आणि हिरव्यागार पार्श्वभूमीवर ही पांढरी, गुलाबी, नारंगी रंगाची फुले उठावदार दिसत होती...नजर खेचून घेत होती...











ह्या संपूर्ण ट्रेक मार्गावरचं अतिशय सुंदर रंगफुले बघायला मिळाली! पावसामुळे त्यावर विसावलेले जलबिंदू डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवण्याचा मोह आवरतं नव्हता!


दगडांचा पॅच संपला आणि समोर जिकडे जिकडे हिरवळ! हिरव्या विविध रंगछटा! “हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे....” ही कविता आठवत होती. मागे वळून पाहवं तो “नभं उतरू आलेले”! ....“जरा विसावू या वळणावर”...अशी ही भावुकता....निसर्गाचा आनंद घेण्याच्या छान मूडमध्ये विशाल देखील होता...त्याच्या नवीन मोबाईलची जादू की अजून काही..माहित नाही...निसर्गाचे फोटो काढत होता... 

आमचा वॉक आणि राहुल, अविनाश आणि सुरेश यांचा डान्स “स्लो मोशन” मध्ये त्याने आपल्या मोबाईल कॅमे-याने शूट केला! 
पाहताना अदभूतरम्य वाटतो तो! आणि मग लक्षात येतं “हे फक्त विशालचं करू शकतो”! डान्सच्या वेळी राहुलने मला विचारले, “मॅडम येताय?”...म्हटलं, “राजा, आज मी पहिल्यांदा धबधब्याखाली भिजलेय... आता डान्स?..नको”....असं वाटलं की त्याक्षणी मी डान्स केला असताचं तर राहुलने तिथेही मला साथ-सोबत केली असती! मलाही वाटलं, “एक दिवस तो ही प्रायोगिक आनंद मी घेईन”....कारण डान्सचा संबध फक्त आणि फक्त आनंदाशी आहे! स्वत:ला खूष करण्याशी आहे!

आता पुढचा टप्पा सुरु झाला. इथे गवताळ कुरणात पाणी साचलं होत आणि चिखलाने माखलेलं होतं. त्यावरून चालत असताना माझा पाय घसरला आणि जोरात खाली आपटले..कळूनचं आलं नाही....राहुल, स्मिता आणि प्रशांत मदतीसाठी सरसावले... “बॅग घेऊ का” विचारलं....ही परीक्षा इथेचं संपली नाही तर आता एक ब-यापैकी एक मोठा झरा ओलांडायचा होता...अवतीभवती असलेल्या दगडांवरच्या शेवाळामुळे ओलांडायला कठीण वाटतं होता. विशाल पुढे होता आणि मला हाताचा आधार दिला आणि झरा ओलांडून दिला. मला त्याक्षणी “ढाक बहिरी” चा ट्रेक आठवला. तो अवघड रॉक पॅच पार करण्यासाठी, विशाल असाचं पुढे सरसावला होता! 

खासकरून उषा आणि मी रानफुलांचा आनंद घेत, फोटो काढत चाललो होतो. नवीन नवीन फुले पुढे जाऊन मी उषाला दाखवत होते आणि ती फोटो काढत होती. उषा एक उत्तम फोटोग्राफर आहे. माझं ट्रेकिंग बघून ट्रेकिंगसाठी प्रेरित झालेली आमच्या ऑफिसमधील ही पहिली मुलगी! तिने आणि मी भरपूर ट्रेक्स एकत्र केले. ट्रेकिंगचा आनंद घेताना आणि फोटो काढताना उषाला पाहणं हा माझ्यासाठी काही कमी आनंदाचा क्षण नसतो! उषा असली की कॅमेरा सोबत घेणं किंवा फोटो काढण्याचे कष्ट देखील मी घेत नाही. तिने काढलेल्या फोटोंच कौतुक शब्दात करताचं येत नाही...त्या फोटोंचा आनंद घ्यायचा बस्स!

असो. आता रानवडी खुर्द गाव आलं. निसर्गरम्य परिसरात हे गाव वसलेलं आहे. गावाला पाहून, स्मिताला तिच्या कोकणगावची  आठवण झाली.....जवळच्याचं नदीवर एक पूल आहे..अशा प्रकारचे पूल देखील निसर्गसौदर्यात भर घालतात! आणि सांगतात “विशाल, एक सेल्फी तो बनती है यार”!

शिवथरघळ जवळ येऊ लागलं होतं. आता ब-यापैकी सपाट रस्ता होता. माझा उजवा गुडघा किंचितसा दुखत होता. तो स्प्रेन झाल्यापासून पहिल्यांदाच दुखत होता. स्मिता काळजीने विचारत होती, “स्प्रे मारू का? आयोडेक्स लावू का?”. ..तिने आयोडेक्स लावले आणि शिवथरघळला पोहोचल्यावर जरज पडल्यास परत एकदा आयोडेक्स लावायचे आम्ही ठरवले!

शिवथरघळ अर्थात शिवथरघळईला पोहोचल्यावर “श्री सुंदर मठ, शिवथरघळ” असं लिहिलेली कमान आपलं स्वागत करते. 






काही पायऱ्या चढून गेल्यावर गुहेमध्ये, “दासबोध” सांगताना समर्थ रामदासस्वामी आणि ते लिहिताना श्री कल्याणस्वामी असा सुंदरसा मुर्तीरूप देखावा आहे ! शेजारीच राम, सीता, लक्ष्मण आणि ह्ननुमानची सुबकशी मूर्ती आहे. 
ह्या पावन परिसरात आकर्षून घेतो तो प्रचंड मोठा पाण्याचा धबधबा! त्याचा आवाज इतका जोरात येतो की काही वेळा बोललेलं ऐकायला देखील येत नाही! 


यावेळी इथे भाजी विक्रेता देखील बघायला मिळाले. अळू, तांदूळजा अर्थात माठ, टाकळी ह्या हिरव्यागार आणि ताज्या भाज्या विकायला होत्या! पल्लवीने भाज्या खरेदी काय केल्या त्यावरून बरेच हास्य फवारे उडाले! भाजी गाडीत निवडण्यापासून, भाजी बनवेपर्यंतचं नव्हे तर भाजी छातीशी कुरवाळून फोटो काढेपर्यंत!

गरमा-गरम पिठलं, तांदळाची भाकरी, पापड, लोणचं, बटाटा आणि मटकीची भाजी, भात-वरण आणि वरून परत चहा....वाव..असं पूर्णान्न मिळालं की पोटोबाचं काय आपणही खूषचं!

पूर्ण ट्रेकभर मला विशाल आणि टीमचं कौतुक वाटतं होतं. कोणता ट्रेक कधी काढावा ह्याचं उत्तम ज्ञान ह्या मुलांना आहे! विशाल तर मला वाटतं ट्रेकचं “जगतो”!......ह्या ट्रेकचा मार्ग लक्षात ठेवणं किती अवघड गोष्ट आहे हे आपण ट्रेक केल्यावर लक्षात येतं!


अविनाशने मला विचारले, “मॅडम, तुम्ही या वयात ट्रेकिंग कसं काय सुरु केलं?”....मी नेहमी जे उत्तर देते तेच त्यालाही दिलं, “एकदा गेले, जमलं, आवडलं, सुरु ठेवलं”.....पण खरं तर ह्या प्रश्नाचं उत्तर मलाही माहित नाही....एकदा गेले...जमलं, आवडलं हे तर आहेच पण एका ट्रेक नंतर दुसरा करावासा वाटला.....दुसऱ्या नंतर तीसरा.....आणि असे कित्येक.....पण “का” ह्याचा शोध खरंतर अजूनही सुरूचं आहे!

प्रशांत बरोबरचा हा माझा दुसराचं ट्रेक! ह्या ही मुलाने मला खूप सुंदर साथ केली! ह्यावेळी देखील मदतीला तो तत्पर होता! मी ट्रेक करत जाण्याचं महत्वाचं कारण हे ही आहे की एस.जी. आणि हिरकणी टीम सोबतचं मला प्रशांत सारखे काही सहकारी मिळाले ज्यांच्यामुळे माझं ट्रेक करणं सुरु राहिलं!

हा ट्रेक माझ्यासाठी एक निर्मळ आनंद होता! स्मिता सोबतच्या गप्पा पासून ते गाडीतल्या गाण्यांपर्यंत! हो...यावेळी चक्क मी गाणी म्हटली...मलाच काय सर्वांना माहित आहे मला गाण्याचा आवाज नाही! तरीही गाणी म्हटली.... “मी गाते” म्हणायचा अवकाश की विशाल सर्वांना शांत करायचा... “झिलमिल सितारोंका आंगन होगा, वो चांद खिला वो तारे हसे, धीरे से आजा रे अखियन में निंदिया आजा रे आजा, ये समा, समा है ये प्यार का”....बापरे... आयत्यावेळी आठवलेली ही गाणी....हे माझं रूप बघूनचं बहुधा राहुलने मला डान्स करण्याबद्दलही विचारलं असावं!

विशालने यावेळी “गाडी में छन न न, छन न न होय रे..” हे गाण म्हटलं आणि याच्या मागोमाग आम्ही.....त्या गाण्याने तर मजा आलीच पण अगदी बालगीतापासून, देशभक्ती गीत, शौर्यगीते, लावणी, गाने-नये-पुराने पर्यंत! राहुल, अविनाश, स्मिता, पल्लवी, प्रशांत हे सर्वजण गाणी गात होते..उषा गाणी सुचवत देखीलं होती! आलेख, मिलिंद आठवत होते......

येताना वरंधा घाट मार्गे आलो. घाटाचं सौदर्य अनुभवण्यासाठी थोडावेळ थांबलो.

मढेघाट ते शिवथरघळ एक अदभूत पावन ट्रेक आहे! तो करावाही श्रावण महिन्यातचं! आलेख म्हणालाचं होता “ हा ट्रेक कराचं.” पावसाच्या काही सरी पडून गेल्यावर जून-जुलै महिन्यात हा ट्रेक मध्ये साप आणि अन्य पशू-पक्षी देखील दिसतात. असा हा निसर्गाने नटलेला ट्रेक आहे! सह्याद्री रांगेतील रानफुले, पशु-पक्षी वैभव अभ्यासण्यात हा ट्रेक मोलाची भर घालतो!

ह्या निसर्गसंपन्न आणि पावन ट्रेकची सांगता मग समर्थ रामदास स्वामींच्या “मनाचे श्लोक” मधील एका श्लोकपंक्तीनेचं करूयात,

“जनी सर्वसुखी असा कोण आहे| विचारें मना तुचिं शोधूनी पाहे||
जय जय रघुवीर समर्थ!!

(फोटो आभार: उषा बालसुब्रमण्यम, विशाल काकडे आणि प्रशांत शिंदे)