शिवनेरी ट्रेक (शिवजयंती स्पेशल), १९ फेब्रुवारी २०१६

एक्स्ट्रीम ट्रेकर्स बरोबरच हा माझा पहिलाच ट्रेक होता. २५ डिसेंबर २०१५ रोजी, भिगवण-भुलेश्वर ला पक्षी निरीक्षणसाठी त्यांच्यासोबत गेलेले असल्याने तशी प्रतीक खर्डेकरशी माझी ओळख झालेली होती.

जेव्हा शिवनेरी ट्रेक चा पोस्ट मी बघितला तेव्हा ट्रेकला जाण्याचा निर्णय मी ताबडतोब घेऊन टाकला. ट्रेकचे दोन पर्याय होते. एक पाय-यांनी आणि दूसरा साखळ दांडीच्या वाटेने!

शिवनेरी, शिवरायांचे जन्मस्थान! ३५०० फुट उंचीचा, जुन्नर तालुक्यातील हा किल्ला!

मी ४-५ वी इयत्तेत असल्यापासून “शिवराय आणि शिवनेरी” विषयी शाळेतील शिक्षकांकडून ऐकत आलेली आहे. पुढे शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकातून त्यांच्याबद्दल वाचायलाही मिळत गेले. मोठे होऊ लागले तसे मग “श्रीमानयोगी”, “छावा” सारख्या कादंब-याही वाचनातून गेल्या. मतितार्थ काय तर शिवनेरीचं दर्शन घ्यायची इच्छा ही बालपणापासूनची! ती पूर्ण होत होती ती वयाच्या ४७ व्या वर्षी!

शिवनेरी ट्रेक हा त्रिवेणी योग साधून आला होता, शिवजयंती, ट्रेक आणि इच्छापूर्ती! खूप संतोष वाटतं होता की उराशी बाळगलेलं आणि डोळ्यात साठवलेलं स्वप्न आज पूर्ण होणार!

आम्ही आठ सहभागी होतो. प्रतीकला पायाला एका ट्रेक दरम्यान मोठी दुखापत झाली होती त्यामुळे तो जवळजवळ २ महिने ट्रेक करू शकला नव्हता. प्रतीक म्हणाला, “ट्रेकला पुन्हा सुरुवात करण्यासाठी शिवजयंतीसारखा दुसरा दिवस नाही. आपण नऊ जण आहोत आणि ट्रेक करणार आहोत”. त्याच्या आवाजात एक जोश होता! आग, तिच्याच ज्वालांनी होरपळू लागल्यावर तिला पण पाण्याची शीतलता हवीहवीशी वाटवी.....होरपळणारी आग जणू पाण्याचीच वाट पाहत होती! तसं वाटलं मला प्रतीकचं बोलणं ऐकून!  

आमच्याबरोबर रिचर्ड लोबो सर होते. एस.जी ट्रेकर्स बरोबर ते वासोटा जंगल ट्रेकला गेले होते आणि एस.जी च्या ग्रुपवर माझे पोस्ट त्यांनी बघितले होते.

गाडीत गप्पा रंगल्या. प्रतीक बडबड्या आहे. मनापासून बोलतो आणि मनातलं बोलतो. त्याच्या बोलण्यात एक सच्चेपणा जाणवतो! त्यामुळे नारायणगाव कधी आलं कळालच नाही. तिथे एक सर आम्हाला जॉईन झाले. ते अहमदनगर भागात राहत्तात आणि प्रतीकच्या ट्रेक्सला असतात. प्रतीक कडून इन्स्पायर होऊन त्यांनी त्या भागात आपल्या सहका-यांच्या मनात ट्रेकिंग रुजवायला सुरुवात केली. सर रुजलेले ट्रेकर वाटतं होते. गळ्यात कॅमेरा अडकवलेला, हातात ट्रेकिंग स्टिक, डोक्याला टोपी....ते आणि लोबो सरांशी ट्रेकिंगच्या गप्पा मी एन्जॉय केल्या!

आम्ही सर्वजण साखळ दांडीच्या मार्गाने ट्रेक करणार होतो. जिथून ट्रेकला सुरुवात होणार होती तो शिवनेरीचा गडपायथा आला. गाडीत आणि नाश्त्याच्या दरम्यान ओळख झाल्याने सरळ ट्रेकिंगलाच सुरुवात केली. गडपायथ्यावरूनचं शिवनेरी गडाचं दर्शन होत होतं. कडेलोट टोक आणि लेण्या ठळकपणे दिसत होत्या. अगदी जिथून ट्रेकला सुरुवात होते तिथे माझ्या कंबरेपेक्षा उंचीची सिमेंटची भिंत होती. वाटलं झालं, इथूनच परीक्षेचे क्षण सुरु! नी-स्प्रेन झाल्यामुळे अशा गोष्टींसाठी मी जरा धास्तावतचं होते! एक पाय ठेवायला भिंतीला खाचं पण नाही! भिंतीवर हात ठेऊन पाय खेचायची भीती वाटतं होती..परत गुडघा दुखावला गेला तर?...पण प्रतीकच्या मदतीने भिंत पार झाली!

हा पुढचा रस्ता आता अरुंद, स्टिफ होता..एका वेळी एकच जण जाऊ शकेल असा. आधारासाठी दुतर्फा झाडे होती. पानगळ सुरु झाल्याने वाळलेल्या पानांवर पाय पडला की आवाज येत होता. उन्हाळयाची चाहूल....उकाडा भासत होता, हलकासा घाम येत होता...इलेक्ट्राल मिश्रित पाणी पिण्याचं काम सुरु होतं. ह्या ट्रेकच्या ह्या रस्त्यावर काही  रॉक पॅचेस देखील होते पण पार करायला तितकेसे कठीण नव्हते.

प्रतीक हा मुलगा एक भारी आहे. नुकताच मोठ्या दुखण्यातून रिकव्हर झाला होता. पायाने लंगडत होता. पण त्याही परिस्थितीत त्याचा उत्साह आणि चालण्याची गती अचंबित करणारी होती!

हा चढ पार करून आम्ही लेण्यांजवळ पोहोचलो. दगडामध्ये कोरलेल्या लेण्या बघितल्या. स्तूप, पाण्याचे हौद....कातळ पाषाणातील ह्या लेण्या अतिशय मोहक आहेत. 

आता पर्यंत ह्या वाटेवर आम्हीच होतो पण आता येणा-यांची गर्दी होऊ लागली. ह्या लेण्यापाहून पुढे निघाल्यावर एक अरुंद मार्ग होता. एका बाजूला खोल दरी आणि दुस-या बाजूला लेण्यांची भिंत! थोडसं घाबरायला झालं! खूप खबरदारी घेऊन तो पॅचं पार करावा लागला.

आता गड जवळ येऊ लागला. शिवजयंती उत्सवाचे पडसाद कानावर येऊ लागले. इथे पोलिसांची गस्त होती. गडावरचा कार्यक्रम झाल्याशिवाय गडावर लोकांना सोडत नव्हते. भरपूर गर्दी झाली होती. त्यावेळेत आम्ही आमच्याजवळचा खाऊ खाऊन घेतला.

गडाकडे जाणा-या ह्या वाटेवर अतिशय कठीण असा रॉक पॅच होता.भयानक खतरनाक! दगडात पाय-या कोरलेल्या, अतिशय अरुंद, एका वेळी कसाबसा एकच पाय बसेल एवढीच त्यांची लांबी असलेल्या २५-३० पाय-या! एका बाजूला दगडी भिंत आणि दुस-या बाजूला खोल दरी! आधाराला काही जागाच नाही. एकावेळी एकच जण जाऊ शकेल आणि दुस-याला मदतीला यायला वावच नाही. जीव मुठीत धरून चढण काय असतं हे तेव्हा उमगलं!

हा रॉक पॅच पार करून आम्ही गडावर पोहोचलो. शिवजयंती उत्सव! गडाला एक वेगळचं सौदर्य प्राप्त झालं होतं! गडावरच्या वास्तू फुलांनी सजल्या होत्या. 

शिवकुंज किंवा शिवस्मारक तेथील जिजाऊ आणि बालशिवाजीचा पंचधातुतील पुतळा आकर्षून घेत होता. तो पाहून जिजाऊ “एक गुरु” या नात्याने असणा-या शिवाजी महाराजांच्या इतिहासातील गोष्टी आठवत होत्या!


शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. शिवाजी महाराजांचा पुतळा आणि पाळणा फुलांनी इतके सुशोभित केले की डोळासुखचं! त्या जागेचे पावित्र्य पाहून तुम्ही नतमस्तक झाला नाही तर नवलचं! 

कडेलोट-टकमक टोका वरून जुन्नर गावचा नजरा डोळ्यात मावत नव्हता. शिवनेरी आणि आजूबाजूच्या गडांची माहिती प्रतीक ने द्यायला सुरुवात केली. आलेले लोक ही त्याचा प्रभावी आवाज ऐकून माहिती ऐकण्यासाठी थबकले. जवळजवळ २५-३० लोक गोळा झाले! त्यावेळी प्रतीकचे रुप मनात साठवण्यासारखे होते. त्याच्या आवाजात त्याचा इतिहासाचा अभ्यास, रुची, वाचनावर केलेला विचार दिसून येत होता. शिवराय आणि त्यावेळचा इतिहासाबद्दल प्रतीक जवळजवळ २०-२५ मिनिट बोलत होता. त्यावेळी दळणवळण कसे होते, कडेलोट कुठल्या परिस्थितीत केला जायचा इ. बद्दल त्याने लाजवाब माहिती दिली. तो बोलत होता आणि त्याचं बोलणं पूर्ण होईपर्यंत तिथे स्तब्धता होती..शांतता होती! सर्वजण मन लावून, एकाग्र होऊन, समरूप होऊन त्याचं बोलणं ऐकत होते. त्याचं बोलणं संपल्यावर टाळ्यांचा इतका कडकडाट झाला की असं वाटलं शिवजयंती आता ख-या अर्थाने साजरी झाली! शिवरायांना मानाचा मुजराचं होता तो!

अंबरखाना (धान्यकोठार), कमानी मस्जिद, गंगा-जमुना टँक, बदामी तलाव बघितल आणि परतीच्या प्रवासाला निघालो. आता आम्ही पाय-यांच्या मार्गाने जाणार होतो. वाटेत पहिल्यांदा लागले ते शिवाई देवीचे मंदिर! जागृत देवस्थान! उभ्या कड्याच्या गर्भात वसलेले देवीमंदिर! श्रीमानयोगी मध्ये उल्लेख आहे, जिजाबाई म्हणतात, “शिवाईला नवस बोलले होते...मुलाचं नाव "शिवाजी" ठेऊयात”....

शिवाई दरवाजा, मेणा दरवाजा, कुलूप दरवाजा, हत्ती दरवाजा, पीर दरवाजा, गणेश दरवाजा, महादरवाजा असे एकूण सात दरवाजे आहेत. अति भव्य, बुलंद आणि पाषाणात कोरलेले. हे दरवाजे पाहून त्याकाळी गर्भवती जिजाऊंचा शाही मेणा किती आस्ते आस्ते गडावर आणावा लागला असेल ह्याची कल्पना येते!  

गडाला किती पाय-या आहेत कुणास ठाऊक पण त्या अतिशय आकर्षक आहेत. आजूबाजूची बाग फुलांनी सजली होती. मी पाय-या उतरत होते खरी पण सारखं सारखं मागे वळून पाहण्याचा मोह आवरत नव्हता. काय कराव म्हणजे हे सगळ मनात साठवता येईल आणि आपल्या सोबत घेऊन जाता येईल असं वाटत होतं. " अभिमानाने ऊर भरून येतो" म्हणजे काय होतं हे अनुभवलं!

परतीच्या प्रवासात इच्छापूर्तीचा आनंद तर होताचं पण एका इतिहासात समरूप झालो ह्याच समाधान जास्त मोठं होतं!


धन्य तो शिवराय ! धन्य ती जिजाऊ! 
जय शिवराय!






सुधागड ट्रेक, २४ जुलै २०१६ (फक्त मुलींसाठी)


खास मुलींकरता, “हिरकणी अॅडव्हेंचर क्लब” एस.जी ट्रेकर्स ने सुरु केला. मुलींनी ट्रेकिंग, रॅपलिंग, राफ्टिंग इ सारख्या अॅटीव्हीटीज मध्ये सक्रियतेने भाग घ्यावा ह्या उद्देश ह्यामागे होता. हिरकणीचा पहिला ट्रेक लोहगडला होता आणि त्यात जवळ जवळ ३२ मुलींनी भाग घेतला. सुधागड, हिरकणीचा दुसरा ट्रेक होता.

माझा हिरकणी बरोबर हा पहिलाच ट्रेक होता. “फक्त मुलींचा ट्रेक” हा अनुभव मला घ्यायचा होता. 

साधारण सकाळी ७ च्या सुमारास स्वारगेट वरून खाजगी वाहनाने निघालो. नेहाली, वैष्णवी आणि सायली ह्या हिरकणीच्या कोऑर्डीनेटर आमच्या सोबत होत्या. पाच जणीं आयत्या वेळी न आल्याने आम्ही आठ जणींचं सहभागी होतो!

सुधागडसाठी, ठाकूरवाडी, पाली हे बेस व्हिलेज होते. पुण्यातून ताम्हिणी घाटातून तिथे पोहोचायला साधारण दोन ते अडिच तास लागणार होते. गाडीत अंताक्षरी रंगली, झिंगाट गाण्यावर डान्स झाला. मिलिंद आणि भगवानही मुलींना जॉइन झाले. मिलिंदच्या आवाजातील गाणी ऐकण्याची माझी इच्छा पूर्ण झाली!

ताम्हिणी घाटातून पावसाळ्यात प्रवास करणं हा एक नेत्रसुखद अनुभव आहे! वेडीवाकडी वळणे, हिरवाईने नटलेले ऊंच ऊंच डोंगर, मंत्रमुग्ध करणाऱ्या हिरव्या-पोपटी रंगाच्या अगणित छटा, धरणाचे अथांग पाणी, पाण्यात पडलेली डोंगर छाया, रस्त्याच्या दुतर्फा ओसंडून वाहणारे छोटे मोठे धबधबे, क्लासिक वेदर, आल्हाददायक गारठा, मधो-मध जाणार सुंदरसा डांबरी रस्ता......असं वाटतं होतं गाडीतून खाली उतरावं आणि पायी चालावं.....चालतचं रहाव....आपल्याच धुंदीत..आपल्याच मस्तीत..... स्वत:ला शांत निसर्गाच्या स्वाधीन करून... विसरून जावं... आपण कोण आहोत, कुठे चाललो आहोत.... चालतं रहाव....फक्त आपल्या श्वासासोबत!

ताम्हिणी घाट संपताच सुरु होतो तो कोकणपट्टा! कोकण प्रदेश त्याच्या भौगोलिक रचनेवरून! एक विशीष्ट प्रकारची घरे, थोडी बसकी, खासकरून चौकोनी, झावळ्यांनी आच्छादलेली, मातीने लिंपलेली, एकदरवाजी, घराभोवती पाना-फुलांची आहट, ब्लाऊज आणि साडी गुडघ्यापर्यंत गुंडाळलेल्या स्त्रिया, त्याची चेह-याची रेखीव ठेवण, काळसर आकर्षक आणि तकाकीदार रंग! हा कोकणपट्टा अति घनदाट रानझाडीने व्यापलेला. झाडे बघितलीच की कोणाच्याही लक्षात यावं की ही साधी-सुधी झाडे नाहीत. वनौषधींनी ग्रासलेला अनमोल ठेवा!

ठाकूरवाडी कधी आलं समजूनच आलं नाही! ठाकूर आदिवासींची वस्ती! हिरव्यागार डोंगरांनी, भातखेचरांनी वेढलेल्या भागातील एक छोटी वस्ती! अंगणवाडीच्या आवारात चार छोटी मुलं-मुली “टीपरीपाणी” खेळत होते!
लहानपणी मी पण हा खेळ खेळले, पण हा खेळ खेळतात कसा हे आज आठवेचना....तरीही त्या मुलांबरोबर तो खेळ खेळण्यासाठी मी स्वत:ला आवरू शकले नाही! 
   
आम्हाला जेवण गडावर मिळणार होत. इथले लोक स्वयंपाक गावात करून जेवण वर गडावर घेऊन जातात! गड चढल्यावर लक्षात येतं की हे किती कष्टाचं काम आहे. काहीजण तर अनवाणी झपाझप जाताना दिसतात. गडावरून खेकडे पिशवीत गोळा करून आणतात....खेकड्याच कालवण! आदिवासीं लोकांच खास मिष्टान्न!

नेहाली, वैष्णवी आणि सायलीने ओळख परेड घेतली आणि गडाची माहिती सांगितली. सुधागड अर्थात भोरपगड, पुण्यापासून साधारण १२० किमी अंतरावर, उंची ६२० मीटर (२०३० फुट)..बेस व्हिलेज ठाकूरवाडी, पाली, जिल्हा, रायगड! शिवाजी महाराजांनी ह्या गडाचा विचार मराठी साम्राज्याची राजधानी म्हणून केला होता. ह्या त्यांच्या विचारावरूनच गडाची भव्यता लक्षात येते!

खरंतर गड चढायला तसा खूप छोटा...गड आणि त्याचा बुरुज वाडीतुनच दिसत होता....ट्रेकचं प्रवेशद्वार भन्नाटच! अंगणवाडीला लागुनच एक आणि काही पावलांवर दुसरे प्रवेशद्वार! लाकडी उभे-आडवे ओंडके रोवलेले..ते पार करून जायचे...दोन प्रवेशद्वारांमध्ये एक माणूस जाईल इतकी छोटी पायवाट आणि दोन्ही बाजूला भात खेचरे! वाव......गडाच्या सौदर्याची झलक इथेच दिसून येते! इथून पुढची वाट आदिवासींच्या पाडयांतूनच जाते आणि मग सुरु होतो जंगलातून ट्रेकचा रस्ता!

कोकणभाग असल्याने आणि पाऊस थांबला असल्याने ह्युमीडीटी जास्त होती. त्यात वारा नाही..भयानक ऊकाडा वाटत होता आणि घामामुळे थकायला होतं होतं. काही मुलींचा पहिला-दुसराच ट्रेक होता. त्यांच्या पोट-या आणि मांड्या भरून येत होत्या...काही क्षण विश्रांती घेतली की ट्रेक सुरु होत होता. मला दम लागत होता पण चालण्याची गती बरी होती. मुली म्हणत होत्या, “मॅडम तुमचा स्टॅमीना जबरदस्त आहे.”! मिलिंद म्हणे, “ह्या हवामानातही तुम्ही आज लीड करताय”! २-३ ठिकाणी रॉक पॅचेस होते पण चढायला तितकेसे कठीण नव्हते. फक्त दगडावरील शेवाळाचा अंदाज घेत चढाव लागत होतं. ट्रेक परिसर सर्वांगसुंदर होता. मला सर्वात भावले ते इथले अवाजवी, अवाढव्य मोठे पत्थर! वेगवेगळ्या आकाराचे.....ओबडधोबड...काही वरून पसरट तर काही अणकुचीदार....काही शेवाळाने माखलेले तर काही पाणी साचलेले! हे पत्थर पावसाच्या पाण्याने ओले झाल्याने त्यांना तकाकी आली होती. गर्द झाडीत ते पत्थर शोभा वाढवत होते. शेवाळामुळे ते नक्षीदार दिसत होते!

सुधागडला दोन-तीन ठिकाणी शिड्या आहेत. एका ठिकाणी जुनी शिडी बघायला मिळते. ती शिडी ज्या कातळकड्याला भिडते त्यावरून तो पॅच चढायला किती रिस्की असेल याची कल्पना येते. म्हणूनच नव्या शिड्या बनवल्या असाव्यात.





नव्या शिड्या भक्कम आणि चढायला सेफ आहेत. ट्रेकच्या आणि गडाच्या सौदर्यात त्या भरच घालतात!

पहिल्या प्लॅटू वर आम्ही पोहोचलो. तिथून दिसणार निसर्ग सौदर्य अवर्णातीत होत! फोटो घेण्याचा मोह आवरला नाही तर नवलचं!

आता थोडाच टप्पा पार करायचा होता आणि जोराचा पाऊस आला. मी तर भिजायचं ठरवलच होतं. ह्या काही ट्रेक दरम्यानच पावसात भिजायला आणि पावसाच्या सरीवर सरी अंगावर झेलायला मी शिकले होते. ही अनुभूती जितकी आल्हाददायक तितकीच अंगावर शहारा आणणारी!

शेवटच्या दगडी पाय-या पार करून गडावर पोहोचलो. आता होता तो नजर जाईल तिथपर्यत दिसणारा विस्तीर्ण प्लॅटू! सखल, सपाट भाग! पावसामुळे त्यावर छोटे छोटे गवत उगवले होते आणि तो पूर्ण भाग हिरवागार झाला होता. त्यावरून चालणं ..असं वाटतं होतं जसं मऊ मऊ गालिच्यावरून चाललोय! पायात बूट असले  तरी ओल्या गवतांचा तो लुसलुशीत स्पर्श जाणवत होता. त्यावरचे दवबिंदू गारव्याची एक लहर पायांना देत होते. काही ठिकाणी पसरट दगडी चौथ-यावरच्या खाचांमध्ये पाणी साचले होते. त्या डबक्यात उडी मारून पाणी उधळायचा मोह मिलिंदलाही आवरला नाही!

हा भाग म्हणजे एक उत्तम बायोडायव्हरसिटी! अगणित प्रकारची पाने, फुले, फुलपाखरे, झाडे....वेळ असता तर त्या प्रत्येक पाना-फुलाचे फोटो घेणे मला नक्कीच आवडलं असतं! काही पानांवरच्या रेषां इतक्या आखीव-रेखीव होत्या की निसर्ग चित्रकाराची कमालचं!

रायगडापेक्षाही कितीतरी पट्टीने विस्तीर्ण सखल भूभाग इथे आहे. जवळजवळ ५५-६० एकराचा भूगाव हा असावा. काही ठिकाणी पाण्याचे तलाव आहेत. शिवमंदिर, भोराईमाता मंदिर, वीरगळ, महादरवाजा, चोरदरवाजा, पंतसचिव वाडा, टकमक टोक, स्मृतीशिल्प/स्मृतीस्मारक, काही शिलालेखांचे अवशेष...

दुसऱ्या एका ट्रेकिंग ग्रुपमधला मुलगा अशाच एका स्मृतीशिल्पावर बसला होता. मिलिंदच्या ते लगेच लक्षात आले आणि त्याने जाऊन त्या मुलाला त्याची जाणीव करून दिली! वाटलं मिलिंद हा खरा ट्रेकर! जो इतिहासाच्या संवेदना जपतोय! मी तर फक्त चालते. ट्रेकर म्हणून घेण्यासाठी मला अजून तर बरचं काही शिकायचं आहे!

भाकरी, भाजी, पापड, भात असा जेवणाचा फक्कड बेत होता.

उतरताना माझी स्टिक दगडावर ठेवली तर तिचा सर्र---चर्र...खर्र..घासल्याचा आवाज येत होता. ती थोडी निसटली तर तोल गेलाच! शिवची शिकवण आठवली....दगड असतील तर स्टिक ऐवजी शरीराचा तोल सांभाळावा. ...तेच केलं...आणि ते जास्त सोपं गेलं! स्टिकच्या आधाराविना ट्रेक करता येऊ शकेल ही भावना कमी सुखद नाही!

पायथा जसं-जसा जवळ येतो तसं-तसा ट्रेक पूर्तीचा आनंद अनुभवण्यासारखा असतो. गड कसा चढलो...चढताना काय काय त्रास होत होता हे आठवून हसायला येतं!

मिलिंद आणि भगवान यांची साथ बहुमोल होती. इतर मुलांचा ग्रुप आल्यावर दोघेजण जातीने थांबून राह्यचे. मुलींच्या ट्रेक मध्ये अशा प्रकारचं भान ठेवण ही केवढी मोठी जबाबदारी आहे हे त्यावेळी मला जाणवलं!


खरंतर हा “लेडीज स्पेशल ट्रेक”! अर्पण आहे मिलिंद आणि भगवानला!


गड उतरताना काही मुलींच्या गप्पा ऐकायला मिळाल्या. 
“आई- वडील ट्रेकला पाठवत नाहीत, त्यांना वाटते ह्या फिरायला जातात, दिवस वाया घालवतात, तो एक व्यायाम आहे, स्पोर्ट आहे असं त्यांना वाटत नाही. जाण्याचा निर्णय घेतला तर पटत नाही.. वगैरे”...मी माझाच विचार करत होते. कदाचित सारखं सारखं ट्रेकला जाण माझ्याही आई-वडिलांना रुचलं नसतं! मुलांनाही आई-वडील ट्रेकला जाऊ देत नाहीत हे मी खुद्द मुलांकडूनच ऐकलेलं आहे. विवाहितांची कहाणी ह्यापेक्षा वेगळी नाही. आज चित्र थोड बदलत जरी असेल तरी, ह्याच कारण बहुधा “ट्रेक” हे आपल्या जीवनशैलीचा भाग मानला जात नाही हे असावं. “घरी नसणं” म्हणजे काही चांगल असूही शकत ही विचार भावना रुजू व्ह्यायला जरा अवघड जातं..ट्रेकबद्दलचे समज-गैरसमज, त्याबद्दलचा दृष्टीकोन, विचारधारणा....बदलेलं हळूहळू! आज जे आई-वडील, नवरा-बायको, सासू-सासरे इ ट्रेक साठी प्रोत्साहन देतात त्यांना सलामच! दुसरी बाजू विनोदाची आहे....थोडी मिश्कील आहे... ट्रेकचं “व्यसन” लागायला एक ट्रेक बास असतो! कोणाच्या घरच्यांना आपले आप्तगण ह्या व्यसनाच्या आहारी जावं असं वाटेल?

कारण काहीही असो आणि असं नेहमीच होत नाही हे मी जाणते तरीही,  ज्या मुलीं ट्रेकला आयत्यावेळी आल्या नाहीत, फोन उचलतं नव्हत्या किंवा ज्या तासभर उशीरा आल्या, ते पाहून मन दुखावलं. मुली-स्त्रीची ही प्रतिमा आपण बदलू शकतो ना? आपल्या हातात आहे, सहज शक्य आहे........

ह्या ट्रेक दरम्यान ह्या तिशीच्या आतल्या मुलींना मी जवळून बघत होते आणि त्यांना बघताना मी स्वत:ला उमगत होते. जे माझ्या बाबतीत घडलं ते ह्यांच्याबाबतीत घडू नये असं मनापासून वाटतं होतं. म्हणूनचं काही मनातलं सांगाव असं वाटतयं...मुलींनो, जितकं शक्य आहे तितकं पायी चाला....लिफ्ट ऐवजी पाय-यांचा वापर करा, लोह, कॅल्शीअम, प्रोटीन युक्त आहार घ्या, डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शीअमच्या गोळ्या सुरु करा, हिमोग्लीबीन १०-११एमजी पेक्षा जास्त राहील असा आहार घ्या....स्वत:ला तपासून पाह्ण्याची, स्वत:चे परीक्षण करण्याची सवय लावून घ्या....

मला कल्पना आहे की ह्या सर्व गोष्टींना खूप सारे कंगोरे आहेत, काही मर्यादा आहेत, पैसा, शिक्षण, नोकरीसाठी घरापासून दूर राहणं, मुलींबाबत आपली संस्कृती इ इ.

मुलींनो, जेव्हा ट्रेकिंग आवडतयं, जमतयं तेव्हा पहिली गोष्ट मी केली ती ही की पैशाचं व्यवस्थापन! वायफळ खर्च जाणीवपूर्वक टाळला, तो पैसा पोषक आहाराकडे वळवला, उदा. फळे इ. कपड्यांवरचा खर्च जबरदस्त कमी केला.....ट्रेकिंग दरम्यान मला एक उमगल, मी इतके महागडे, सुंदर ड्रेसेस खरेदी करायची, घालायची...ऑफिसातल्या मुला-मुलिंकडून ड्रेसच कौतुकही व्हायचं..पण मला मी सुंदर तेव्हा वाटले जेव्हा केटूएस नाईट ट्रेक पूर्ण करून माझा ड्रेस मातीने बरबटलेला होता!

वय आणि अनाहूत भीती मुळे असेल कदाचित, पण ट्रेकच्या आदल्या दिवशी कधी कधी मला शांत झोप लागत नव्हती....ती शांत आणि पुरेशी झोप मिळाली नाही की काय होतं ह्याचा अनुभव मी माथेरान ट्रेकला घेतला होता. डोळे जड झाले होते, पोटात गलबलत होतं, गरगरल्यासारखं वाटतं होतं... ह्या सर्वाचा परिणाम ट्रेक करण्यावर झाला होता....मी माझी जीवनशैली बदलण्याचा प्रयत्न केला...ट्रेकच्या आदल्यादिवशी संध्याकाळी सात वाजता भरपूर जेवायचं.. झोप येत आहे असं वाटलं की टीव्ही वाचन इ बंद....

मला कल्पना आहे ह्या पिढीच्या मुलींच्या जाणीवा खूप सजग आहेत....हा ट्रेक खास मुलींसाठी होता आणि एक मुलगी म्हणून मी जे अनुभवलं ते मांडण्याचा हा एक प्रयत्न!

मुलींसाठी “हिरकणी क्लब” किती महत्वाच पाऊल आहे हे मला मनोमन पटलं! मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सक्षमतेसाठी हा एक अतुलनीय मार्ग आहे!


मुलींनो, चला तर मग ह्या किंवा अशा प्रकारच्या मार्गावर चालण्याचा ध्यास धरुयात.......त्या मार्गावर काय मिळतयं हे स्वत: शोधूयात......स्वत:ला शोधूयात.......



तुंग-तिकोना ट्रेक, १९ जून २०१६

सकाळी ६.३० च्या दरम्यान शिवाजीनगर वरुन ट्रेक साठी खाजगी गाडीने निघालो. पौड मार्गे तिकोनापेठ येथे साधारणत: ८-८.३० च्या दरम्यान पोहोचलो. पोहे आणि चहाचा नाश्ता केला.

मनप्रीत ने पुन्हा एकदा विचारलं, आपकी बेटी नहीं आई? तिला वाटतं प्रमिला सिंग माझी मुलगी आहे. अर्थात प्रमिला आणि माझी छान मैत्री झाली आहे. आमच्यातल नातं असं समजुतीच आणि केअरिंगचं आहे. त्यामूळे कदाचित मनप्रीत ला सांगाव वाटलं नाही की बाई गं ती माझी मुलगी नाही. तिला म्हटलं, यहा जो आते है मेरे बेटे है, बेटीयाँ है”!

तिकोना गड चढण्यापूर्वी ओळख परेड झाली. यावेळी साधारणत: ४० ट्रेकर्स सहभागी झाले होते. १४ जून २०१५ मधे हा ट्रेक करुन झाला होता आणि त्यावेळी तो कठीण वाटला नव्हता. त्यामूळे ठरवल्याप्रमाणे विशाल सोबत काहीही संवाद केला नाही. तरिही मनात धाकधूक होतीच पण त्याचा परिणाम ट्रेक पूर्ण करण्याच्या निश्‍चयावर होऊ दिला नाही. एक-दीड तासात गड चढू असे आधीच विशालने गडाची माहिती देताना सांगितले होते. पावसाळी वातावरण होते. पावसाचे काही थेंब पडलेही पण त्यानंतर मात्र पाऊस पडला नाही. आकाश ढगाळलेले, हवेत थोडासा गारवा, मधूनच उन्हाची येणारी तिरिप, ढग ओढून घेतलेले डोंगर आणि शीतलता अशा वातावरणात ट्रेक सुरु झाला. यावेळी आम्ही जाणारी वाट वेगळी होती. १४ जून २०१५ रोजी घेतलेला ट्रेक चा मार्ग थोडा लांबलचक वाटला आणि आत्ताचा हा मार्ग छोटा आणि जवळचा वाटला, अति चढाईचा नव्हता आणि तुलनेने सोपा होता. त्यामूळे मला आनंदच होत होता. घाम गळत होता पण हवामानामूळे असेल कदाचित, इतक्या प्रमाणात दम लागला नाही. पाणी पिण्याची वारंवारता पण कमी होती. तरिही टँग मिश्रित पाणी तयार होतेच. काही ट्रेक च्या अनुभवाने आणि ट्रेक लीडरच्या सांगण्यानूसार पाण्याचा घोट घेत घेत चढाई करायची म्हणजे पायाला क्रॅम्प येत नाही. रेनकोट सोबत नेला होता पण पावसाचा अंदाज घेऊन तो गाडीतच ठेवला. त्यामूळे पाठीवरचे ओझेपण झेपणारे होते. त्यामूळे अंदाजानूसार चढाई वेळेत पूर्ण झाली.

तिकोना चा अर्थ आहे तीन कोन असलेला, त्रिकोणाकृती! गडाच्या मध्यावर तळजाई देवीच मंदिर आणि गुहा आहे, तसेच राक्षसाला किंवा दानवाला मारण्याच्या अर्विभावातील हनुमानाची शेंदरी मुद्रा आहे. यानंतर सुरु होतो तो शिवाजी ट्रेल आणि बाले किल्ल्याची चढाई एकावेळी एकच व्यक्ति चढू शकेल अशा दगडी पायर्‍यांचा पॅच आहे. हया पायर्‍या चढून गेलं की गडावर त्र्यंबकेश्‍वर महादेवाचे मंदिर आहे. गडावरुन पवना धरणाचा निसर्गरम्य परिसर दिसतो.

माझा कॅमेरा नेहाली, सायली आणि अभिषेक कडे दिला होता. काही ट्रेक मधे किंवा हल्ली मी ङ्गोटो काढण्याच्या मागे लागतच नाही. एक सावधानता म्हणून. लक्ष क्त सुरक्षित आणि सुखरुप चढण्या-उतरण्याकडे देते. आधीच्या काही ट्रेकमधे असं लक्षात आलं की फोटो काढणं आणि चढणं-उतरणं मला तितक्याशा शिताफीने करता येत नाही. त्यांमूळे फोटोवरच लक्ष कमी केलं.

गड चढताना-उतरताना विशाल, राहूल, शिव, नेहाली, सायली, अभिंषेक या सर्वांचच माझ्याकडे लक्ष होतं. हया ट्रेक सोबत असले की मी निर्धास्त असते. एकाग्रतेने मी ट्रेक करत असते  आणि  मला खात्री असते की माझ्या आजूबाजूला कोणाचातरी मदतीचा हात नक्की आहे. मदतीसाठी हाक दयावी लागली असं आत्तापर्यंत एकदाही झालेलं नाही !

ट्रेक दरम्यान मी थोडसचं खाते. अगदीच उपाशी पोटी चढाई करायची नाही म्हणून. पाणी जास्त पिते. ते ही इक्लट्रॉल, टँग मिश्रित किंवा सरळ लिंबू सरबत! सोबत १-२रचंद ठेवते. बस्स. काही वेळा पूरणपोळी, आंब्याची पोळी, साठोरी असं घेऊन जाते. मनूके मला चालतात पण बदाम खाल्ले तर ठसका लागतो त्यामुळे ते कट.

साधारणत: १२ च्या दरम्यान गड उतरुन खाली आलो. जेवण केलं. साधारण दुपारी च्या दरम्यान तुंगसाठी निघालो. दूपारी च्या दरम्यान तुंग गड चढायला सुरुवात केली. शिव ने आधीच कल्पना दिली होती की, गड छोटा आहे पण काही ठिकाणे थोडी धोक्याची आहेत. फोटो काढणे टाळा”. 

चढाईला सुरुवात केली. शिव ने सल्ला दिला की माझी ट्रेकींग स्टीक चढताना वापरणे टाळावे. काहीवेळा हातांच्या आधाराने चढणे-उतरणे जास्त सोयीचे होते. त्याचा सल्ला मानत अधून-मधून स्टीक न वापरण्याचा प्रयोग करत होते. मागच्या वर्षी १४ फेब्रुवारी २०१५ रोजी वासोटा हा एस. जी बरोबरचा नववा जंगल ट्रेक केला होता. स्टीक न वापरता केलेला ट्रे़क़ आणि चक्क जमला मला. चढताना-उतरताना एकाग्र राहणे आणि शरीराचे तोल सांभाळणे हया दोन मुख्य गोष्टी मी तेव्हा केल्या होत्या. उतरताना शरीराला गती आली तर क्षणभर थांबणे उत्तम. पण हा ट्रेक जमला म्हणून स्टीक वापरायलाच नको असा आतला आवाज नव्हता. विचार करायला लावणारी गोष्ट आहे ना? भीमाशंकर जंगल ट्रेक ला गूडघा स्प्रेन झाला होता. डॉक्टर म्हणे, नो हायकिंग, नो जंपींग़”. पण राहवतयं कूठे? मग मार्ग काढला, नी-कॅप आणि स्टीक वापरायची! शिवने देखील नी-कॅप वापरण्याचा सल्ला दिला होता. शिवची कमाल बघा तो ट्रेक ला असेल तेव्हा तेव्हा मला आवर्जून विचारतो, मॅडम, नी-कॅप वापरताय ना..असे वैयक्तिक दखल घेणारे लीडर्स असणार्‍या एस. जी. ट्रेकर्स चा मी एक भाग आहे हयाचा खरंच अभिमान वाटतो!

शिव बद्दल अजून एक उल्लेखनीय गोष्ट. ऑगस्ट २०१५ रोजी केलेला कातळधर ट्रेक हा माझा एस.जी. ट्रेकर्स बरोबरचा पहिला ट्रेक होता. एखादया ट्रेकिंग ग्रुप बरोबर पहिल्यांदा जाण्याचा अनुभव, कातळधर ट्रेकच्या वर्णनात तुम्ही वाचालचं. तर मी कातळधर ट्रेक मधील शिव बद्दलची एक उल्लेखनीय गोंष्ट तुम्हाला सांगत होते. ऑगस्ट महिना आणि पाऊस. पावसात ट्रेक करण जिकीरीचं असतं. माझ्यासाठी तर परीक्षाच असते. निसरडया जागेत शरीराचा तोल सांभाळण महाभयंकर काम होऊन बसतं. कातळधरला पहिल्यांदा धबधबा दिसला आणि आता शेवटचा टप्पा पार करायचा होता. तो पॅच मला कठीणच वाटत होता. मातीचा चढ पावसाने चांगलाच डेंजरस वाटत होता.

म्हटल, मी इथेच थांबते. मला खात्री वाटत होती की तो पॅच मी चढून जाऊ शकणार नाही. शिव ने माझे शब्द ऐकले. लगेच म्हणे, मॅडम, तुम्ही इथपर्यंत आलेला आहात. हा पॅच क्त पूर्ण करायचाय. चला मी आहे”. त्याने हाताचा आधार देऊन तो पॅच पूर्ण करुन दिला. आजही मला त्याचे ते वाक्य आठवतं आणि घेतलेला पूढाकार मनाला स्पर्शून जातो. 

तुंग अर्थात कठीणगड़ तुंगवाडीपासुन हा ट्रेक सुरु होतो. पायथ्याला हनूमानाचे मंदिर आहे. काही भाग दगडांच्या खाचांनी तयार झालेला आहे. तर काही जागा खुप अरुंद आहेत. एका बाजूला डोंगर आणि दूसर्‍या बाजूला दरी. हया १-२ जागा सोडल्या तर तुंग गड चढायला-उतरायला तसा सोपा वाटला. गडावरच्या रस्त्यावर काळयाभोर मातीत कर्दळीची झाडे लावली होती त्यामूळे गडाच्या सौदर्यात भर पडंत होती. काळयाभोर साडीवर हिरवीगार नक्षीच जणु! गड खालून खुपच नयनमनोहर दिसत होता. तुंग गड मला जास्त आवडला. त्याच सौदर्य काही वेगळचं आहे. खालून बघितलं तर गड तीक्ष्ण, धारदार शंकूच्या आकारासारखा दिसतो. त्याचे ते तीक्ष्ण, धारदार कडे मला पाहून मला मात्र तो गड खडा आणि प्राण्याच्या डौलदार शिंगासारखा वाटला!

इथेदेखील चढताना ङ्गारशी दमछाक झाली नाही. त्यामुळे छान वाटतं होते. गडावरुन निसर्ग सौदर्य अङ्गलातून दिसत होते. डोळे भरुन पहावे, डोळयात साठवावे आणि शांततेत ते काय सांगताहेत ते ऐकावे. बस्स अजून काय हवे? गडावर तुंगाई मातेचे मंदिर आहे. तिच्या दर्शनाला गडाखालील कंपनीत काम करणार्‍या काही नाशिक गावच्या स्त्रिया रस्त्यात भेटल्या. कंपनीत असल्याने सगळयांनी हिरवी साडी नेसली होती त्यामुळे एकामागून एक उतरताना त्या देवीरुप दिसत होत्या. काहीं तर अनवाणी गड उतरत होत्या. भक्तीच्या माध्यमातून जी शक्ती मिळते ती एक अनुभूतीच!

आतापर्यंत सर केलेल्या बहुतेक गडावर महादेवाच, देवीच, हनुमानाच , गणेशाच मंदिर आहेच. का असावीत ही मंदिर/प्रतिमा? गडाचं पावित्र्य राखण्यासाठी, देव-देवतांना साधना-तपश्‍चर्या करण्यासाठी एकांत-शांत जागा, इतिहासाची स्ङ्गूर्तीस्थाने, शक्तिस्थाने, मनाची ताकद वाढवणारी बलस्थाने, घरापासून दूर असलेल्या मावळयांना आर्शिवादासाठी  प्रतिकात्मक माता-पिता....

दूसर्‍या दिवशीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कयानी बेकरीतुन चॉकलेट वॉलनट केक  सर्वांसाठी घेतला होता. माझी इच्छा होती की गडावर तो खाल्ला जावा. गडावर केक कापला. शुभेच्छांचा वर्षाव झाला आणि वाढदिवस अशा रितीने एस. जी. ट्रेकर्स सोबत गडावर साजरा झाला. पुर्णपणे ऐतिहासिक!

साधारण ४.३० च्या दरम्यान गड उतरायला सुरुवात केली. काही ठिकाणी थोडं काळजीपूर्वक उतरायला लागत होती पण अगदीच अवघड वाटलं नाही. शिव सोबत होताच आणि काही महत्वाच्या टीप्सपण देत होता. त्याने दिलेल्या तांत्रीक टीप्स अतिशय अभ्यासू, अनुभवी आणि प्रभावी असतात.

शिव असला की ट्रेकचा फीडबॅक तो घेतोच. मला नेहमी प्रश्‍न पडतो मी काय सांगू? हया ट्रेकर्सने माझ्यासाठी जे केलयं ते शब्दात गूंङ्गण केवळ अशक्य आहे. हया ट्रेक डायरीच्या माध्यमातून त्यांच्या सोबतचे अनुभव तुमच्याही मनाला स्पर्शून जातील!
तुंग आणि तिकोना एक दिवसाचा ट्रेक ही नवी अ‍ॅडीशन होती आणि ती आयडीया मला आवडली. वेळेच व्यवस्थापन जबरदस्त झालं. सहभागींना विश्रांती आणि हवा तसा आनंदाने वेळ घालवण्याची संधी मिळाली.

परतीच्या प्रवासात पवना धरण आणि पाण्याचा आनंदही घेतला. यावेळी हवेत चांगलाच गारवा जाणवत होता.

जाताना-येताना गाण्यांची मैल गाडीत रंगलीच होती. गाणी म्हणण्यापेक्षा मुला-मुलींना गाणी गाताना ऐकण मला जास्त आनंद देत. खासकरुन विशाल, राहूल आणि आलेख! मुला-मुलींचा जोश, आवेश, उत्साह, गाणी म्हणण्याची स्टाईल, हावभाव इ. खूप मज्जा येते. यावेळी तर भगवानने म्हणलेल्या गाण्यांचाही आस्वाद घेतला आणि प्रजेशचं हिंदी गाण ऐकण्यासाठी कान हयावेळी देखील आसूसलेलेच राहिले!

ट्रेक दरम्यान तर सैराट चित्रपटातील झिंगाट गाण्यावर डान्स पण झाला! अनेकवेळा हं!

खूप सार्‍या नवीन सहभागींची ओळख झाली....सुयोग, गौरव, संदीप, मीनू, सुमेधा, युंगधरा......गौरव आणि सुयोग सोबत गप्पा खूप समाधान देणार्‍या होत्या. नेहाली, सायली आणि प्रतिक बरोबर देखील छान गप्पा झाल्या.

खुपजण असेही होते जे माझ्या आजुबाजुला अधून मधून मदतीसाठी सोबत देत होते. त्यांची नावे आत्ता मला आठवतं नाहीत पण चेहरे मात्र लक्षात आहेत. 

हया मुला-मुलींच्या सोबत असल्यावर मनाला जबरदस्त उभारी येते पण वयाच्या हया वळणावर शरीर तेवढ लवचिक राहिलेलं नाही आणि गुडघे आणि कंबर शाबूत राहतील हयाच भानही ठेवाव लागतं!

हया ट्रेकला फारशी दमछाक झाली नाही. मधे खंड पडल्यामूळे विसापूर ट्रेक ला थोडी दमणूक झाली. पण हया ट्रेक मूळे शरीर ट्रेक साठी तयार झालयं असं वाटलं.

थोडक्यात काय, जूलै २०१६ च्या अंधारबन जंगल ट्रेकला तयार!

अंधारबन जंगल ट्रेक, ३ जुलै २०१६

मला आठवतयं गेल्यावर्षी ट्रेकडीचा मार्च-एप्रिल मधे हा ट्रेक होता. मला जाण्याची इच्छा होती. मी विशालला फोन करुन ट्रेक बद्दल विचारले. तो म्हणाला, छान ट्रेक आहे, पण तो मान्सून ट्रेक आहे. पावसाळ्यात निसर्ग सौदर्य अलातून दिसतं हया मान्सून मधे आपण हा ट्रेक ठेवतोय”. म्हटलं, मग तेव्हाच करेन मी तो ट्रेक.

जूलैला ट्रेक घोषित झाल्यावर लगेचच मी रजिस्ट्रेशन करुन टाकलं. जूलैला पुणे ते सासवड ही  पंढरपूरची वारी करुन आले होते. डाव्या पायाची टाच त्यावर भार पडला की किंचितशी दूखत होती. एकदा वाटलं खूप दूखायला लागलीच तर चालता येणार नाही. पण ट्रेक करायचाच होता.

खाजगी वाहनाने जाणार होतो त्यामूळे एका सॅक मधे एक पाण्याची बाटली, नॅपकीन, पान्चो ठेवला आणि खाऊ म्हणून साठोरी आणि वारीत मिळालेली राजगिरा वडी ठेवली. एक वेगळी पिशवी घेतली जी मी गाडीतच ठेवणार होते आणि त्यात सामान ठेवलं, एक नॅपकीन, एक्सट्रॉ ड्रेस, पाण्याची बाटली, एक स्लीपर जोड, छत्री आणि बिस्किटचा पूडा!. कमरेला प्रवासी पाऊच बांधला ज्यामधे प्लास्टीक पाऊच मधे मोबाईल, पैसे, वेट टीशू, साधे ड्राय टिशू , पिना, बॅन्ड-ऐड इ. ड्राय टीशू चष्म्याच्या काचा पूसण्यासाठी. बरेचदा माझं असं होतं की ट्रेकच्या आधी, ट्रेक दरम्यान जास्त काही खावं वाटतं नाही पण एकदा का ट्रेक झाला की काही तरी आणि त्यातूनही गोड खावसं वाटतं. खाजगी गाडी असेल तर हे नियोजन करता येतं. अन्यथा मोजकचं सामान घ्यावं लागतं. रात्रीपासून पावसाची संततधार सूरुच होती त्यामुळे ही सगळी तयारी केली होती. कधी काय उपयोगी पडेल सांगता येत नाही आणि गाडीतचं तर ठेवायचीय पिशवी असा विचार करुन एवढं सगळं सामान घेतलं होतं.

जूलैला सकाळी वाजता शिवाजीनगर, लोकमंगल इथे भेटलो. मी उभी होते आणि एक मुलगा तिथे आला. मला म्हणे, एस.जी ट्रेकर्स ना? तुम्हाला बघितल्यावर मी ओळखलं की एस. जी ट्रेकर्सच असणारं. याआधीपण १-२ वेळा असं झालं होतं. मला खूप छान वाटली ही माझी ओळख!. मी आणि एस.जी. ट्रेकर्स हे समीकरण मनाला स्पर्शून गेलं!

ट्रेकला विशाल, शिव आणि आलेख हे लीडर्स होते आणि बरीचशी नेहमीची मुले-मुली!. गाडी पौड मार्गाने ताम्हिणी घाटातून जाणार होती. ताम्हीणी घाटात आम्हाला सोडून गाडी भिरा गावात जाऊन थांबणार होती. हा ट्रेक असाच होता. 30% खाली उतरायच आणि मग 70% जंगल ट्रेक़. ट्रेकची सुरुवात एका जागेवरुन आणि शेवट भीरा धरणाच्या जवळ!. रस्त्यात मधे हॉटेल शिवसागर येथे मिसळ-पाव आणि चहा असा नाश्ता केला. पुर्ण रस्ताभर पाऊस होता. हयाभागात तर तो जोरातच कोसळत होता. आजूबाजूला शेतीची वावरं पावसाच्या पाण्याने तुडूंब भरली होती. डोंगरावर ढगांचं पाघंरुण. ढगांचं धुक इतक की लांबवरचं काही दिसतं नव्हतं, गाडयांचे हेटलाईट्स चालू होते. ठिकठिकाणी डोंगरावरुन कोसळणारे छोटे-मोठे धबधबे दिसत होते. मीनू माझ्या शेजारी बसली होती आणि आम्ही दोघी त्या निसर्गरम्य दृश्याचा आनंद घेत होतो. माझ्या मनात पुन्हा धाकधूक! निसरडं झालं असेल, पाणी साठलं असेल..ट्रेक जमेल का? शेवटी ठरवलं की विशालला विचारायचं!

ट्रेकच्या आरंभाला पोहोचलो. ठरवलं की विशालला विचारायचं नाही. ट्रेक करायचा! सॅकचं ओझं घेऊन, पान्चो अंगावर चढवलेला आणि कोसळता पाऊस..मला ट्रेक मॅनेज होणार नाही असं वाटून ठरवलं की क्त पान्चो अंगावर चढवायचा, कॅप डोक्यावर आणि हातात स्टीक, बस्सं! पावसाळयामूळे तहान पण इतकी लागणार नाही आणि पाणी प्यावसं वाटलंच तर ग्रुपमधे कुणाकडे तरी मागायचं! नाश्ता तर झालाचं होता आणि पराठे आणि लोणचं असा मस्त बेत लंचला होताचं!

पाऊस इतका जबरदस्त कोसळतं होता की अंगाला त्याचे तडाखे बसतं होते. कॅप घातली आणि पान्चोचे हूड कॅपवरुन डोक्याला घट्ट बांधले. चष्मा असल्याने आणि पाऊस चष्माच्या काचावर पडून काचा ओल्या झाल्यावर अस्पष्ट दिसते म्हणून ही तयारी.

विशालने ट्रेकची माहिती दिली. ६-७ तासात हा साधारण १५ किमी. चा जंगल ट्रेक पुर्ण करायचा आहे असं त्याने सांगितलं. पाऊस होता, काळजीपुर्वक चालाव लागणार होतं, पावसामूळे चालण्याची गतीपण धीमी होणार होती आणि जंगलात लवकर अंधार पडतो म्हणून ६-७ तासात ट्रेक समीट करायचा असं त्यांच गणित असावं. ओळख परेड नंतर घ्यायची असं ठरलं. ट्रेक विशाल लीड करणार होता, मागे आलेख आणि मध्यभागी शिव हा मुख्य लीडर आणि त्याला साथ देणार होते प्रतिक, रवी आणि भगवान!

ट्रेक सुरु झाला. मी मनाशी ठरवलं होतं की विशाल सोबत राहण्याचा प्रयत्न करायचा. हयाची काही कारणे अशी होती की पावसाळी हवामानामूळे मला दम कमी लागण्याची शक्यता होती त्यामूळे मी पटापट चालण्याचा प्रयत्न करु शकणार होते आणि मागे राहून आलेख, शिव हया मुलांना मला त्रास दयायचा नव्हता. त्रास अशा अर्थाने की मला सोबत करावी लागते, माझ्या चालीने चालावे लागते, माझ्याकडे बारकाईने लक्ष ठेवावे लागते, मला कुठे मदत लागेल हयाचा अंदाज घ्यावा लागतो इ. एक मोठीच जबाबदारी मागच्या लीडर्स वर येऊन पडते. ते गुतुंन राहतात मग ट्रेकचा, निसर्गाचा आनंद ते तितिकासा घेऊ शकत नाही असं मला कायम वाटतं राहतं. त्यामूळे त्यांचा तो त्रास, जिथे शक्य आहे आणि जितका शक्य आहे तेवढा तो कमी करण्याचा माझा कटाक्ष असतो. अर्थात जिथे मला मदत लागते तिथे लागतेच आणि त्याला पर्याय नसतो. 
 
विशालने पुढे चालायला सुरुवात केली आणि मी त्याच्या मागे धावले. काही पावलेच पुढे गेलो तर परीक्षेचा क्षण आला. धरणाच्या आधी एक तारेच कूंपण होतं, ते मधे मधे सिमेंटच्या पट्टयांनी जोडलेले होतं आणि त्याखालून पाणी वाहत होतं. हातभर लांबीचे, जेमतेम पाय बसेल एवढया रुंदीचे आणि लोखंडी तारांनी जोडलेले हे सिमेंटचे पट्टे पार करुन पुढे जायचे होते. कसरत ही की पाऊस कोसळतोय, त्याचा मारा अंगावर सोसायचाय, पान्चो पायात अडकायला नाही पाहिजे, स्टीक सांभाळणे, पाय शिताफीने ठेवायचाय, लोखंडी खिळयांनी ओरखडता कामा नये इ. हातभर लांबीची ती पट्टी पार करायची तर क्षणात एवढे सार विचार मनात तरळून गेले. विशाल आणि काही मुलांनी एक पाय पट्टीवर ठेवला, एक उंच उडी मारली आणि पट्टी पार. मनात आले ही शरीराची अवस्था आहे की मनाची? शरीराची उंची, तरुण वय, शरीराची लवचिकता की अजून काही? विवेक बुद्धि जागृत मी असा प्रयोग ठेऊन करुन पाहू शकते का? मग कळेल की मी वय मनात पकडून बसलेय म्हणून थोडे काचरते की वय विसरुन शरीर मोकळं, ढिलं ठेवलं तर मलाही हया मुलांप्रमाणे असं करणं शक्य आहे? हया मुलांकडूनच एकदा जाणून घ्यायला हवे असे वाटले. मी पट्टीवर एक पाय ठेवला, शरीराचा तोल सांभाळत दूसरा पाय ठेवणार तोच आधारासाठी हात पूढे आला. विशाल होता तो! मी आश्‍चर्यचकित! हा मुलगा पट्टी पार करुन पुढे गेला होता पण हयाचं लक्ष माझ्याकडे होतं की काय? मला मदत लागू शकते हे लक्षात येऊन तो लगेच धावून आला होता. एक ट्रेक लीडर कसा असावा हयाच मूर्तिंमंत उदाहरण म्हणजे हा विशाल! बापरे..मी इतकी भावनिक झाले की बस्स! त्याक्षणी मिळणारा हाताचा तो आधार......सुरक्षा, सुखरुपता, सोबत, साथ, दिलासा,समाधान चा!

ट्रेकच्या निमित्ताने जीवनाचा एक महान अर्थ गवसत होता. ..आधार....
.
कसरतीचा एक पडाव पार करत नाही तोच कसोटीचा दूसरा पडाव समोर आला. अत्यंत रुंदीचे धरण पार करण्याचा! शिवने हयुमन चेन तयार करायला सांगितली. माझ्या मागे मीनू होती. ती माझ्या हाताचा आधार मागत होती आणि माझा एक हात पुढच्या व्यक्तिच्या हातात आणि दूसर्‍या हातात स्टीक! मी तिला हाताचा आधार देणार कुठून? लगेच विशाल पूढे आला, त्याने माझी साखळी तोडली. माझा स्टीकचा हात हातात घेतला आणि मी माझा दूसरा हात मीनूच्या हातात दिला! हीच ती विशालची लीडरशीप!

पाण्याच्या प्रवाहाला बर्‍यापैकी वेग होता त्यामुळे हातांची साखळी आणि इतरही काही मुलांच्या हाताच्या आधाराने धरणाचा हा भाग पार केला. आता पुढचा ट्रेक सुरु झाला. जंगलाचा भाग सुरु झाला. बर्‍यापेकी सपाट भाग होता दम लागत नव्हता त्यामुळे मी पटापट, झराझर चालण्याचा प्रयत्न करत होते. पण हे करताना गूडघा एकदा दूखावलेला आहे आणि वयोमानानूसार कंबरेची काळजीही घ्यायला हवी हा विवेक ध्यानात घेऊन ट्रेक करत होते. रवी म्हणाला देखील, मॅडम आजदेखील एकदम फॉर्म मधे आहेत त्यावर विशाल म्हणे, पुणे ते सासवड ही वारी केलीय त्यांनी मी म्हणल, विशालबरोबरची लीडरशीप सोडायची नाही असं आज ठरवलयं. जोपर्यंत ती पाळता येईल तोपर्यंत पाळायची”.

डोंगरावरच्या धबधब्याचं पाणी जंगलाच्या वाटेवरुन वाहत खाली दरीत कोसळत होतं. असे काही छोटे धबधबे लागले जे मी स्वत: विनाआधार पार करु शकले. पण ते पार करताना पाणी किती खोल आहे हयाचा अंदाज घ्यावा लागत होता आणि स्टीक ने तो अंदाज करायला मदत होतं होती. काही ठिकाणी पाणी नीतळ असल्याने खोलीचा अंदाज लगेचच येत होता त्यामुळे पाय नीट ठेवणं सहजच शक्य होतं होतं. पाण्यात छोटे-मोठे दगट-गोटे असल्याने त्यांचा अंदाज घेऊन पाय ठेवावा लागत होता. दगडावरील शेवाळाचा अंदाज देखील घ्यावा लागत होता. नाहीतर थोडा अंदाज चुकला आणि पाय दूमडण्याची, निसटण्याची, मुरगळण्याची शक्यता होती. पाण्याची खोली काही ठिकाणी तळपायापर्यंत ते मांडीपर्यंत अशी होती. एक धबधबा थोडा जास्त रुंद, जास्त खोल आणि पाण्याचा प्रवाह देखील जोराचा होता. विशालचा आवाज ऐकाला,सुयोग”.. पाठोपाठ सुयोगचा आवाज, हो”. हयानंतर सुयोग पुढे आला त्याने मला हाताना आधार दिला. मला हसून म्हणाला, तुमची जबाबदारी माझ्यावर आहे”. ऐकून क्षणात माझ्या मनात असंख्य विचार तरळून गेले. मी आलेखला टाळलं होतं पण ...काय रिअ‍ॅक्ट करावं तेच कळेना. सुयोगला एवढच म्हटलं, मी कोऑपरेट करेन”. मला मदत लागणारचं होती पण जिथ शक्य आहे आणि जितकं शक्य आहे तेवढा दम न लागण्याचा ङ्गायदा मी आज ऊचलायचं ठरवलं होतं. त्यामूळे अत्यंत अवघड ठिकाणी धबधब्याचं पाणी पार करताना सुयोगची मदत घेतली. सुयोग पण भारी अगदी गुरुदास आणि मयूर सारखा....त्याने माझी सोबत काही सोडली नाही. त्याच्या हेही लक्षात आलं होतं की मी काही पाणी सोबत घेतलेलं नाही. त्याने लगेच मला सांगितलं की हवं तेव्हा पिण्यास पाणी मागून घ्या. जिथं अवघड जागा होत्या तिथं तो आणि प्रतिक माझ्या पुढे जायचे आणि आधार दयायचे.

जंगलाच्या सपाट भागात काही ठिकाणे झाडे पावसाने कोलमडून रस्त्यात पडली होती. त्यात झाडे, झाडांच्या मुळांमधे पाय अडकून पडू नये म्हणून पावले जपून टाकावी लागत होती.

जिथे धबधब्याचं पाणी पार करायचं होतं तिथे विशाल थांबायचा, तो पॅच पार करायला मदत करायचा आणि सर्वांचा तो पॅच पार होईपर्यंत वाट पहयचा. पण जिथे सपाट ट्रेक होता तिथे विशाल सुसाट सुटला होता. दोन-तीन गट झाले होते. गॅप पडत होती. विशालला हाक मारुन थांबवाव लागत होतं बहुतेक त्याच्या डोक्यात एकच असाव की ६-७ तासात ट्रेक पुर्ण करायचाय आणि म्हणूनच जिथे सपाट भाग आहे, चालायला सुलभ आहे तिथे चालण्याची गती वाढवून तो टाईम गॅप भरुन काढण्याचा विचार तो करत असावा.

शिवने यावेळी शिकवले की नी-कॅप जरी वापरत असलो तरही गूडघ्यावर भार येऊ नये म्हणून स्टीकचा अ‍ॅगल कसा असावा. तसेच जमीनीच्या कोणत्या प्रकारच्या पृष्ठभागार स्टीक वापरायची आणि कोणत्या  पृष्ठभागार स्टीक न वापरता शरीराचा तोल सांभाळत ट्रेक करता येऊ शकतो. आहे ना कमालीचा तंत्रज्ञान!
काही धबधब्याचं पाणी पार करणं सर्वांसाठीच कठीण होतं. अशा ठिकाणी थोडया थोडया अंतरावर विशाल, शिव, रवी, भगवान, आलेख, प्रतिक थांबत होते आणि हाताचा आधार देऊन तो पॅच पार करुन देत होते. पाण्याच्या गतीशील प्रवाहाने आपण ढकलले जातोय हे जाणवतं होतं.

हया ट्रेकमधील निसर्ग सौदर्य अलातून होतं. विशाल म्हणला होता ते प्रत्ययास होतं की हा ट्रेक पावसाळयातचं करावा. पहावे तिकडे ऊंच डोंगरावरुन ङ्गेसाळत कोसळणारे अगणित धबधबे, मुलांच्या भाषेत दूधसागर, ढगांचे पांघरुण, धुके, तडातड अंगावर कोसळणार्‍या पावसाच्या धारा, मधूनच दृष्टीस पडणारी हिरवीगार वनराई, हयामधून जाणारी वेडीवाकडी पायवाट...माणसांना ओढ लावणारी, त्यांचे पाय घट्ट रोवुन ठेवणारी, त्यांना आर्कषून घेणारी, डोळे तृप्त करणारी, गायला-नाचायला लावणारी, आत्मा संतुष्ट करणारी निसर्गामधील केवढी प्रचंड मोठी ही ताकद!

साधारणत: एक ते दीड तास चालून आम्ही अशा एका टप्प्यावर येऊन पोहोचलो जिथे समोर अतिप्रचंड मोठे-रुंद धबधबे अति वेगाने मोठया मोठया दगडावरुन कोसळत होते. एका मागून एक...खाली खोल दरीत ते स्वत:ला झोकुन देत होते. धुक्यामुळे आणि घनदाट झाडी मुळे दरी किती खोल आहे हयाचा अंदाज ही लागत नव्हता. २-३ दिवस सलग झालेल्या पावसाने त्याने भयानक अति रौद्र स्वरुप धारण केले होते. निसर्गाचा अजून एक चमत्कार. सौदर्य आणि रौद्रता यांना अनोखा मिलाप!  पायवाट दिसतचं नव्हती.  रस्ता जणू इथे संपलाच होता. विशालने सर्वांना थांबण्याच्या सूचना दिल्या. तो, रवी आणि भगवान रस्ता शोधायला गेले. पायलट ट्रेकच्या वेळी पाऊस नसल्याने त्यांना काही समस्या आली नव्हती आणि आता..पावसामुळे पायवाटच अदृश्य झाली होती. विशाल धबधब्याच्या अति गतीशील पाणीप्रवाहातून झपाझप पावलं टाकत पुढे जात होता. त्याला तसं जाताना पाहून काळजाचा ठोका चुकला क्षणभर! हा मुलगा नक्की आहे तरी काय असा प्रश्‍न परत एकदा पडला. प्रचंड कोसळणार्‍या पावसात, प्रचंड गतीशील पाण्याच्या प्रवाहात हा मुलगा असा चालला होता जसा सपाट जमीनीवरुन चाललाय. प्रचंड सहजता, सराव, धाडस, आत्मविश्‍वास, आत्मबल..... त्याचं हे रुप मी प्रथमच पाहत होते. ही मुलं वर कुठपर्यंत रस्त्याचा शोध घेऊन आली कुणास ठाऊक़ विशालला म्हंणल, रिस्क नको घ्यायला. आपण परत जाऊ. आम्ही निसर्गाचा आनंद घेतलाय”. विशाल म्हणे, सेफ्टी र्स्ट आपण बॅक आऊट करु वेळ पडली तर.त्यानंतर शिव, रवी आणि भगवान गेले. त्यांनी तर ते प्रचंड रौद्र धबधबे पार केले आणि सर्वजण तो पार करु शकतील की नाही, पार करणं सुरक्षीत आहे का हयाचा अंदाज घेतला. हातवारे करुन विशाल आणि हया मुलांमधे संवाद सुरु होता. विशाल परत ङ्गिरा म्हणून इशारे करत होता. विशाल आणि शिव सहित हया सर्व मुलांचे हे प्रयत्न जवळ जवळ दीड-दोन तास चालले होते. हया सर्वांनी १५-२० मिनिट एकमेकात चर्चा केली आणि सुरक्षेचा विचार करुन बॅक आऊट घोषित केलं. मग तिथेच थांबुन लंच केलं आणि साधारण दोन-अडीचच्या सुमारास परतीला निघालो. नंतर शिवने सांगितले की पाण्याला खूप प्रवाह होता, हातांचा आधार घ्यायला जागा नव्हती, थोडा पाय घसरला तर थेट दरीत!

परतीच्या ट्रेक मधे पावसामुळे निसरडं झालं होतं. विशालच्या हाताच्या आधाराने काही निसरडे पॅचेस पार केले. आता सकाळपेक्षा धबधब्याच्या पाण्याचा वेग आणि पातळी वाढली होती.  धबधब्याचे पाणी पार करताना ते जाणवत होते. बॅक आऊट करण्याचा निर्णय किती ऊचित होता ते लक्षात आलं. एक धबधबा धोकादायक पातळीला आला होता. शिवने माझा हात धरला आणि दोघांनी एकाच वेळी तो धबधबा पार केला. त्याने पाणी माझ्या मांडयांपर्यंत आले होते. शिव म्हणे, ज्याला रोप ची गरज होती तो पॅच आपण चालत पार केला. खरंतरं लोक पाण्याच्या वेगाला घाबरतात”. त्याचं मला पटलं होतं कारण एका ट्रेकर्स ने तिथे कपडे वाळत टाकण्याची दोरी दोन्ही बाजूने झाडाला बांधली होती. त्या दोरीचा आधार घेत ते पॅच पार करत होते. ती नायलॉन ची दोरी, ओेल्या हाताने दोरीवरचा हात निसटू शकतो, पावसात झाडे पण मऊ आणि ठिसूळ होतात. अशा परिस्थितीत त्या दोरीवर अवलंबून राहणे कितपत योग्य. एनीवेज ..मी त्यातली अभ्यासक नाही..पण शिव ने मला तो पॅच पार करुन दिला. आता तो लीडवर होता आणि मी त्याच्या सोबत परतीचा ट्रेक पार केला. एका धबधब्याखाली मुला-मुलींनी भिजण्याचा आनंद लुटला.

आता पुष्कळसे लोक पावसात भिजण्यास आलेले दिसत होते. काही जण तर बहुधा ट्रेकलाच आलेले. आमच्या ट्रेकमधील लोक त्यांना पुढील परिस्थितीची कल्पना देत होते. हे तर नक्की होते की पावसाळ्यात ट्रेकचा , निसर्गाचा आनंद घेण्यासाठी हे ठिकाण लोकप्रिय वाटत होते.

परतीच्या प्रवासात एका ठिकाणी आम्हाला थांबायला सांगुन विशाल आणि रवी धावला. विशालला अजून एक वाट लक्षात आली होती. तो अर्धा तासाने परत आला. आम्ही आधीच्याच वाटने परत निघालो. विशालला मिळालेल्या वाटने भीरा धरण जवळ होते पण तिथे लोखंडी तार बांधली होती. ती तितकीशी घट्ट नव्हती आणि त्यामुळे धरणाचा पॅच पार करणे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक होते.
ट्रेक पुर्ण होऊ शकला नाही पण निसर्गाचा, पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद मात्र अविस्मरणिय आणि संस्मरणिय ठरला.
विशाल खूप शांत-शांत होता. चेहरा हिरमुसलेला, केविलवाणा,उदास झालेला. त्याच्याकडे पाहवत नव्हते. ट्रेक पुर्ण न होणं, पावसाळयात हा ट्रेक ठेवायला नको होता, काही गरजेचे साहित्य बरोबर असायला हवे होते का हयासारखे विचार त्याच्या मनात कदाचित सुरु असावेत. खूपदा वाटलं त्याच्याशी बोलावं पण वाटलं राहू दे त्याला थोडा वेळ देऊ यात, थोडावेळ त्याला स्वत:शी संवाद करु देत!

आता अजून एक प्रसंग आमच्या समोर आलां. गाडी भीरा गावात थांबणार होती आणि आम्ही तर परत ताम्हिणी घाटात आलेलो. कोणत्याच कंपनीच्या मोबाईलला नेटवर्क नाही. ड्रायव्हरला ङ्गोन लागेना. गाडी बोलवणार कशी? असं ठरलं की ५-६ किमी वर ताम्हीणी घाटातील वांगी फाटयावर जाऊन थांबायचं. आम्ही चालायला सुरुवात केली. शिव एका गाडीत बसून पुढे गेला. तो त्याची गाडी घेऊन भीरा गावात जाऊन गाडीला घेऊन येणार होता. पाऊस तर थांबायचं नावचं घेत नव्हता. सर्वजण दिवसभरच्या पावसाने त्रासलेले, थकलेले असावेत. पण पर्याय नव्हता. वांगी फाटयावर कसबसं आयडीयाला नेटवर्क मिळालं पण ड्रायव्हर चा फोन स्वीचड ऑ येत होता. शिवचा फोन पण कधी लागायचा तर कधी नाही. अर्धा तास असाच गेला. विशालचे प्रयत्न चालूच. हा मुलगा एक क्षणदेखील स्वस्थ बसला नाही. फोनचे प्रयत्न चालूच. पुर्णवेळ उभाच. त्याने कुणाकुणाला फोन लावले. निरोप दिले. शेवटी एकदाचा ड्रायव्हरला फोन लागला आणि ड्रायव्हर आमच्याकडे यायला निघाला. मधल्या काळात एक मुलगी चिडली होती. तिचे म्हणणे की अशा परिस्थितीत ट्रेकर्स ने २-३ प्लॅन्स रेडी ठेवावेत. विशाल तिच्याशी बोलला. थोडा वाद-विवाद झाला. विशाल म्हणताना ऐकलं की ट्रेकर्सचं काही चुकलं. पण मला तर काही चुकलं असं वाटलं नाही. पायलट ट्रेक करुनही रस्ता चुकू शकतो, फोनला नेटवर्क नसणं असं देखील होऊ शकतं, निसर्गाच्या प्रकोपापुढे सुरक्षेला महत्व देऊन माघार घ्यावी लागते इ. विशालने सर्वतोपरी प्रयत्न केले होते. त्याची तगमग, अस्वस्थता, शर्थीचे प्रयत्न दिसत होते. बिचारा आधीच ट्रेक पुर्ण न झाल्याने उदास झाला होता त्यात भर हया वादाची!. एक लीडर अशा वेळी काय मनस्थितीतून जात असेल हयाची मलाच काय सर्वांनाच कल्पना आली असेल. मला एक खात्री होती की हा मुलगा एखाद दिवस थोडा अपसेट/उदास राहिल, पण नंतर लगेचच तेवढयाच ताकदीने परत उभा राहिलं!

एक विचार करता ट्रेक पुर्ण न होणं माझ्यासाठी देखील उदास करणारी गोष्ट होती. हा पहिला ट्रेक होता जिथे हवामानामुळे आणि ट्रेकला चढाई नसल्याने मला अजिबातच दम लागत नव्हता. मी बर्‍यापैकी विशाल सोबत लीडला राहू शकले होते. त्यामुळे एक उत्साह होता. पण ट्रेक पुर्ण होण्यासाठी यावेळी निसर्गाचा वरदहस्त नव्हता!

ट्रेक दरम्यान मला चष्मा शेवटी काढूनच ठेवावा लागला कारण पावसाचे पाणी चष्माच्या काचावर ओघळून पुढचे दिसेनासे झाले होते. शिव ने विचारलं, व्हीजन आहे ना व्यवस्थित?.

धबधब्याच्या पार्श्‍वभूमीवर, चष्मा न घातलेला माझा योगेशने काढलेला माझा फोटो एकदम सही आलाय!

गाडीची वाट पाहत वांगी फाटयावर थांबलेलो असताना भगवान त्याचे दोन्ही हात जोडून मला म्हणाला, तुम्हाला वंदन आहे मॅडम..पुणे ते सासवड वारी परवा करुन आज तुम्ही ट्रेकला आलात”.

संध्याकाळी जवळ जवळ सव्वा सात वाजता वांगी फाटयावर गाडी आली. हॉटेल शिवसागर मधे जेवण आणि चहा घेऊन साधारण ८.३० ते च्या सुमारास पुण्याकडे निघालो.

परतीच्या प्रवासात किरण आणि नेहाली माझ्याशी बोलण्यासाठी जवळ येऊन बसली. हरिश्‍चंद्रगड हा किरणंचा एस. जी. ट्रेकर्स बरोबरचा पहिला ट्रेक होता आणि त्यावेळी आम्ही दोघी एकत्र होतो. ट्रेक दरम्यान छान गप्पा झाल्या आणि नंतर केलेल्या ट्रेक्स मुळे सुंदर नातं दोघीत निर्माण झालं!

नेहाली आणि मी बरेचसे ट्रेक एकत्र केले होते. आता तर एस.जी.ट्रेकर्सच्या हिरकणी अ‍ॅडव्हेंचर क्लब ची ती एक कोऑर्डीनेटर आहे!

स्मिता, नेहाली, किरण, अनुप्रिता, मीनू , सुयोग, प्रतिक, रवि, भगवान, योगेश इ. सोबत झालेल्या गप्पा म्हणजे माझ्यासाठी आठवणींचा ठेवा आहे. कुठेतरी वाचलं होतं की, पाऊस क्षणाचा पण गारवा कायमचा, भेट क्षणाची पण मैत्री जीवनभराची! 
रात्री दहा वाजता पुण्यात पोहोचलो. घरी पोहोचायला १०.१५ मि. वाजून गेले होते.

हा ट्रेक खूप काही शिकवून गेला, ट्रेक लीडर्सना आणि सहभागींना. प्रत्येकाने त्याच्या परीने ती शिकवण घेतली असेल. माझ्यासाठी तर हीच शिकवण होती की निसर्गासारखा दूसरा शिक्षक नाही, निसर्गाच्या वरदहस्ताशिवाय माणसाचे जीवन सुलभ आणि सुखकारक नाही आणि निसर्गापुढे माघार घेणे हा निसर्गाचा सन्मान आहे आपली हार नाही!.