पहिला पायलट रेंज ट्रेक: सिंहगड ते पाबे खिंड, रविवार, ८ जुलै २०१७


कल्याण दरवाजा मार्गे सिंहगड आणि सिंहगड –विंझर-खानापूर रेंज मार्गे पाबे खिंड हा ट्रेक रूट आम्ही घेणार होतो. सकाळी ७ च्या कल्याण एसटीने आम्ही निघालो..विशाल काकडे, मी, सचिन दगडे सर, संदीप चव्हाण, रुपेश गऊल, रोहित गजमल आणि प्रकाश यादव!

साडे-सात पावणे आठच्या दरम्यान कल्याणला पोहोचलो आणि लगेचच ट्रेकला सुरुवात केली. मोरवाडी गावातून ट्रेकची सुरुवात चढाईनेचं झाली. कल्याण मार्गे सिंहगड हा ट्रेक आधी केल्याने रस्ता माहित होता! यावेळी पावसाने उघडीप दिल्याने धुक्यारहित आजूबाजूचा हिरवागार परिसर बारकाईने न्याहाळता येत होता. हळूहळू चढ पार करत होतो आणि कल्याण गाव डोंगरात पहुडलेले दिसू लागले.

हा ट्रेक २० किमी चा होता आणि ह्या मुलांच्या बरोबरीने आणि गतीने मी तो पार करू शकेल की नाही हा धाकधूक मनात होती! पण सांगणार कोणाला?

कल्याण ते सिंहगड हा ३ किमीचा ट्रेक आम्ही रमत गमत साधारण दीड तासात पार केला. आता गवत चांगलेच वाढले होते आणि कल्याण दरवाज्याचा भक्कम बुरुज ठळक दिसत होता.

९ वाजता सिंहगडावर नाश्ता केला आणि १०.१० वाजता पुढील ट्रेकला सुरुवात केली.


विंझर रेंज पर्यन्त हा ट्रेक मार्ग तोच होता तो सिंहगड-राजगड-तोरणा ह्या रेज ट्रेकचा मार्ग आहे! विंझर डावीकडे राहते आणि आम्ही उजवीकडून खानापूर-पाबे असा मार्ग घेतला!

सिंहगडाची ही बाजू मी प्रथमच पाहत होते. इथे रॉक क्लायबिंगचे पॅचेस होते. श्री. हनुमानाची शिळेत कोरलेली मूर्ती तर भन्नाट होती.

विंझर रेंज पर्यंत साधारण ८ किमी अंतर पार झाले होते. थोडा सपाट थोडा चढाईचा, डोंगरपायवाटेचा हा मार्ग आहे. एकामागून एक डोंगर पार करावे अशी ही डोंगरयात्रा! काही ठिकाणी पायवाट इतकी छोटी होती की एकावेळी एकचं जण जाऊ शकेल आणि एकचं पाय  मावू शकेल.

काही अंतरावर गुरे चरायला आलेले एक बाबा भेटले. त्यांनी सांगितलं विंझरपर्यंत जायला दोन तास लागतील आणि पुढे जायला रात होईल. डोंगराच्या रांगं रांगंन न जाता एक शोर्ट कट त्यांनी सुचवला. त्यांच्या बोलण्याने मला थोडं घाबरायलाचं झालं खरतरं!      

क्लायमेट एकदम भारी होत! एकदम आल्हाददायक! नाही पाऊस..नाही ऊन! हलकासा वारा,चहूकडे डोंगर, दरी, पानशेत धरणाचा जलाशय आणि दूरवर दिसणारी राजगड-तोरणा किल्ल्याची रेंज!

दोनचं रंगाची उधळण...आकाशाचा निळा आणि चौफेर हिरवा!

ह्या रस्त्यावर प्रचंड मोठे थोडेसे ओबडधोबड खडक लक्ष आकर्षित करून घेत होते. “विसाव्यासाठीच मी” असे सांगत होते!  फोटोग्राफीसाठी तर उत्तम लोकेशन!

आम्ही तसे बऱ्यापैकी निवांत जात होतो. विंझर रेंज दोन तासात पूर्ण केली असली तरी अंतर निम्मेच पार झाले होते.

विंझर रेंज सोडली आणि एका थोड्या धोकादायक वळणावर आम्ही आलो. विशालने मला आधीचं कल्पना दिली आणि पाय कसा घसरतो त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं. छोटी पायवाट आणि ओली पण भुसभुशीत माती! शेत नांगरल्यावर जशी माती दिसते अगदी तशी! विशाल माझ्या मागे-पुढे होताचं! त्यात झाडाच्या फांद्या दोन्ही बाजूने कमान करून होत्या. त्या बाजूला करत करून ती बारीकशी पायवाट पार करणं एक कसरत होऊन बसली!

आता मागे वळून बघितलं तर दोन टॉवर ठळक दिसणारा सिंहगड आणि समोर बघितलं तर राजगड-तोरणा रेंज आणि आपण एकदम मधोमध! खूप भारी फिलिंग होतं! 


आता राहून राहून मला केटूएस ट्रेकची आठवण येत होती. एक टेकडी, मग दुसरी, मग तिसरी....अगदी सेम टू सेम ही रेंज होती! हे डोंगर केटूएस टेकड्याइतके ऊंच नव्हते पण प्रकार अगदी तोच!



काही ठिकाणी तर पायवाट देखील नव्हती! गवत तुडवत मार्ग काढायचा! 

राजगड आणि तोरण्याचा एकेक भाग आता अगदी सुस्पष्ट दिसत होता. राजगडावरील सुवेळा माची -संजीवनी माची-नेढे-बाले किल्ला तर तोरण्यावरील बुधेला माची- झुंजार माची!

थोड्या अंतरावर गारजाई मातेचे मंदिर लागले. इथून पुढे हिरव्या-पोपटी कुरणावर पांढऱ्या फुलांचा सडा पडला होता! अतिशय मोहक आणि आकर्षक!



सह्याद्री पर्वतरांगेच हे वैशिष्ट आहे, इथे वनश्री विविधतेने नटलेली आहे. वनस्पती, रानटी फुले, प्राणी, पक्षी, कीटक, वृक्ष इ.

आता लांबून पाबे घाट दिसू लागला होता पण जाण्यासाठी घ्यायची रेंज हा लांबचा पल्ला होता. पुन्हा एका मागून एक डोंगर!

सिंहगड आणि त्यावर उभारलेले दोन टॉवर आता दूर होत गेले होते आणि राजगड-तोरणा जवळ दिसू लागले होते! हा अलौकिक भावपूर्ण अनुभव होता! पर्वतरांग म्हणतात ती हीच ना!

ह्या मार्गावर एक वेगळ्या प्रकारचे मशरूम पाहण्यास मिळाले. दिसायला बटाट्यासारखे आणि मातीत रुजलेले!

काही ठिकाणी गुरांची वाट तर काही ठिकाणी डोंगरवासियांची पायवाट! डोंगरवाटा म्हणतात त्या ह्याचं बहुधा!

रॅम्बलर नावाचे एक गुगल अॅप विशालने वापरले ज्याद्वारे तो ट्रेक मार्ग ट्रेस आणि फिक्स करत होता! ट्रेक मार्गाच्या प्रत्येक वळणावर फोटो काढून ते मॅप वर फिक्स केले होते! त्या अॅपवरून ट्रेक मार्गाची पुरेपूर कल्पना येत होती!

पायलट ट्रेकमध्ये मार्ग शोधायचा कसा हे मला काही कळेना. विशाल म्हणे, “दिशा महत्वाची”!

पाबे खिंडीत पोहोचलो तेव्हा ५ वाजले होते. एकूण अंतर झाले होते १६.५ किमी! आनंदोत्सव मग असा साजरा झाला!


हा नाईट ट्रेक होऊ शकतो, टेकड्या मोजायला हव्या होत्या असा विचार आमच्या मनात येऊन गेला!

पाबे खिंडीत शंकराचे मंदिर होते आणि भले मोठे पिपर आणि वडाचे झाड!

खिंडीत चहा घेतला आणि वेल्ह्याला न जाता रांजणीपर्यंत पायी जायचे ठरवले. खिंडीत दुकान असणाऱ्या दुकानदाराच्या गाडीवरून मी पुढे गेले पण खानापूरवरून एकही वाहन येईना.

विशालला एक जीप मिळाली जिने खानापूरपर्यंत आलो आणि तिथून एसटीने पुण्यापर्यंत! पुण्यात आलो तेव्हा ९ वाजले होते!

“पायलट ट्रेक” ह्या ट्रेक संकल्पनेची कल्पना आली. दिशाहिन ट्रेक मार्गाला दिशाशोधन करून, निश्चित दिशा/मार्ग मिळवून देण्याचा हा सर्वांग सुंदर सफल प्रयत्न आहे! दिशा लोकेट करत जा, पायवाटा शोधत जा, रेंज पकडत आणि फॉलो करत जा, धोक्याच्या जागा नाहीत ना ह्याची शहानिशा करत जा,अचूक मार्ग शोधत, तो मार्क करत जा.....बापरे....

सर्वच अनियोजित आणि अनिश्चित! अगदी प्रवासी वाहन मिळण्यापासून ते ट्रेक मार्गापर्यत! 

पायलट ट्रेक करण्यासाठी त्या भूप्रदेशाची थोडीफार मुलभूत माहिती असायला हवी आणि असायला हवे, पर्यावरणावर प्रेम, डोंगरात भटकायची आवड, चिकाटी, दिशांचा थोडाफार अंदाज, जिद्द, प्रतिकूल परिस्थितीत गडबडून न जाता शांतपणे विचार करण्याची क्षमता, आवश्यक साधन, साहित्य, सामग्री, सदैव जागरूकता, नेतृत्वगुण, संयम, सहकाऱ्यांशी समायोजन, निर्णयक्षमता, समयसूचकता आणि वेळेचे व्यवस्थापन! 

पावसाळ्यातील हा एक सर्वांग सुंदर रेंज ट्रेक वाटला! चौफेर हरियाली, शुद्ध हवा आणि ताजा टवटवीत करणारा निसर्ग!

हा माझा पहिलाच पायलट रेंज ट्रेक होता! ह्या ट्रेकने मला रेंज ट्रेक करण्यासाठी आत्मविश्वास दिला! १६-१७ किमी अंतर, ट्रेक मार्गावरचे कित्येक डोंगर, अरुंद धोकादायक पायवाटा, पर्वतांना जोडणारा घाट इ. गोष्टी मी सहज पार करू शकले! तरीही रेंज ट्रेक करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेची जरुरी आहे ह्याचा अनुभव ह्या ट्रेक ने मला दिला!

“रेंज ट्रेक” ह्या ट्रेक प्रकाराची कल्पना आली आणि सह्याद्री रांगेतील पर्वतरांगा एकमेकांना कशा जोडल्या गेल्या आहेत ह्याची जातीने पाहणी करता आली! ह्या जोडलेल्या  पर्वतरांगा पाहणे, सहकाऱ्यासोबत त्याची चर्चा करणे आणि त्यामागील भावार्थ समजून घेणे हा एक अदभूतरम्य अनुभव वाटला मला! 

ही डोंगरयात्रा करताना सतत एक प्रसिद्ध उक्ती आठवत होती आणि तिचे महत्व जाणवत होते,

“डोंगरात तुमच्या पावलांच्या ठ्शाशिवाय काही मागे ठेऊ नका आणि सुखद स्मृतिशिवाय डोंगरातून काही बरोबर आणू नका”!


फोटो आभार: ट्रेक टीम

No comments: