कुडपन घाट, भीवाची काठी, प्रतापगड आणि पार(सोंड) ट्रेक विथ सह्याद्री ट्रेकर्स फौंडेशन, २४ व २५ डिसेंबर २०१७



"आपण आता वरंधा घाटातून चाललोय,  इथे "मोरझोत" चा सुंदर धबधबा आहे....

इथे शिरगावच्या जवळ एक -दीड किमी अंतरावर नीरा नदीच्या उगमस्थानाच्या ठिकाणी एक प्राचीन कुंड आहे. अतिशय दुर्लक्षित, माहित नसणारे आणि पडझड झालेले हे एक महत्वपूर्ण स्थान आहे.....

समोर दिसतो तो "कावळ्या गड"! गडाच्या नाकावरून कोकण विभाग अतिशय सुंदर दिसतो आणि समोरून "राजगड" आणि "तोरणा" किल्ल्याचे पण दर्शन होते.....

अलीकडेच शोध लागलेला "मोहनगड" (उर्फ दुर्गाडी) इथे जवळचं आहे. गडावरील दुर्गादेवीचे मंदिर खालूनही दिसते....

हा नीरादेवघर धरणाचा डोळे दिपवणारा जलाशय....

हा रसाळगड, सुमारगड आणि महिपतगड...ही रेंज एका दिवसात पूर्ण करता येते पण त्याला पट्टीचा ट्रेकर हवा....

खेड जवळील "जगबुडी" नदीचे हे पात्र......"


आमची गाडी वरंधा घाट मार्गे ढालकाठी- महाड-पोलादपूर- खेड( रत्नागिरी) आणि खेडवरून भरणी नाक्यावरून डावीकडे आंबिवली गावाच्या  दिशेने वळाली. आंबिवली गावातून डावीकडे  वडगाव बुद्रुकच्या दिशेने  पल्ला गाठत होती. हा संपूर्ण रस्ता जगबुडी नदीच्या खोऱ्यातून जातो. प्रवास मार्गावरील सह्याद्रीच्या खाणाखूणांशी सुरेंद्र दुगड सर मला अवगत करत होते!  सरांच्या बाजूला बसण्याचे महत्व त्याक्षणी मला उमगले!

सह्याद्री पर्वतरांगांची खडानखडा माहिती असलेली व्यक्ती बाजूला बसलेली असेल तर गाडीच्या खिडकीतूनही सह्याद्रीच्या अथांगपणाची कल्पना येते  आणि ती हृदयाला थेट भिडते ह्याचा अनुभव ह्या गाडीच्या प्रवासात मी घेतला!

सुरेंद्र दुगड म्हणजे "सह्याद्री पर्वतरांगेची चालती- बोलती-फिरती डिक्शनरी"!

"सह्याद्री ट्रेकर्स फौंडेशन" (संस्थेविषयी सविस्तर माहिती खाली दिलेली आहे) २४ ते २५ डिसेंबर रोजी "कुडपन घाट,  भीवाची काठी, प्रतापगड आणि पार(सोंड) गाव" हा ट्रेक आयोजित केला होता. २४ ला सकाळी ४ वाजता साधारणपणे ५५ जणांचा आमचा ग्रुप ह्या ट्रेकसाठी निघाला होता.


साधारण १२ वाजता वडगाव बुद्रुक मधून,  कुडपन गावच्या दिशेने आमचा ट्रेक सुरु झाला! "जगबुडी" नदीतून आणि नदीपात्राच्या काठा-काठाने घनदाट जंगलातून हा ट्रेक मार्ग होता. नितांत सुंदर, शांत, रम्य, हिरवळीने सुसज्ज, थंडगार गारवा आणि आल्हाददायक सावली देणारी !


ऊंच ऊंच झाडी, विविध रंगी रानफुले, लहान-मोठ्या आकारातील, पिवळ्या रंगापासून नीळसर, नारंगी, पांढऱ्या रंगात पंखावर नक्षीकाम असलेली मुक्त उडणारी असंख्य फुलपाखरे! मधूनचं दिसणारे पाणवठे ! अशा सुंदर मार्गावर  आपल्याचं धुंदीत चालण्याचा आंनद काही औरचं! असो.


साधारण एक ते दीड तास सपाटीने चालल्यावर चढाई सुरु झाली. हा चढ साधारणत: ६०० मी. उंचीचा होता. घनदाट जंगलातून जाणारी ही घाटवाट म्हणजेच कुडपन घाटवाट! घाटवाटेचा काही टप्पा तर लहान-मोठ्या, उभ्या-आडव्या, खडबडीत, गुळगुळीत खडकांनी खचाखच भरलेला! खडकातून मार्ग काढत चढ चढायचा! ही घाटवाट पाहून "हरिश्चंद्रगडाची नळीची वाट" आठवते. माणूस जातोय म्हणून "वाट" म्हणायची नाहीतर वाटेची निशाणीही नाही!


एक गावकरी कुटुंब कुडपन गावातून खाली येत होते. ते म्हणे, " आम्ही २० मिनिटात इथपर्यंत आलो". ते अंतर चढून जायला मला दीड तास तर लागलाचं पण कंबरेचा चांगलाच व्यायाम झाला! एका ठिकाणी झाडाच्या मुळीत पाय अडकून पडले आणि दहा मिनिट डोळ्यासमोर अंधार झाला. नी-कॅॅप होती म्हणून खोलवर जखम झाली नाही. असो.



घाटवाटेच्या एका ठिकाणावरून "भीवाची काठी" दिसली. " भीवाची काठी" म्हणजे "साधारण ४०० मी. उंचीचा आकाशात झेपावलेला एक सुळका"! सुरेंद्र दुगड म्हणे, " त्याला स्थानिक नाव भीमाची काठी आहे  पण खरं नाव आहे भीवाची काठी!". ह्या सुळक्याला भीवाची काठी नाव कसे पडले? किंवा त्या सुळक्याचे महत्व सांगणारी फारशी माहिती उपलब्ध नाही. पावसाळ्यात इथे प्रचंड मोठा धबधबा बरसतो. हिरवीगार खोल दरी, आजूबाजूला ५-६ डोंगर आणि त्यात आपले वेगळेपण जपत उभी "भीवाची काठी"!


तर  वडगाव गावातून कुडपन किंवा महाबळेश्वरला  वाहनाशिवाय पायी जाण्याचा हा पर्याय! आमच्या ग्रुपमधील काहीजण खडूने दिशादर्शक खुणा करत होते म्हणून बरं नाहीतर नवखा माणूस हमखास चुकणारचं!

दुपारी १२ च्या दरम्यान वडगाव बुद्रुक पासून सुरु केलेल्या ट्रेकला कुडपनला यायला ४ वाजले! कुडपन जवळ येते तसे चारही बाजूने वेढलेली ही घाटवाट अतिशय मोहक वाटते! त्यात कुडपन गावात शिरलो की त्या गावाचं सौदर्य मन मोहविते. चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेलं आणि विसावलेलं कुडपन हे ३०-३५ घराचं घुमटाकार गाव!


गावाच्या मंदिरात आमचा चहा-पाण्याचा आणि जेवणाचा कार्यक्रम झाला! गावातील एका आजींनी घरात झोपण्यासाठी आश्रय दिला आणि घरात पेटलेल्या चुलीच्या जळक्या निखाऱ्यामुळे थंडीपासून बचाव झाला!

दुसऱ्या दिवशी सहा वाजता चहा आणि उपीट तयार होते. साधारण ७.३० वाजता प्रतापगड मार्गे कुडपन ते पार(सोंड) गाव असा ट्रेक सुरु झाला.  माझ्या दुखावलेल्या गुडघ्याला ६-७ तास ट्रेकच्या ताणातून विसावा देण्यासाठी मी ट्रेक न करण्याचा निर्णय घेतला!

आमची गाडी पार(सोंड) गावात आली आणि मी इथल्या प्रसिद्ध "श्रीरामवरदायिनी" मंदिराला भेट दिली. मंदिराच्या नावात " श्रीराम" असले तरी मंदिर देवीमातेचे आहे! रावणाचा वध करण्यासाठी प्रभूरामचंद्रांना ज्या तुळजा भवानी मातेने आशीर्वाद दिला ती तुळजा भवानी म्हणजेच श्री. क्षेत्र पार्वतीपूर अर्थात पार येथील श्रीरामवरदायिनी माता! शिव आणि शक्ती यांचे एक अलौकिक रूप!


मंदिराच्या आवारात मानाईमाता आणि झोलाईमाता मंदिर आहे.


मंदिराच्या आवारात केदारेश्वराचे प्राचीन शिवालय आहे.


शिवलिंग आणि नंदी यांची प्रतिमा



पार(सोंड) गावापासून साधारण दोन किमी अंतरावर शिवछत्रपतींनी  कोयना नदीवर बांधलेला एक दगडी पूल आहे. कोयना नदीला पूर आल्यावर प्रतापगडावर जाता येत नसे म्हणून शिवरायांनी हा पूल बांधला असे सांगितले जाते. तसेच छत्रपतींंच्या काळात पार्वतीपूर उर्फ पार(सोंड) हे गाव एक मोठी बाजार आणि व्यापारी पेठ होती.


पुलाखाली आणि कोयना नदीच्या काठावर गणपतीचे सुबक मंदिर आहे.


पार (सोंड) गावाच्या जवळचं कोळदुर्ग नावाचा किल्ला असल्याची माहिती एका गावकऱ्याने दिली. किल्ल्यावर जननींमातेचे मंदिर आहे आणि कोळी समाजाची ही आराध्य देवता आहे! असो.

माझा हा फेरफटका होईपर्यंत ट्रेक संपवून आमचा ग्रुप पार गावात दाखल झाला. कुडपन -प्रतापगड-पार(सोंड) गाव ह्या ट्रेकचे वर्णन काही जणांकडून विचारून घेतले, ते असे,

सुरेंद्र दुगड : "कुडपन गावातून ट्रेक सुरु केला की साधारण आपल्या सिंहगडापेंक्षा ऊंच (साधारण ४०० मी) चढाई आहे. कुडपन चढून आल्यावर आपल्याला ओळीने एका रेषेत महिपतगड, सुमारगड आणि रसाळगड दिसतो. हा ट्रेक सह्याद्रीच्या धारेवरून प्रतापगडाच्या दिशेने जातो. इथे डावीकडे पडणारे पावसाचे पाणी सरळ १५० किमी चा प्रवास करून अरबी समुद्राला मिळते तर उजवीकडे पडणारे पावसाचे पाणी थेट १००० किमी प्रवास करून बंगालच्या उपसागराला मिळते. अशी ही अदभूत घाटवाट!  प्रतापगडानंतर अफझलखानाच्या कबरी जवळून घनदाट जंगलातून ही वाट पार(सोंड) गावात पोहोचते. पार (सोंड) घाटाच्या देशावरील सुरुवातीला सह्यधारेवर प्रति श्रीरामवरदायिनी मंदिराच्या वरून हा ट्रेक मार्ग आहे. जवळ जवळ सहा तासांच्या ह्या ट्रेकची वाट अतिशय सुंदर आहे, थोडं जंगल आणि मध्यभागी असलेल्या एका  निमुळत्या कडयावरून हा ट्रेक जातो."




भगवान चवले: "कुडपन वरून कुमठे गावाच्या धनगरवाडी वरून हा ट्रेक मार्ग जातो. हा मार्ग पूर्णत: जंगलातून जातो आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचतो. तिथून अर्ध्यातासात आपण पार(सोंड)गावात येतो. कुमठे गाव आणि त्याच्या वाड्यांवरून कामाच्या उद्देशाने लोक प्रतापगडावर येताना दिसतात".


मंदिराच्या आवारात भोजन तयार करून त्याचा आस्वाद घेतल्यानंतर साधारण ४ वाजता पुण्याकडे परतीचा प्रवास सुरु झाला. वरंधा घाटातून भोर मार्गे पुण्यात आलो तेव्हा ९.३० झाले होते!

एक अनोखा ट्रेक केल्याचा आनंद तर होताचं परंतु योगायोगाने राजपुरोहित काका आणि मा. एव्हरेस्ट एक्सपीडीशन साठी अथक प्रयत्न करणाऱ्या, भगवान चवले यांची ट्रेकला सोबत हा आत्मिक आनंद देणारा क्षण होता!



सुरेंद्र सर, ईश्वर काका यांच्या तोंडून "सविता" हे एकवचनी संबोधन मनाला स्पर्शून गेले!


सुधाकर कुलकर्णी यांनी गुडघ्यावरील जखमेची काळजी खूप आपुलकीने घेतली.

विजय येनपुरे सरांसोबत छान गप्पा झाल्या आणि गणेश आगाशे सरांची उणीवही जाणवली!

जेन्सी ह्या माझ्या मैत्रिणीची ट्रेकला पुनर्भेट, प्रियांका, डॉ. अनुराधा , सुजाता कोंडे आणि  ट्रेकमधील अन्य सख्यांसोबत मौलिक वेळ घालवला.

सागर, सुमीत आणि खासकरून प्रशांतची मिळालेली साथ ट्रेक सुसह्य करून गेली!

शारीरिक आणि मानसिक बळाच्या जोरावर ट्रेक करताना   असे ट्रेक सहकारी मिळाले की मन किंचित दुर्बल, हळवं झालं तर काय हरकत आहे, हो ना?

काजू घातलेला चविष्ट उपमा, गरमागरम भजी, भाकरी आणि ठेचा, पावटयाची आमटी, राजपुरोहित काकांनी आणलेले कंदी पेढे-डिंक-बेसन-मोतीचूर लाडू, सुकामेवा, आलं घातलेला चहा  आणि असेच काही लज्जतदार पदार्थ ही तर खास मेजवानी (हो, आणि मी बनवलेले पालक पराठे कसे विसरून चालतील)!---..असो.

दोन दिवसाच्या ह्या ट्रेकची फी होती.... रु ७५० फक्त ! आहे ना भारी !!

अशाचं एखाद्या अनोख्या ट्रेकला पुन्हा भेटूचं! पुढच्या वर्षी!२०१८ मध्ये!

तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!

KEEP HIKING!


फोटो आभार: प्रशांत शिंदे, प्रदीप ढवळे, भगवान चवले आणि ट्रेक टीम

↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧

सह्याद्री ट्रेकर्स फौंडेशन संस्थेविषयी: ही संस्था २००० मधे स्थापन झाली. सुरुवातीला ६-७ जणांनी मिळून ट्रेक सुरु केला. त्यांचा पहिला ट्रेक होता, कात्रज ते सिंहगड! त्यावेळी ट्रेकचा तसा अनुभव नव्हता. ह्या ट्रेकमध्ये सर्व ट्रेक सहभागी पाणी, उन्हाचा तडाखा आणि ट्रेकमार्गावरील गवत-काट्या-कुट्यांनी त्रासून , थकून गेले. सुरुवातीला महिन्यातून एक ट्रेक असा ट्रेक प्रवास सुरु झाला आणि महिन्यातील तो एक ट्रेक कधीही चुकला नाही.

ट्रेक सहभागींकडून ट्रेकचा होईल तेवढाच (actual) खर्च संस्था आकारते, म्हणजेच "ना नफा- ना तोटा" ह्या तत्वावर हा खर्च घेतला जात्तो. ह्या तत्वावर काम करणारी बहुधा ही एकच संस्था पुण्यात आहे!

सुरुवातीला महाराष्ट्रातील किल्ले-गड यांच्या भेटी सुरु झाल्या आणि २०० पेक्षा जास्त किल्ले-गड त्यात समाविष्ट झाले.  जून २००८ मधे संस्थेने किल्ले-गड व्यतिरिक्त  नवीन ट्रेक मार्गांचा शोध सुरु केला आणि दर आठवड्याला ट्रेक करणे सुरु केले.

रॅप्लिंग सारखे साहसी कार्यक्रम देखील संस्थेने सुरु केले. त्यात समावेश आहे, काळू रिव्हर वॉटर फॉल रॅॅप्लिंग-दोन दिवस आणि प्लस व्हॅली रॅप्लिंग-एक दिवस! ह्या साह्सासाठी आवश्यक ते सर्व साहित्य जसे, रोप्स, हर्नेस, डीसेंडर, कॅराबीनर्सअर्स इ. संस्थेने मोठ्या प्रमाणात खरेदी केले.

संस्थेतर्फे चालविण्यात येणारे साहसी कार्यक्रम:
-साहसी खेळ: रॅप्लिंग आणि रॉक क्लायबिंग
-सह्याद्री तील विविध घाटवाटा ट्रेक्स...१०० हून अधिक घाटवाटा
-मूनलाईट ट्रेक्स
-विविध ठिकाणी मूनलाईट टेंट कॅम्पिंग
-२-४ दिवसांचे सह्याद्री ट्रेक्स
-डीप व्हॅली नाईट स्टे (कुंडलिका आणि सांदण व्हॅली)
- हिमालयीन ट्रेकसाठी लोकांना प्रोत्साहित करणे (ह्या वर्षी भगवान चावले यांना मा. एव्हरेस्ट एक्सपीडीशनसाठी प्रोत्साहित केले जात आहे)
-वर्षातून एकदा हिमालयीन ट्रेक करणे

२००८ सालापासून मागील सलग  ४७५ आठवडयामधे शनिवार-रविवारी होणारा एकही ट्रेक संस्थेने चुकवला नाही.

मागील ५२ आठवड्यामधे साधारणपणे ३००० लोकांनी ट्रेकमध्ये सहभाग घेतला. ह्या लोकांमधे विविध समाजातील, ७ ते ७८ वयोगटातील  स्त्री-पुरुषांचा आणि मुलांचा  समावेश आहे

ट्रेकसाठी संस्थेचे प्रयाण सकाळी ४ वाजता सुरु होते आणि हे ह्या संस्थेचे खास वैशिष्ट्य आहे!

ट्रेकसाठी अॉन-लाईन बुकिंग आणि त्या ट्रेकसाठी बनवलेल्या वॉट्स-अॅप ग्रुप मधे लिंकद्वारे अॅड होण्यासाठी सॉफ्टवेअरची सुविधा संस्थेने बनवली आहे.

ट्रेकमधे सहभागी झालेले लोकचं ट्रेकमध्ये नाश्ता-जेवण बनवतात. त्यासाठीची आवश्यक ती तयारीही ते स्वत:च करतात.

संस्थेच्या वॉट्स-अॅप ग्रुपमधे सध्या २००० लोकांचा समावेश आहे. (सर्व ग्रुपचा एकचं ब्रॉडकास्ट ग्रुप संस्थेने नुकताच बनवला आहे). डॉक्टर्स, चार्टर्ड अकाऊंटंट, कन्सल्टंट, सेवानिवृत्त लोक, बँक कर्मचारी, इन्शुरन्स कर्मचारी, पोलीस, सरकारी कर्मचारी, विद्यार्थी इ. ची ह्या २०००  मधे गणना होते. ह्तातील ३० -४० % लोक जेष्ठनागरिक आहेत!

दोन वर्षापूर्वी सह्याद्री ट्रेकर्स  चे एका चॅरिटेबल ट्रस्ट मधे रुपांतर झाले आहे आणि आता संस्थेचे नाव आहे,
" सह्याद्री ट्रेकर्स फौंडेशन"पुणे!

कार्यकारी मंडळ खालील प्रमाणे आहे,
सुरेंद्र दुगड (फाऊंडर ट्रस्टी)
सुधाकर कुलकर्णी (ट्रस्टी)
विजय बुटाला (ट्रस्टी)

↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑

भेदक आणि न्यारा हर्षगड उर्फ हरिहर गड ट्रेक, १० डिसेंबर २०१७


नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर वरून २० किमी दूर असणाऱ्या निरगुडपाडयासाठी गाडी निघाली आणि रस्त्याच्या कडेलगतचा "घोटी" आणि "इगतपुरी" चा बोर्ड वाचून चक्रावले. आठवणी ताज्या झाल्या! १९९२ साली कामाच्या निमित्ताने कैक वेळा ह्या रस्त्यावरून मी गेले होते. आज कित्येक वर्षानंतर त्याच रस्त्यावरून चालले होते. १९९२ मधे "ट्रेक" हा शब्दाशी दूरदूरपर्यंत काहीही संबंध नसलेली मी आज त्याच रस्त्यावरून "हरिहर फोर्ट अर्थात हर्षगड" ट्रेकसाठी निघाले होते! असो.

जवळजवळ दीडवर्षापासून प्रतिक्षेत असणाऱ्या किल्ल्याला भेट देण्याचा योग आज आज रविवार १० डिसेंबर २०१७ रोजी आला. खरंतर तब्येत थोडी नरम होती, खोकला होता म्हणून निर्णय होत नव्हता. पण एका क्षणी विचार केला "आज आणि आत्ताचं" आणि माझा होकार कळवून टाकला!

शनिवारी मध्यरात्री पुण्यातून निघून पहाटे पहाटे त्र्यंबकेश्वरला पोहोचलो. नाश्ता करून निरगुडपाड्याचा रस्ता धरला. सकाळी ८.१५ ला ट्रेकला सुरुवात केली. निरगुडपाडा गावातून दिसणारा "हर्षगड"!



कैक वेळा ह्या गडाचे फोटो बघितले होते. डोंगरकडयात खोदलेल्या कातळ पायऱ्या! अत्यंत भेदक आणि भयप्रद!  ऐकूनही होते ह्या किल्ल्याविषयी आणि खासकरून किल्ल्याकडे जाणाऱ्या पायऱ्यांविषयी! "अत्यंत स्टिफ पायऱ्या आहेत, जवळ जवळ ८०-९० अंशातील खड्या पायऱ्या, पायऱ्यामधे खाचा आहेत त्यांना धरून पायऱ्या चढाव्या लागतात, आणि उतरताना पाठमोऱ्या उतराव्या लागतात. पावसाळ्यात खूप स्लीपरी असतात, खाचांमध्ये पाणी साठतं, शेवाळं तयार होतं आणि त्यामुळे हाताला ग्रीप मिळतं नाही, एकावेळी एकचं जणं जावू शकतं, पायऱ्या तीन-ते साडे-तीन फुट उंचीच्या आहेत, धोक्याच्या आहेत" इ. इ. हे सर्व ऐकून नकळत मनात एक घबराहट निर्माण झाली होती. घबराहट मनात घेऊनचं मी ट्रेकला सुरुवात केली!

मित्रपरिवार असल्याने तसे रमत-गमत गेलो. 




निरगुडपाडयापासून किल्ल्याच्या पायथ्याशी जंगल वाटेने साधारण दीड तासात आम्ही पोहोचलो! १-२ ठिकाणी चढायला जरा अवघड असणारे रॉकी पॅचेस पार करून आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी आणि कातळात खोदलेल्या त्या दगडी पायऱ्यांपाशी येऊन ठेपलो. माझी नजर किल्ल्याच्या महादरवाज्यावर खिळली! शेंदरी रंगातील दरवाजा आणि त्यावर फडकणारा भगवा ध्वज हे काळ्याकभिन्न डोंगर पायऱ्यांमधे आकर्षक आणि मोहक दिसत होते. कित्येक ट्रेकर्स, नॉन-ट्रेकर्सना भुरळ घालणारा-मोहिनी घालणारा, मंत्रमुग्ध करणारा, आपल्याकडे खेचून घेणारा हाच तो महादरवाजा आणि ह्याच त्या काळीज चिरत जाणाऱ्या कातळ पायऱ्या!

हरिहर उर्फ हर्षगड, नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकरांगेत विसावलेला एक प्राचीन ऐतिहासिक किल्ला आहे. समुद्रसपाटीपासून साधारण ११२० मीटर उंचीवर असणारा हा किल्ला  दगडात कोरलेल्या खड्या आणि तीव्र चढाईच्या अनोख्या पायऱ्यांमुळे आकर्षित करतो! असो.

मी पायऱ्या चढायला सुरुवात केली आणि क्षणभर हात-पाय थरथरले! ती घबराहट डोळ्यासमोर आली. त्या पायरीवर तशीच एक क्षण थांबले. शरीर स्थिर होऊ दिलं आणि सकारात्मक निश्चय करून पायऱ्या चढायला लागले! चित्त एकाग्र करून आणि लक्ष फक्त चढण्याकडे ठेऊन, एक स्थिर वेग ठेऊन, महादरवाज्यापर्यतच्या त्या धोकादायक समजल्या जाणाऱ्या, साधारण तीस एक पायऱ्या मी एका दमात चढून गेले! खालच्या पायरीवर पाय ठेऊन वरच्या पायरीच्या दगडी खाचेत /खोबणीत हात घट्ट रोवून पायऱ्या सहज चढता आल्या! दोन्ही बाजूला डोंगरकडा आहे त्यामुळे संरक्षण मिळतं. काही पायऱ्यांवर तळपाय उभा पूर्ण फिट बसतो तर काही पायऱ्यांवर तो अर्धवट बसतो. काही ठिकाणी ह्या पायऱ्या वळण घेतात त्याठिकाणी पायरी छोटी होते. एका ठिकाणी दोन पायऱ्यांमधले अंतर हे पाय टेकवण्यासाठी थोडे जास्त होते. सुदैवाने एकही पायरी अशी वाटली नाही जिला खाच/खोबणी नव्हती. त्यामुळे चढणं सुकर झालं!   पायऱ्या चढून गेल्यावर मनात आलं "मी उगाच बाऊ करून घेतला होता"!. पावसाळ्यात पाणी आणि शेवाळामुळे पायऱ्या धोकादायक ठरू शकतात आणि  उन्हाळ्यात सूर्याच्या उष्णतेने दगड तापून हाताला चटका देऊ शकतात. आत्त्ताच्या सीझनमध्ये सकाळी सकाळी किल्ला चढलात आणि चढण्या-उतरण्याचे काही नियम पाळले, खबरदारी घेतली तर तर ह्या पायऱ्या चढायला-उतरायला  घाबरण्याचे काही कारण नाही!


पायऱ्या चढून महादरवाज्याच्या आत गेले. दगडात कोरलेल्या शेंदूर फासित एका  मूर्तीने लक्ष वेधून घेतले. 


थोडे आत गेले आणि नेढे पाहून त्याचे वेगळेपण लक्षात आले. दगडात कोरलेले हे नेढे अधांतरी आहे आणि इथे दगडातील एक भलीमोठी कपार तयार झालेली आहे. 



बोगद्यातून गेल्यासारखे खाली वाकून पुढे गेले आणि पुन्हा शिडी/जिन्यावजा दगडी पायऱ्या लागल्या. वळणाच्या ह्या पायऱ्या थोड्या जास्त उंचीच्या आहेत आणि खोदलेल्या आहेत. ह्या साधारण ८०-९० पायऱ्या सावकाश चढून गेले.

ह्या पायऱ्या पाहून /चढून मन थक्क झालं. त्यांची रचना, उंची, लांबी, रुंदी, मान झुकवत नेऊ घालणारी कातळ कपार आणि खाली अचाट भेदक दरी, आधारासाठी पायऱ्यात विसावलेल्या खोबण्या, बाजूला डोंगर कडा! .शत्रूला ध्यानात धरून किती छ्पव्या पद्धतीने गडाची रचना केलेली आहे.हे गड/किल्ले कसे तयार झाले असतील? कोणी बनवले असतील? कडेलोट करण्याच्या कितीतरी जागा! असो. 

पुन्हा एक दगडी चढणं चढून किल्ल्याचे पठार आले. पाण्याचे कुंड आणि तलाव, हनुमानाचे मंदिर, चौथऱ्यावर नंदी आणि शिवलिंग यांच्या प्रतिमा आहेत. दगडी धान्य/दारू कोठार आहे. 



किल्ल्याची फेरी पूर्ण करून, सकाळच्या थंडगार हवेत फ्रेश होऊन मग किल्ल्याचा माथा असणारा एक कातळटप्पे असलेली साधारण ५०-६० फुट उंचीची टेकडी आहे. ही टेकडी पाहून मला कलावंतीणीचा बुरुज आठवला!




ही टेकडी/गडमाथा चढायला आत्मविश्वास थोडा कमी पडत होता. पायाला ग्रीप मिळेल, पाय खाचेत रोवला जाईल आणि हाताला वर पकड मिळून शरीराला पुश करता येईल असे मला वाटतं नव्हते. मित्रांनी गाईड केले, चढायला मदत केली आणि हा बुरुज चढून गेले. इथून नजरा विलोभनीय दिसत होता. अंजनेरी किल्ला, ब्रम्हगिरी पर्वत आणि वैतरणा धरणाचा जलाशय हे उठून दिसत होते!

मित्रांच्या सहाय्याने ही टेकडी उतरले आणि हुश्श झालं! उतरताना पायऱ्या पाठमोऱ्या न उतरता वरच्या पायरीच्या खाचेला पकडत, तिरकी उभी राहत, एक-एक पायरी मी सावकाश उतरले. साधारण ३ वाजता आम्ही निरगुडपाडयात आलो. जेवण करून संध्याकाळी ४ वाजता पुण्याकडे परतीचा प्रवास सुरु केला. वाटेत नारायणगावात गरमागरम मसाला दुध पिऊन साधारण ११ च्या दरम्यान पुण्यात पोहोचलो!

दीड वर्षांच्या प्रतिक्षेत असलेला हा ट्रेक पूर्ण झाल्याचे समाधान घेऊन मी आले तर होतेच पण माझ्या ज्या मित्र-मैत्रिणीमुळे हा ट्रेक मी पूर्ण करू शकले त्यांच्यामधे माझ्याबद्दल असणारा आदर, काळजी, स्नेह, जपणूक, जिद्द इ. च्या अनुभवामुळे मी हेलावून देखील गेले होते! 

मी ट्रेक करताना त्यांनी काढलेले माझे काही नॅचरल फोटो मला तर भलतेच आवडले!



फेसबुक वर ते फोटो मी अपलोड केले आणि किल्ल्याबद्दल अधिक जाणून घेऊन काही मुलींनी ते ट्रेक-साहस करण्याची इच्छा माझ्याकडे व्यक्त केली. ट्रेक करण्याचा आणि यथार्थ फोटो अपलोड करण्याचा उद्देश सफल झाल्याचे आंतरिक समाधान, हरिहर ट्रेकने मला दिले!



ट्रेक सहकारी: प्रशांत शिंदे, स्मिता राजाध्यक्ष, ओंकार यादव, विठ्ठल भोसले, प्रतिक शहा, विश्वंभर कुलकर्णी, मृणालिनी कुलकर्णी आणि श्रीकांत शर्मा.

फोटोसाठी खास आभार: ओंकार यादव, प्रशांत शिंदे आणि विश्वंभर कुलकर्णी

ओंकार, हा फोटो तर भन्नाटचं! कित्येकांच्या बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या!




चावंड किल्ला -कुकडेश्वर मंदिर-अंबा,अंबिका केव्ह्ज विथ "माची" इको अॅन्ड रुरल टुरिझम !१८ नोव्हेंबर २०१७


श्री. राजकुमार डोंगरे ,वनस्पती अभ्यासक, माझे स्नेही आणि परममित्र यांच्या विचारातून साकारलेली एक संकल्पना म्हणजे "माची"!

"माची " विषयी वाचूयात त्यांच्याच शब्दातून......



आजच्या पिढीला ग्रामीण जीवन आणि सह्याद्री रांगेतील विविध पैलूंची ओळख करून देण्याच्या ध्यासातून पुढे आलेली एक संकल्पना! आहे ना भन्नाट!  ह्या संकल्पनेबद्दल ऐंकल आणि उत्सुकता शिगेला पोहोचली. त्यांच्या पहिल्या इव्हेंटचा अनुभव घेण्यासाठी मन आतुर झालं होतं.

"माची" अंतर्गत पहिला इव्हेंट होता....



जवळ जवळ तीन महिन्यापासून आकार घेत असलेला हा इव्हेंट एकदाचा समीप येऊन ठेपला. १८ तारीख उजाडली आणि १७ उत्साही पार्टीसिपंन्टस ना घेऊन "माची" निघाली.

टीम लीडर्स तेवढेच भन्नाट! राजकुमार डोंगरे स्वत:. वनस्पती, फुले, पाने, पक्षी इ. चा दांडगा अभ्यास असणारं एक अफलातून व्यक्तिमत्व! "वनधन सह्याद्रीचे" (http://sahyadrivandhan.blogspot.in)  या मथळ्याखाली सह्याद्री रांगेत सापडणाऱ्या विविध फुलांविषयी ब्लॉग लेखन ते करतात.

ओंकार ढाके! जुन्नर तालुक्यातील पर्यटनात तीन वर्षापासून कार्यरत असलेला गाईड! स्थानिक आणि परदेशी पर्यटकांना जुन्नर आणि आजूबाजूच्या ठिकाणे, गड-किल्ले, लेण्या इ. ची माहिती देऊन समृद्ध करणारे आणि हा वारसा आपल्या ज्ञानसागराने जिवंत करणारे एक अभ्यासू आणि तडफदार व्यक्तिमत्व!

विशाल काकडे!  "स्वच्छंद गिर्यारोहक" (www.sgtrekkers.in) नामक पुण्यातील ट्रेक संस्थेचा एक उमदा लीडर आणि सह्याद्री रांगेतील ट्रेकिंग क्षेत्रातील गड-किल्ले, घाटवाटा यांच अचाट ज्ञान असणारं  एक अफाट व्यक्तिमत्व!


जुन्नर गाव सोडलं आणि जुन्नर तालुका, त्यातील गड-किल्ले, लेण्या, अभयारण्य, धरणे इ. ची  थोडक्यात माहिती ओंकार ने दिली. सात किल्ले, पाच धरणे आणि ३५०-३७५ लेण्या एकट्या जुन्नर मधे आहेत. चैत्य, विहार आणि आह्क लेण्यांपैकी चैत्य आणि आह्क लेण्यांचा समूह फक्त जुन्नर मधे बघायला मिळतो.

चावंड किल्ल्याच्या बेस व्हिलेज मधेच "कासवनंदी" या शिल्पाची ओळख झाली. कासव आणि नंदी एकत्रित  कोरलेलं एक हटके शिल्प! या प्रकारचे शिल्प उत्तरप्रदेशात जास्त बघायला मिळतात अशी माहिती ओंकार ने दिली.



गावातून पुढे किल्ल्याकडे पायवाटेने थोडं चालून गेल्यावर चावंड किल्ल्याच्या पायथ्याशी आलो. पायथ्यालाचं किल्ल्याची माहिती देणारा फलक दिसला!

ह्या गडाला प्रसन्नगड, चामुंडगड असेही म्हणतात.  इ.स. १६७२-१६७३ च्या सुमारास छत्रपती शिवाजीमहाराजांनी चावंडचा किल्ला निकराने लढून काबीज केला आणि त्याचे नाव बदलून "प्रसन्नगड" असे ठेवले"!


"चावंड" हा "चामुंडा" चा अपभ्रंश असावा  असा अंदाज वर्तवला जातो किंवा किंवा "चामुंडा चा अपभ्रंश "चावंड" झाला असावा कि काय ही देखील शक्यता नाकारता येत नाही.

किल्ल्यावर घेऊन जाणाऱ्या दगडी पायऱ्या अलीकडेच बांधलेल्या आहेत.



पायऱ्या चढताना दिसणारी विविध फुले आणि माणिकडोह धरणाचा परिसर नजरसुख देणारा!



रेलिंगच्या सुरुवातीला कातळ कड्याचा भाग तोडलेला  दिसत होता. ज्यावेळी इंग्रज १८१८ मधे महाराष्ट्रात आले तेव्हा त्यांनी "फोडा आणि राज्य करा" ही नीति अवलंबली होती. सुरुंग लावून त्यांनी किल्याचे मार्ग बंद केले. सुरुंग लावून हे मार्ग उध्वस्त केल्याच्या  काही खुणा म्हणजे का तोडलेला  भाग!

दगडात कोरलेल्या खोबण्या/पायऱ्यांनी चढाईचा शेवटचा टप्पा थोडा धोकादायक वाटला. एकावेळी एकचं व्यक्ती इथून जाऊ शकते.



असुरक्षित झालेल्या पूर्वीच्या शिड्या काढून त्याठिकाणी आता रेलिंग लावून चढाईचा हा टप्पा ट्रेकर्स आणि पर्यटकांसाठी सुरक्षित केला आहे. "शिवाजी ट्रेल" नावाच्या दुर्गसंवर्धनासाठी काम करणाऱ्या पुण्यातील संस्थेने हे रेलिंग लावून घेतलेले आहे.



ह्या खोबण्याच्या पायऱ्या चढून गेल्यानंतर अतिशय उंचच्या उंच पायऱ्या चढून जाव्या लागल्या. ह्या पायऱ्यांमुळे त्यावेळी लोक किती उंच आणि धिप्पाड असावेत ह्याची कल्पना येते.



पायऱ्या चढत असताना एका तोफेने लक्ष वेधून घेतलं आणि  ती पायऱ्यांच्या मधोमध का आहे ह्याचं कारण जाणून घेण्याची उत्सुकता दाटून आली. स्थानिक लोकांनी किल्ल्यावरील तोफ सपोर्ट साठी इथे आणून लावली. ह्या तोफेला साडी बांधून हे स्थानिक लोक त्याचा आता दोर लावून क्लायंबिंग किंवा रॅपलिंग करतात तसा वापर करत असतं.

आता किल्ल्याच्या प्रवेश मंडपावर येऊन ठेपलो. मंडप प्रचंड मोठा! जोर लावून माण्यातून तलवार काढून प्रचंड ताकदीने वर करण्यासाठी उंच आणि धिप्पाड सैनिकांना जेवढी जागा लागेल या हिशोबाने ह्या मंडपाची रचना केलेली आहे.

इथल्या गोमुख प्रवेशद्वारावर, गणेशपट्टी, पन्हाळी,इंटर लॉकिंग (मेटल रॉड), गणेशाची दगडात कोरलेली मूर्ती दिसली. तशीच अजून एक मूर्ती बाजूच्या एका भिंतीवरही दिसली. ओंकार ने दिलेल्या माहितीनुसार प्रथम ह्या बाजूचे प्रवेशद्वार बनवले असावे आणि मग वास्तूशास्त्रानुसार किंवा अन्य कोणत्या कारणाने ते  दार बंद करून नवीन प्रवेशद्वार तयार केले असावे.



आता प्रवेशद्वारातून आत गेल्यावर किल्ल्यावर मुबलक गवत उगवलेलं होतं. गवतातून जाणारी पायवाट कापून गेल्यानंतर पाण्याचा एक मोठा कुंड आणि नंदीची जागा, शिवमंदिराचे अवशेष दिसून आले.




इंटर लॉकिंग कसं केलं जात होतं, मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी असणाऱ्या राक्षसी प्रतिमेचं महत्व (गाभाऱ्यात प्रवेश करून जाताना पायरी ओलांडून न जाता , तिच्यावर पाय ठेवून म्हणजेच आपल्यातील राक्षसी प्रवृत्तीला चिरडून टाकून गाभार्यात प्रवेश करणे)  इ. ह्याची माहिती इथे ओंकार ने दिली.


किल्ल्यावर थोडे पुढे गेल्यावर "७ टाके" ची दिशा दर्शवणाऱ्या एका पाटीने लक्ष वेधून घेतले. सात टाक्यात पाणी होते आणि प्रत्येक टाक्यातील पाण्याचा रंग सूर्यप्रकाशाच्या दिशेनुसार वेगळा भासत होता. ह्याठिकाणी भू-अंतर्गत वाडा असावा असा अंदाज बांधला जातो.



किल्ल्यावर पुढे भटकत गेलो तो लेण्यांच्या समूहाकडे. दारुगोळा साठा करून ठेवण्यासाठी, प्रसंगी कैद्यांना ठेवण्यासाठी, धान्यकोठार म्हणून  बांधलेल्या ह्या लेण्या!



किल्ल्यावरील कामकाजाचे सदर, निवासाची जागा , टॉयलेट, जोती, पाण्याच्या टाक्या इ. ह्या गोष्टी दिसल्या. किल्ल्यावरून समोर दुर्ग ढाकोबा, नवरा-नवरीचा डोंगर, दौन्ड्या डोंगर, निमगिरी -हनुमंत गड हा जोड-किल्ला इ. गड सुस्पष्ट दिसत होते.

गडावरील समोरील बाजूस थोडे उंचावर चामुंडेश्वरीचे मंदिर आहे. चावंड गावची ही ग्रामदेवता! ह्या मंदिराचे अलीकडेच नूतनीकरण करण्यात आले आहे.

किल्ल्यावरील भाग पाहून आता आम्ही किल्ला उतरायला लागलो. पोटात कावळे ओरडायला लागले होते. गावातील शाळेच्या व्हरांड्यात चविष्ट भोजनाचा आस्वाद घेतला. तांदळाची भाकरी, पिठलं, भात-वरण, ठेचा इ.


आता कुकडेश्वर मंदिराकडे आमची वाटचाल सुरु झाली. माणिकडोह धरणाला पाणी देणाऱ्या कुकडी नदीचा उगम दाखवणारे मुख आणि मागे कुकडेश्वराचे हेमाडपंथी धाटणीतील मंदिर! इ. सन. नवव्या शतकात बांधलेले हे मंदिर. शिलाहार जमातीतील झंझ नावाच्या राजाने हे मंदिर बांधले. गाईला संस्कृत मधे "ककुड" म्हणतात. सातवाहन राजा आणि त्याची राणी नागनिका हिने याठिकाणी जनतेला गायींचे दान केले म्हणून याठीकाणाला "कुकडेश्वर" म्हणतात. स्थापत्यशैलीचा एक उत्तम नमुना म्हणजे हे मंदिर! दगड आणि चुना मिश्रणातून बांधलेले !



मंदिराच्या आंत पृथ्वी तोलून धरणाऱ्या यक्षाच्या , शिवाच्या असंख्य शिल्प प्रतिमा आहेत!


मंदिराच्या बाहेरील बाजूस हेमाडपंथी बांधकामांत सुंदर कोरीवकाम आणि शिल्पकला कोरलेल्या आहेत.


जुन्नर मधे असणाऱ्या ३५०-३७५ लेण्यांपैकी अंबा-अंबिका लेणी हा एक ५० लेण्यांचा समूह! जैन धर्मात अंबा-अंबिका नावाच्या देवता आहेत त्यांच्या नावावरून हे नाव दिले गेले असावे असा उल्लेख इतिहासात आढळतो. लेण्यांकडे नेणारा रस्ता ही दाट झाडीतला आणि निलगिरीच्या उंच झाडातून मिळणाऱ्या सुखद सावलीतला! बौद्धस्तूप असणारी चैत्य लेणी इथे पहायला मिळाली. जमिनीच्या आत बांधलेल्या पाण्याच्या टाक्या हे ही एक वेगळेपण!






चावंड किल्ला -कुकडेश्वर मंदिर-अंबा-अंबिका केव्ह्ज पाहून झाल्यानंतर एका "सरप्राईझ" ची घोषणा राजकुमार ने केली. ते सरप्राईझ होते "लगोरी अर्थात निन्गोरचा" चा काळानुसार मागे पडलेला एक खेळ! ह्या इव्हेंटमधे ह्या खेळाचा समावेश करून तो काळ पुढे आणण्याचा हा प्रयत्न खूपचं सुखद वाटला!


दुसऱ्या दिवशी हा खेळ जेव्हा घराच्या पटांगणात रंगतो तेव्हा खेळ इथून पुढेही जिवंत राहील ह्याची अबोल आणि सक्रीय ग्वाहीच नाही का?



"चित्रांग नायकूळ" नामक सापाने आमच्यापैकी काहीजणांना दिले विलोभनीय दर्शन ! सापाची माहिती नंतर "माची" च्या ग्रुपवर पोस्ट झाली.



निळ्या रंगाचे फुलं येणारे व्हायरल डिसीज झाल्यामुळे पानावर हिरव्या-पोपटी रंगाचे फोड आलेले "अर्जेरीया"
मोरवेल अर्थात रानजाई, दिपमाळ इ. वनस्पती इथे बघयला मिळाल्या आणि राजकुमार कडून त्याबद्दल अधिक माहिती मिळाली.

अर्जेरीया

सुवासिक मोरवेल अर्थात रानजाई

दीपमाळ



इव्हेंट दरम्यान श्री. विवेक मराठे सरांशी झालेली भेट हा शुभार्शीवादचं!



तर असा किल्ला, लेणी, मंदिर, रानफुले इ. नी भरभरून व्यापलेला "माची" चा हा पहिला इव्हेंट! ह्याच वेगळेपण हेच होतं कि ह्या सर्वांची माहिती देणारे तज्ञ आमच्यासोबत होते आणि त्यांच्या माहितीमुळे हे "पाहण्याला" एक "जिवंतपणा" आला!

"माची" चं वेगळेपण हे पण कि, ट्रेकला लेणी आणि मंदिराची जोड दिली, कुटुंबातील व्यक्तीं एकत्र येऊन भाग  घेऊ शकतील अशी त्याची मांडणी केली, विविधता जपली आणि समोर आणली, तज्ञ व्यक्तींचा समावेश करून घेतला, वेळेचे उत्तम नियोजन केले, प्रत्येक पैलू मधून एक संदेश दिला आणि पर्यटन "जबाबदार" होऊ शकतं हा विश्वास निर्माण केला!

ट्रेकिंग क्षेत्र व्यापक होत असताना ओंकार सारखे गाईड तयार व्ह्यायला हवेत का? असा विचार मनात तरळून गेला. गाईड असल्याने गड-किल्ले, लेण्या, मंदिरे यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन प्रगल्भ तर होईलचं परंतु तो वारसा जतन करण्याचा, त्याचे संवर्धन करण्याचा  संदेश, जबाबदारी,  आणि नवीन गाईड तयार होण्यामध्ये मदत होईल असे वाटले! परत जाताना विचारांनी, दृष्टीकोनाने, बुद्धीने, वर्तनाने समृद्ध झाल्याचे समाधान देऊन जाईल!


ह्या यशस्वी इव्हेंट मुळे "माची" कडून जास्त अपेक्षा निर्माण झाल्याची जाणीव झाली आणि राजकुमार, विशाल आणि ओंकार सारखे लीडर असतील तर त्या अपेक्षा नक्की पूर्ण होतील अशी खात्री पण मिळाली!

"माची" चा पहिला इव्हेंट यशस्वी झाल्याबद्दल मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा! लवकरच एक नवीन संकल्पना आमच्यासमोर आणि आमच्यासाठी तुम्ही घेऊन याल असा विश्वास आहे!


फोटो आभार: ट्रेक टीम