रामायणातील कथाशिल्पांनी सुशोभित सरडेश्वर मंदिर, पळसदेव


शिवमंदिर अर्थात पळसनाथ मंदिर. गाव. पळसदेव. ता. इंदापूर, जि. पुणे. येथील भीमा नदीकाठी बांधलेल्या उजनी जलाशयातील हे मंदिर.



मंदिराच्या मागील बाजूस एक शिल्प आहे. शंकर आपने वाहन नंदी वर आरूढ आहेत तर सोबतची गौरी अर्थात पार्वती सरड्यावर. म्हणूनच या स्थळा "सरडेश्वर" म्हणूनही ओळखले जाते. 




पौराणिक कथेनुसार त्याची आख्यायिका आहे ती पुढीलप्रमाणे,

नहुष राजा हा पुरुरवा चा मुलगा. वृत्रासुर च्या वधाने इंद्र जेव्हा ब्रह्महत्या चे प्रायश्चित्त म्हणून एक हजार वर्ष तप करण्यासाठी गेला तेव्हा नहुष याला स्वर्गाचा राजा बनवले गेले. त्याचा त्याला उन्माद चढला. त्याने कां नजरेने इंद्राणी देवी कडे पाहिले. अतिप्रसंग करण्याचाही प्रयत्न केला. तेव्हा इंद्राणीने त्याला शाप दिला की तू सरडा बनशील आणि पृथ्वीवर जाशील. नहुष राजा सरड्याच्या रुपात पळसदेव मंदिर समूहाच्या आवारात पडला म्हणून त्याला "सरडेश्वर" म्हणतात.

गुगुल वर माहिती शोधताना एका लेखात मला "सरडेश्वर" असा उल्लेख सापडला (संदर्भ नं २)



पळसदेव मंदिराशेजारील देवालयात खालील शिलालेख आहे. स्थानिक लोकं हे मंदिर बळीराजाचे आहे असे मानतात.



शिलालेखाच्या वाचनात याचा उल्लेख "सरडेश्वर" असा केला आहे (संदर्भ नं ३)


पळसनाथ मंदिराच्या समोर घाटावर थोड्या उंच टेकडीवर एक मंदिर आहे. पळसदेव येथील पाच मंदिर समूहापैकी हे एक मंदिर. ही मंदिरे पंचायतन आहेत असे तज्ञ मानतात.



पळसनाथ, बळीराजा, काशिनाथ, विश्वनाथ आणि सोमनाथ अशी ही पाच मंदिरे स्थानिक लोकांच्या सांगण्यातून. त्यातील काशिनाथ मंदिराचा गाभारा रिता आहे. विविध लेखांमध्ये या मंदिराचा उल्लेख काशिनाथ, सोमनाथ, सूर्यदेव मंदिर, विष्णू मंदिर, राम अथवा रामनाथ मंदिर, वैष्णव मंदिर , सरडेश्वर असा केलेला आहे. आपण "सरडेश्वर " मंदिर म्हणून चालुयात.




याचं सरडेश्वर मंदिराबद्दल या ब्लॉगमधून जाणून घेऊयात.

गर्भगृह , त्या पुढील अंतराळ अ सभामंडपासाठी असेलेले दोन प्रवेश व मुखमंडप अशी त्याची रचना आहे. या मंदिराचे वैशिट्य म्हणजे गर्भगृहाचे साधे प्रवेशद्वार. हे मंदिर तेराव्या शतकाच्या प्रारंभी बांधले असावे (संदर्भ नं २ नुसार)




मंदिराचा अंतराळ, देवकोष्ठ आणि रंगशीळा अत्यंत सुबक कोरीव आहे.  





मंदिराचा काही भाग ढासळलेला परंतु शिल्प वैभव मात्र सुस्थितीत आहे. मंदिराच्या बाह्यभागावर रामायणातील कथा कोरलेल्या आहेत. त्यातील काही कथाशिल्पे इथे देत आहे.

रावणशिल्प




सीताहरण




हनुमानाने अशोक वाटिकेत केलेला उत्पात



सेतुनिर्मिती






धनुर्धारी राम आणि लक्ष्मण




देवकोष्ठ स्थित विष्णू




सूरसुंदरी




मंदिराचा डोलारा




सरडेश्वर  मंदिर आणि बाजूला दिसणारे पळसनाथ मंदिर ह्याचे सौदर्य तर काय मनोहर




मंदिरातील हे विलोभनीय शिल्पवैभव पाहून मी स्तिमित झाले. एक एक शिल्प ओळखण्यासाठी अभ्यासही तितकाच दांडगा हवा. 

पळसदेव मंदिर समुहाची माहिती शोधत असताना दोन उत्कृष्ट लेख वाचण्यात आले. ते इथे देत आहे.




पळसदेव मंदिर समुहावर केलेल्या अभ्यासावर आधारित हा लेख डेक्कन कॉलेज च्या बुलेटीन मधे प्रसिध्द झाला आहे (संदर्भ नं १). या लेखाची लिंक खाली देत आहे.




दुसरा लेख (संदर्भ नं २)




लेखाची लिंक खाली देत आहे,

www.evivek.com/Encyc/2016/6/25/1850923

गुगलवर शोधताना सरडेश्वर किंवा पळसदेव मंदिर समूहा वर दिलेल्या पौराणिक कथा किंवा आख्यायिकेशी साधर्म्य असणारे प्रतापगढ़ (उ. प्रदेश) येथील "अजगरा" शहराविषयी वाचण्यात आले. (खालील माहिती आणि फोटो गुगल वरून घेण्यात आले आहेत)



दोन प्रदेशातील आख्यायिकेशी असणारे साधर्म्य वाचून मी देखील किंचित अचंबित झाले. छान वाटले. "सरडेश्वर" आणि "अजगरा" यांच्या कथेतील साम्य वाचून.





असो.

काशिनाथ/रामनाथ मंदिरामधील एकीकडे अति विलोभनीय शिल्प वैभव पाहताना मंदिराची ढासळलेली स्थिती पाहून मन खिन्न झाले. कोणत्या टप्प्यावर काय करता येईल जेणेकरून हा बहुमुल्य वारसा सुस्थितीत जतन होईल हे विचार डोक्यात सुरु झाले......



हे विचार सुरु ठेवतच पळसदेव गाव सोडल......

उजनी धरणाची पाण्याची पातळी ओसरल्याने हा मंदिर समूह पाहता आला. सरडेश्वर मंदिराच्या शिल्पवैभवाची माझ्या परीने नोंद ठेवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न!

आशा करते तुम्हाला भावेल.............

धन्यवाद!

🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

मुख्य संदर्भ: 

१. पळसदेव येथील मंदिर समूह एक अभ्यास: लेखक: बी.एस. गाजूल, प्रमोद दंडवते, पी. डी. साबळे. 

Bulletin of the Deccan College Post Graduate and Research Institute, Vol 72/73 (2012-2013), pp 337-346.
Published by: Vice Chancellor, Deccan College Post Graduate and Research Institute (Deemed University), Pune

२. गंगार्पण पळसदेवाचे: लेखक: अरुणचंद्र शं. पाठक, विविक मराठी, २५ जून २०१६ आणि महाराष्ट्रा टाईम्स १० जुलै २०१६

३. महाराष्ट्र आणि गोवे ताम्रपट आणि शिलालेख : लेखक: शांं. भा. देव


🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺


ही मंदिर वारसा सहल आयोजित केल्याबद्दल खास आभार: फिरस्ती महाराष्ट्राची, पुणे

🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

हे मंदिर इतके भावले की माझी बहीण आणि जिजाजी यांनाही ते पाहण्याची उत्सुकता दाटली...







महाराष्ट्रातील एकमेव दुरगावातील आगळेवेगळे दुर्योधनाचे मंदिर


आश्चर्याने विस्फारलेले त्यांचे डोळे अजूनही माझ्या नजरेसमोर आहेत. किती बोलके होते ते भाव! खेळातल्या स्टॅच्यु प्रमाणे पूर्णत: स्तब्ध!

आपल्या दूरगावातील एक मंदिर पहायला एवढे लोकं आले आहेत ह्या कल्पनेने, कडेवर विसावलेल्या बाळापासून, सर्व वयोगटातील स्त्री-पुरुष आमच्याकडे अचंबित नजरेने पाहत होते.

"दूरगाव"! अहमदनगर जिल्यात, कर्जत तालुक्यातील एक छोटेसे गाव! दूरगावला पुण्यावरून दौंड-श्रीगोंदा-हिरडगाव-दूरगाव असे जाता येते. दौड पासून साधारण ४० किमी अंतरावर आहे दूरगाव. या छोट्याशा गावात वसले आहे महाराष्ट्रातील एकमेव "दुर्योधनाचे मंदिर"! त्याच बरोबर इथे आहे साधारण पंधराव्या शतकातील शंकराचे मंदिर!

दुर्योधन म्हटल की आठवते महाभारत आणि दुर्योधनाच्या सांगण्यावरून दु:शासनाने केलेले द्रौपदी वस्त्रहरण!

महाभारतातील "खलप्रवृत्ती" दर्शवणाऱ्या दुर्योधनाचे मंदिर? कोणी बांधले? कधी? का? दूरगावीच का?

आमच्या ग्रुपमध्ये कोणीतरी म्हणाल, दुर्योधनाच खर नाव सुयोधन होत. त्याच्या वाईट कर्माने त्याच नाव पडल दुर्योधन.

मंदिर पाहण्याची उत्सुकता वाढली होती. "दुर्योधनाचे मंदिर कुठे आहे?" असं विचारल्यावर गावकऱ्यांनी रस्ता दाखवला. काही सेकंदांत जवळजवळ पूर्ण गावात बातमी पसरली. लोकं घराबाहेर येऊन उभे राहिले. रस्त्याच्या दुतर्फा जमलेले गावकरी विस्मयकारक नजरेने आमच्याकडे पाहत होते.

गाववस्तीकडे पाठ करून असलेले हे मंदिर. आधी झाले ते कळसाचे दर्शन. 



बऱ्यापैकी उंची असलेल्या आणि आतून पोकळ असलेल्या रंगीत कळसाने उत्सुकता अधिकच वाढली. काही पायऱ्या चढून गेल्यावर मंदिर दिसले.



मंदिराचे प्रवेशद्वार विटांनी बंद केलेले. आम्ही आलोय म्हटल्यावर १-२ गावकऱ्यांनी पटापट त्या विटा बाजूला करायला सुरुवात केली. बघता बघता विटांचा ढीग बाहेर काढल्या गेला.


 
आता मंदिराचे दार उघडले गेले. एक छोट्याश्या खोलीत दुर्योधनाचा पुतळा ठेवलेला. अत्यंत सुस्थितीतील आणि आकर्षक!



'महाराष्ट्राची शोधयात्रा' या संकेतस्थळावरील उपलब्ध माहितीनुसार आणि गावातील लोकांनी सांगितलेल्या आख्यायिकानुसार, महाभारतातील भीषण युद्धानंतर भीमाच्या भीतीने दुर्योधन एका सरोवरामध्ये जाऊन लपला. भीमाने दुर्योधनाला युद्धासाठी आव्हान केले तेव्हा सरोवरातील जलदेवतेने दुर्योधनाला सरोवराबाहेर जायला सांगितले. भीम आणि दुर्योधन यांच्यामध्ये घनघोर युध्द होऊन दुर्योधन मारला गेला. तेव्हापासून असे समजले जाते की पाण्याचे थेंब, पाण्याचे ढग, विस्तृत जलसाठे इ. वर दुर्योधन राग धरून आहे. रागीट आणि तापसी वृत्तीच्या दुर्योधनाची जर ढगांवर दृष्टी पडली तर पाऊस पडणार नाही. पाऊस पडला नाही तर दुष्काळ पडेल ह्या समजाने दूरगावचे ग्रामस्थ मंदिराचे दार विटांनी बंद करून ठेवतात.

हीच माहिती विटा दूर करत असलेल्या गावकऱ्यांनीही आम्हाला दिली. दुर्योधनाची मूर्ती कोणी आणली, कधी वसवली गेली इ. बद्दलची माहिती गावकऱ्यांना तितकीशी सांगता आली नाही. परंतु अतिशय सुंदर, सुबक आणि लक्षवेधक दुर्योधनाची मंदिरस्थित मूर्ती पाहून मनात आल की "खलप्रवृत्ती" असणाऱ्या दुर्योधनाचे ही मंदिर असावे ही गोष्टच किती विलक्षण आहे!

भीमाशी झालेल्या युद्धानंतर दुर्योधनाने अंत्यसमयी महेश्वराची म्हणजे शंकराची प्रार्थना केली म्हणून येथे महेश्वर अर्थात शंकराचे मंदिर आहे. मंदिराच्या शिखरामधे दुर्योधनाचे वैशिष्टपूर्ण मंदिर आहे.

शंकराचे मंदिर दगडी चौथऱ्यावर उभारलेले आहे. मंदिराच्या खांबावर जास्त कलाकुसर नसली तरी त्याच्या रचनेवरून ते पंधराव्या शतकातील असू शकतात असे अनुमान आहे. 




सभामंडपात नंदी 




आणि गाभाऱ्यात दोन शिवपिंडी आहेत. हे या मंदिराचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.



महाशिवरात्र आणि अधिक महिन्यात इथे उत्सव भरतो.

महाराष्ट्रातील एक छोट्याशा गावात वसलेला आणि गावकऱ्यांनी जपलेला हा वारसा!



श्रद्धा-अंधश्रद्धा या पलीकडे जाऊन विचार करून महाराष्ट्रात असलेल्या एकमेव अशा दुर्योधन मंदिराला एकदा अवश्य भेट देऊन गावकऱ्यांनी जतन केलेला वारसा तुमच्या आमच्या सारख्या लोकांसमोर यावा हाच ह्या मंदिराबद्दल लिहिण्यामागील एक उद्देश!

🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

संदर्भ: महाराष्ट्राची शोधयात्रा संकेतस्थळ (www.maharashtrachishodhyatra.com)

फोटो आभार: टीम-फिरस्ती महाराष्ट्राची आणि Deepinder Kapany sir
खास आभार: फिरस्ती महाराष्ट्राची, पुणे

शिलालेख आणि डोलणाऱ्या दीपमाळांंनी समृध्द देवी यमाई-तुकाईचे श्री. क्षेत्र राशीन



राशीन गाव अहमदनगर जिल्यातील कर्जत तालुक्यातील. पुणे, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमारेषेवर वसलेले. भिगवण पासून साधारण २५-३० किमी. 

कुमारगावच्या पेशवाईतील मुत्सद्दी अंताजी माणकेश्वर यांची कुलदेवता ही राशीन ची यमाई🙏

नवव्या -दहाव्या शतकातील हे मूलस्थान. साधारण सतराव्या शतकाच्या सुमारास  उभारलेल आताच हे यमाई-तुकाईचं देवीचं मंदिर. या देवीचा उल्लेख रेणुका, जगदंबा, भवानी असा केलेला देखील आढळतो. मंदिराचे प्रवेशद्वार अत्यंत आकर्षक आणि गगनला भिडणारे!




आत प्रवेश केल्यावर भला मोठा सभामंडप! सभामंडपात मंडपाकृती चौथऱ्यावर स्थानापन्न सिंहप्रतिमा! 



समोर अजून एक प्रवेशद्वार!


मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या कमानीवर मध्यभागी खालील शिलालेख आहे.  


सुप्रसिध्द लेखक श्री. महेश तेंडूलकर यांनी मंदिराच्या प्रांगणात असणाऱ्या शिलालेखांचे वाचन केले आहे. त्यानुसार वरील शिलालेख असा आहे, 



श्री. तेंडूलकर सरांनी त्यांच्या "मराठी-संस्कृत शिलालेखांच्या विश्वात" पुस्तकात पान नं ३४५ वर त्याचा अर्थ सांगितला आहे तो पुढीलप्रमाणे: शालिवाहन शकाच्या १७०४ व्या वर्षी शुभकृतनाम संवत्सरातील श्रावण शुद्ध पंचमी या दिवशी कसबे राशीन येथील भुजंगअया यांचा मुलगा महादाप्पा शेटे यांनी मंदिराचे बांधकाम किंवा बांधकामाला सुरुवात केली. 


मंदिरद्वारातून प्रवेश केल्यावर उजवीकडे एक भला मोठा नगाराखाना आहे. 




मंदिराच्या प्रांगणात आहेत ह्या सुरेख, सुबक, भव्यदिव्य, गगनचुंबी, विविध रंगात नक्षीकाम असलेल्या "डोलणाऱ्या दीपमाळा". दक्षिण बाजूच्या दीपमाळेवर जाण्यासाठी बाहेरून पायऱ्या आहेत. उजवीकडील दीपमाळेस आतून जिन्याप्रमाणे पायऱ्या आहेत. बांधकाम खाली दगड आणि वर विटांचे आहे. जिन्याने वर गेले की अगदी वर एक आडवा लाकडी दांडा आहे. तो धरून हलवला की दीपमाळ हलते. ही आश्चर्यजनक रचना इथे बघायला मिळते. एरवी बंद असलेले जिने फक्त दसऱ्याच्या दिवशी खुले होतात. 




दीपमाळे समोरील गाभाऱ्याच्या डाव्या बाजूच्या दुसऱ्या कमानीवर अजून एक शिलालेख दिसला. 



तो शिलालेख असा, 


सरांच्या वाचनानुसार वरील शिलालेख हे दर्शवतो,



शिलालेखाचा सरांनी सांगितलेला अर्थ आहे (पान नं ३४६): शालिवाहन शकाच्या १७०६ व्या वर्षी कोर्धीनाम संवत्सरातील पौष शुद्ध एकादशी या दिवशी (बुधवारी) कसबे राशीन येथील भुजंगअप्पाचा मुलगा महादाप्पा शेटे यांनी दरवाजाचे' बांधकाम केले किंवा बांधायला सुरुवात केली. 

गाभाऱ्याच्या मागील बाजूस ओवऱ्या असून काही मूर्ती चौथऱ्यामधे स्थापित आहेत.



इथे ओवरीच्या दर्शनी भागावर खालील शिलालेख आहे



सरांच्या वचनानुसार शिलालेख असा आहे,



शिलालेखाचा सरांनी सांगितलेला अर्थ आहे (पान नं ३४७): शालिवाहन शकाच्या १७१० व्या वर्षी किलकनाम संवत्सरातील चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) या दिवशी सोमवारी कसबे राशीन येथील महादाप्पाचा मुलगा सदाशिव शेटे यांनी मंदिराचे बांधकाम पूर्ण केले किंवा बांधायला सुरुवात केली. 

मंदिराच्या आवारात गणपतीची शेंदूर अर्चित, दुर्वाफुलांच्या हाराने नटलेली प्रतिमा एकटक पाहत रहावे अशी.



मंदिराच्या गाभाऱ्यात उजवीकडील राशीनची यमाई आणि डावीकडील तुळजापूरची 

तुकाई अशा दोन सुरेख-सुबक मूर्ती आहेत. मूर्तींच्या चेहऱ्यावर तेज पाहत पाय तिथून निघत नाही.




मंदिराचा कळस विविध रंगातील आकर्षक देवदेवतांनी फुललेला आहे.



मंदिराच्या बाहेरील सभामंडपात वीरगळ, सतीशिळा आहेत. तसेच खरूजाई देवीची प्रतिमा आहे.



शिलालेख, यमाई-तुकाई देवी, डोलणाऱ्या दीपमाळा अशी संपन्नता लाभलेले राशीनचे हे वैभवशाली मंदिर. त्याची सुंदरता खालील फोटोतून तर दिसतेच परंतु प्रत्यक्ष पाहून ते सौंदर्य नजरेत साठवणे ही अनुभूती अलौकिकच!



संदर्भ: श्री. महेश तेंडुलकर लिखित, "मराठी- संस्कृत शिलालेखांच्या विश्वात". पान नं ३४५ ते ३४७ 

फोटो आभार: टीम-फिरस्ती महाराष्ट्राची आणि Deepinder Kapany sir
खास आभार: अनुराग वैद्य आणि शंतनू परांजपे. ब्लॉग साठी आवश्यक संदर्भ या दोघांनी पुरवले. 

राशीन चे वैभव बघण्यासाठी उत्सुक फिरस्ती-टीम 😇😇😇



आपल्या प्रतिक्रिया ब्लॉग खाली नक्की पोस्ट करा. 

धन्यवाद!

पुढील ब्लॉग मधे वाचू एका अनोख्या मंदिराची कहाणी..............