सह्याद्री ट्रेकर्स फौंडेशन सोबत रायरेश्वर किल्ला/पठार ट्रेक, २७ ऑगस्ट २०१७

रविवार, २७ ऑगस्ट २०१७ रोजी “सह्याद्री ट्रेकर्स फौंडेशन” ह्या नामंकित आणि सलग ५०० रविवार ट्रेक करणाऱ्या संस्थेसोबत “रायरेश्वर पठार” हा ट्रेक करण्याचा योग माझा ट्रेक सहकारी विशाल काकडे द्वारा आला. ट्रेक मेसेज जेव्हा वॉट्सवर मिळाला तेव्हा तो वाचूनच त्याच्यातले वेगळेपण लक्षात आले. रिपोर्टिंग टाईम होता पहाटे ४ वाजता, पीक-अप पॉईटस स्पष्ट नमूद केलेले होते, ट्रेक कुठून सुरु होणार, कुठे संपणार, किती उंचावर चढायचे आहे, ट्रेकचा प्रवास कसा आणि किती तासांचा असणार आहे पासून ट्रेकचे हायलाईटस इ. चा समावेश त्यात होता. काही गोष्टींचा ठळक उल्लेख ही मला भावलेली गोष्ट जसे, ट्रेकचा अनुभव नसणाऱ्यांनी सहभागी होऊ नये, नो फोन कॉल्स, ट्रेक कॅन्सलेशनचे धोरण आणि लिंक, ट्रेक अपडेट ची सुविधा इ. संस्थेबरोबर नव्याने ट्रेक करणाऱ्याला माझ्यासारखीला शारीरिक आणि मानसिक तयारी बरोबरच संस्था किती धोरणात्मक आणि नैतिक मुल्य जपून काम करत आहे ह्याची कल्पना ह्या मेसेज वरून आली! असो.

पहाटे चारचे रिपोर्टिंग! २.३० उठले, चहा, आंघोळ उरकली आणि भावाने त्याच्या गाडीवर सातारा रोडला मला सोडल. साधारण ४.२० च्या दरम्यान गाडीने सातारा रोडवरून प्रस्थान केले. पहिल्याच सीटवर बसून सुरेंद्र दुगड सर आलेल्या प्रत्येकाची हजेरी नोंदवत होते. हजेरी नोंदवूनच गाडीत प्रवेश! 

विशाल आणि आमची मैत्रीण शिल्पा बडवे मधे ट्रेकिंगच्या गप्पा रंगल्या आणि दोघांचा ट्रेकिंग अभ्यासाचा ग्राफ ऐकून मी अवाक झाले! असो.

विशालकडून मी ऐकलं होत की हा ग्रुप नाश्ता, स्वयंपाक स्वत: ट्रेक ठिकाणावर बनवतात. गाडीने पुणे सोडलं आणि गाडीत नाश्ता, स्वयंपाकाची तयारी सुरु झाली. आलं किसणे, लसूण, मटार सोलणे इ. हे करण्यामध्ये सगळया सह्भागींनी हातभार लावला. एकीकडे हे होत असताना खाण्यासाठी स्प्राउट्स (एकदम हेल्दी ना!) सर्क्युलेट झाले आणि पावसात मोबाईल सुरक्षित राहण्यासाठी प्लास्टिकचे पाऊच आणि गुंडाळण्यासाठी रबर (अत्यंत थॉटफुलं) प्रत्येकाला देण्यात आले!

काही व्ह्यू पॉइंट्स ना गाडी थांबत होती आणि गणेश सर तो निसर्ग नजरा कॅमेऱ्यात टिपत होते. थोडसं उजाडलं तेव्हा भोर-भाटगरचं धरण दिसलं. तासाभराने प-हर गाव आलं आणि तिथल्या जिल्हा परिषद शाळेच्या आवारात नाश्त्याची तयारी झाली. स्टोव्ह पेटला, एकीकडे चहा आणि दुसरी कडे दूध उकळतयं! पुढाकार घेऊन ट्रेक सहभागीनी ह्याही कामाला हातभार लावला. प्रत्येकाने चहाचा कप बरोबर आणलेला होताच. आलं घातलेला गरमागरम चहा, बरोबर टोस्ट आणि दुध असा नाश्ता झाला. शाळेचं आवार स्वच्छ झालं आणि ट्रेक सुरु झाला. 



सुरेंद्र दुगड सरांनी ट्रेकची माहिती दिली. ट्रेकचं वैशिष्ट्य काय, रायरेश्वर किल्ला आणि पठार, ट्रेक प्रवास कसा होणार इ. मला आवडलेली गोष्ट ही की ठिकठिकाणी नजरेच्या टप्प्यावर झाडावर नारंगी रंगाची रिबन बांधली जाणार होती आणि ती पाहून प्रत्येकाने ट्रेकवाट फॉलो करायची होती. ट्रेकमार्ग आणि ट्रेक सहभागी चुकण्याची शक्यताच नाही!
"हॅट्स ऑफ" प्रामाणिकपणे नजरेच्या टप्प्यात दुसरी रिबीन दिसेल अशी त्याची बांधणी केल्याबद्दल!



विशाल आणि शिल्पाने सह्याद्री स्तोत्र वाचले (विशाल त्याच्या ट्रेकला हे स्तोत्र नेहमी म्हणतो).


ट्रेक सहभागींचा वयोगट होता ९ वर्ष ते ६८ वर्ष!

साधारण १२०० मी. ची टेकडी चढायची होती आणि मग धानवली गाव लागणार होतं. अत्यंत स्टिफ नसला तरी चढ खतरनाक होता. त्यात पावसामुळे निसरडे झालेले, चिखल, दलदल, पाय घसरत होता. मला थोडा दम लागत होता आणि क्षणभर थांबाव असं वाटतं होतं. पण मागे-पुढे साठी ओलांडलेले ट्रेक सहकारी न थांबता ट्रेक करताना पाहून “क्षणभर थांबाव” ह्या विचाराचीच लाज वाटतं होती. इथे प्रत्येकजण लीडर आणि सहभागी अशा दोन भूमिका करताना दिसत होता. साठी ओलांडलेले एकमेकांना अवघड पॅचला मदत करत होते. ६८ वर्षाचे कुलकर्णी सर तर चक्क १० वर्षानंतर ट्रेक करत होते! मला म्हणे, “अजून young आहेस”!

पाठीवर ओझं, हातात स्टीक घेऊन हे सहभागी बेमालूम ट्रेक करत होते!

आता एक पठार लागलं, थर्मासमधल्या गरमागरम चहाने पुढील ट्रेक साठी उभारी आली! तासाभराने धानिवली गाव आलं. साधारण ३५-४० घरांच, वीज सुविधा नसलेलं हे गाव. मंदिरात गणेशाची आरती सुरु होती. घराबाहेर उभ्या असलेल्या आजी म्हणे, "२-३ तास रायरेश्वराला जायला लागतील”!

ट्रेक दरम्यान सुरेंद्र सर, ईश्वर काका त्यांचे अनुभव सांगत होते. काही ट्रेक सहभागींशी गप्पा होत होत्या. 


विशेष म्हणजे विशाल आज पार्टीसिपंन्ट होता त्यामुळे तो देखील रीलॅक्स राहून ट्रेक आणि फोटोग्राफीचा आनंद घेत होता!



इथून पुढे भिडलेला ट्रेक मार्ग हा निसर्ग आणि डोळा सुख देणारा होता. वाघदऱ्याचा हा भाग. जांभूळदरा धबधबा लागला. मी तर चिखलाने माखलेली स्टीक, हात, शूज, पॅन्ट स्वच्छ करून घेतले. थोडे पुढे निघालो आणि निसर्गाचा चमत्कार प्रत्यक्ष बघायला मिळाला. 



रायरेश्वरचे पठार हा तो चमत्कार! जवळ जवळ १८-२० किमी भागात पसरलेले हे पठार. खालील फलक पठाराची परिपूर्ण माहिती देतो.


पावसाळ्यात इथे विविध फुलांची लगबग बघायला मिळते. प्रामुख्याने हे पठार “गौरीचे हात” (स्थानिक लोक त्याला "चवर" असे म्हणतात) नावाच्या फुलांनी बहरलेले होते. कित्येक एकरात, नजर जाईल तिथपर्यंत ह्या फुलांचा माळ बहरला होता. काही फुले पूर्ण फुललेली, काही कळी स्वरुपात. काही पावसाने मलूल झालेली, काही फुलांना तर अनेक हात होते!



ह्या फुलांच्या ताटव्यात चीमिन, नभाळी, आभाळी, निसुर्डी, तेरडा, अग्निशिखा, सोनकी हे फुले देखील डोकावत होती. पांढऱ्या, पिवळसर रंगाच्या गौरीच्या हाताच्या ताटव्यात गुलाबी, जांभळी, गडद निळी, पांढरी फुले हे पठार आकर्षक बनवत होती. धुक्याची चादर विरळ झाली असती किंवा पूर्णत: गेली असती तर ह्या पठाराचे फुलांनी फुललेले निसर्ग सौदर्य अधिकचं खुलून जरी आले असते तरी दिसत होता तो देखावा मन तुप्त करणारा होता!



हे सौदर्य बघत असताना सुरेंद्र सरांनी काही झाडे आणि फळांची दिलेली माहिती म्हणजे अभ्यासपूर्ण ट्रेक! “नरक्या” नामक वनस्पती मधे अॅन्टी कॅन्सर केमिकल्स असतात आणि त्याचा उपयोग कॅन्सर सारखा दुर्धर आजार बरा करण्यासाठी तयार करण्याऱ्या औषधात वापरतात.

“गुळा” नामक फळाचा उपयोग भूल देण्यासाठीच्या औषधात वापरतात.

अजून अशा कित्येक औषधी वनस्पती ह्या परिसरात असतील ज्या वेळेअभावी शोधता आल्या नाहीत.

किमान ५०० ट्रेकचा अनुभव असलेले सुरेंद्र सरांना बोलताना ऐकणे हा काय समृद्ध करणारा अनुभव आहे ह्याचा प्रत्यय मला आला. त्यांच्या बरोबरच ईश्वर काका आणि गणेश सर देखील त्यांचे ट्रेक अनुभव खुले पणाने शेअर करत होते. 

पठारावर फुललेल्या फुलांचा आनंद घेत रायरेश्वराचे मंदिर आले. हेच ते मंदिर जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली! रायरेश्वर किल्ला महाराजांनी १६ व्या वर्षी घेतलेल्या शपथेमुळे सुप्रसिद्ध आहे. आपल्या हाताची करंगळी कापून रक्ताची धार शिवलिंगावर धरून घेतलेली शपथ. रायरेश्वर किल्ला हा मराठा इतिहासातील एक महत्वाचा किल्ला आहे. ह्या मंदिरात शिवलिंग तर आहेच पण छत्रपती शिवाजी महाराजांचे भले मोठे पोट्रेट ही इथे आहे!



थोडासा फराळ करून उतरणीला सुरुवात केली. मला आश्चर्य वाटत होते की कोणी बसायची संधी मिळाल्यावर लगेच बसत नव्हते किंवा कधी एकदा बसेन अशी देहबोली त्यांची वाटत नव्हती. कित्येक जण ट्रेक करून आल्यावरही उभ्या उभ्याने फराळ करत होते. तेवढी शारीरिक ताकद आणि स्टॅमीना त्यांच्यामध्ये होता आणि जो मला कौतुकास्पद वाटत होता. 

उतरणीला फरशांचा रस्ता बनवला आहे. आजूबाजूला फुललेले “गौरीचे हात” आणि ४० वयाच्या पुढची तरुणाई! २०-२५ वर्षाच्या तरुणाईला लाजवेल अशी! त्यांचा सळसळता उत्साह, सेल्फी घेण्यामधील हातखंडा, फुलांच्या संगतीत टवटवीत झालेला चेहरा, विनाथकान हावभाव आणि देहबोली आणि आपापसातील खेळकर नाते! अफलातून, अजब-गजब आणि असीम प्रेरणादायी!

आता दोन-तीन लोखंडी शिड्या होत्या आणि नंतर सिमेंटच्या पायऱ्या! 



हे पार केल्यावर डांबरी रस्ता आणि तिथून कोर्ले गावाला जायला मोठी कच्ची पायवाट! रस्त्यावर मोठमोठे ३-४ धबधबे, चौफेर खुलवणारी भातशेती, हिरवेगार डोंगर आणि धरणाचे पाणी! चोरडिया मॅडम म्हणाल्या ते खरचं आहे, “हिमालयातील व्हॅली ऑफ फ्लावर्स” ला जाण्याची गरजचं काय?"

कोर्ले गावाला नेणारी कच्ची पायवाट ही जवळजवळ ३-४ किमी असावी. कोर्ले गावात गाडी आली जिने आम्ही आंबवडे गावात आलो. १००-१५० वर्षापूर्वीच्या शंकराच्या मंदिर आवारात जेवण केले. चहा, भरपूर भाज्या घातलेला भात, दहीयुक्त काकडीची कोशिंबीर आणि गुलाबजाम! गरम मसाला घातलेल्या भाताची चव अफलातूनचं! आपापल्या प्लेटमध्ये जेवण! एकदम खेळीमेळीचे वातावरण आणि मनाचा खुलेपणा!



आंबवडे गाव तसं सुप्रसिद्ध! इथे १००-१५० वर्षापूर्वीचे पुरातन शिवमंदिर/नागेश्वर मंदिर आहे, गो-मुख आहे, आवारात सतीगळ आहे, ब्रिटीशांच्या काळात, भोर संस्थानचा राजा श्रीमंत रघुनाथराव शंकरराव पंडित याने आई जीजासाहेब हिच्या स्मरणार्थ बांधलेला झुलता ब्रिज आहे.



साधारण ५.३० च्या सुमारास पुण्याकडे परतीचा प्रवास सुरु झाला. विशालच्या उत्साहाने गाडीत गाण्याच्या भेंड्या रंगल्या. ईश्वर काकांनी सुचवलेली जुनी गाणी तर अफलातूनच आणि एका काकांनी म्हणलेले “नच सुंदरी करू कोपा मजवरी धरी अनुकंपा” हे नाट्यपद तर अवर्णनीयच!

गाण्याच्या सुरेल मैफलीत रमत, ९.३० ला पुण्यात आलो.

हा ट्रेक माझ्यासाठी एक अनन्यसाधारण अनुभव होता. माझ्यापेक्षा वयाने जास्त असणाऱ्या ट्रेक सहकाऱ्यांच्या सहवासात ट्रेकचा अनुभव मला घेता आला. ५ वर्षापासून ते २०-२५ वर्षापासून ट्रेक करणारे त्यात होते आणि काहीजण ट्रेक उशिरा सुरु केल्याबद्दल खंतावत होते तर ट्रेकमुळे आजारातून बाहेर पडण्यास मदत झाल्यामुळे सुखावत होते. ह्या वयात ट्रेकमुळे झालेल्या घट्ट मैत्रीच्या सहवासात काही जण स्वत:ला अतुलनीय मानत होते.

अजब-गजब गोष्ट ही देखील होती की १-२ कुटुंब ट्रेक ला आहे होते. पती-पत्नी आणि मुले!  

एका ट्रेक मधे किती अलौकिक गोष्टी अनुभवायला मिळाव्यात ना! आणि हो ह्याच्यात गणेश सर फोटोग्राफी करत होते आणि चंद्रशेखर शिर्के सर गुगुलवर ट्रेक मॅप ट्रेस करत होते (गणेश सरांचे फोटोज तर रात्री लगेचच फेसबुकवर विराजमान झालेले होते).




ट्रेक आणि संस्थेबद्दलचे हे डेडीकेशन “हॅट्स ऑफ”!

विशेष आभार: सुरेंद्र दुगड सर, गणेश आगाशे सर, ईश्वर काका आणि सर्व ट्रेक सहभागींचे ज्यांनी एक सुंदर ट्रेक अनुभव मला दिला!

खास आभार विशालचे! “सह्याद्री ट्रेकर्स फौंडेशन” ह्या ट्रेक ग्रुपची ओळख करून दिल्याबद्दल आणि “रायरेश्वर पठार” ह्या नितांत सुंदर अविस्मरणीय ट्रेक मधे साथ दिल्याबद्दल!

  
फोटो आभार: विशाल काकडे आणि गणेश आगाशे सर

No comments: